निरोगी जीवन ही आयुष्यातील सर्वात अनमोल ठेव… म्हणूनच ‘आरोग्यम धन संपदा!’ म्हणण्याचा प्रघात आहे.

आपले आरोग्य शास्त्र म्हणन्जे आयुर्वेद शास्त्र याचे मूळ उद्दिष्ट म्हणजे ‘स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम आतुरस्य विकारप्रशमनम!’ अर्थात ‘जो निरोगी आहे त्याला रोग होऊच नये म्हणून आदर्श जीवनशैली अंगीकारावी व रोग जडला आहे त्याच्या विकारांच्या प्रशमनाकरिता योग्य वेळी योग्य ती औषधयोजना करावी.’ त्यामुळे आयुर्वेद हे चिकित्साशास्त्र नसुन जीवनशैली बनते. आयुर्वेद केवळ आजारी पडल्यावर आठवण्याचे शास्त्र नसून ते रोज जगण्याचे जीवनशास्त्र आहे.

पंचकर्म

आयुर्वेदात रोगानुरुप औषध अशी योजना कमी असून  प्रत्येक रुग्णाची प्रकृति, त्याच्या खाण्यापिण्यात दिनक्रमात होणार्‍या चूका बघून त्यानुसार औषध दिले जाते व पथ्य पाळण्यास सांगितले जाते. एक म्हणजे शरीरात वाढलेले दोष शांत होतील असे औषध देणे अथवा ते वाढलेले दोष शरीराबाहेर काढून टाकणे. शरीरातील दोष बाहेर काढून टाकण्याकरीता पंचकर्मे उपयोगी पडतात, ती म्हणजे

  • वमन – उलटीवाटे शरीरातील दोष बाहेर काढणे.
  • विरेचन – मलावाटे शरीरातील दोष बाहेर काढणे.
  • बस्ति – एनिमा पद्धतीने औषध देऊन दोष बाहेर काढणे.
  • नस्य – नाकाद्वारे औषध देऊन दोष बाहेर काढणे.
  • रक्तमोक्षण – दूषित झालेले रक्त शरीराबाहेर काढून टाकणे.

यामुळे शरीर शुद्ध होते. वात – पित्त – कफ यांची बिघडलेली दोषांची समावस्था राखण्याकरिता निरोगी व्यक्तीनेही ऋतुनुरुप पंचकर्म करुन घेणे हितकर.

चरक संहितेमध्ये परिपूर्ण स्वास्थ्याची व्याख्या खालीलप्रमाणे केली आहे.

समदोषा: समाग्निश्च समधातु मलक्रिया: |

प्रसन्न आत्मा इंद्रिय मन: स्वस्थ इत्यभिधियते ||

अर्थात,  ज्या शरीरातील दोष, धातु, मल हे शरीरघटक साम्यावस्थेत आहेत, ज्याचा अग्नि सम आहे, ज्याच्या शरीर क्रिया संतुलित आहेत, मलोत्सर्ग व्यवस्थित होत आहे, आत्मा, इंद्रिये, मन प्रसन्न आहेत, तो सर्वार्थाने स्वस्थ आहे असे समजावे.

दिनचर्या

आयुर्वेदात दिनक्रमात पाळावयाच्या निम्नलिखित नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.

  1. ब्राह्म मुहुर्तावर म्हणजे सूर्योदयापूर्वी साधारण पहाटे पाचच्या सुमारास उठणे.
  2. वड, रुई, करंज, कडुलोंब, खरिअ, अर्जुनसादडा, आवळाकाठी इ. च्या काड्या ठेचून घेउन त्याने दंतधावन करावे. शक्य नसल्यास यांच्या शुष्क काष्ठांचे चूर्ण बनवून त्यांचे दंतमंजन दात घासण्यासाठी वापरावे.
  3. प्रात:काळी मलमूत्र विसर्जन करावे. ह्या वेगांचे धारण करु नये, अर्थात त्यांना अडवून ठेवु नये, त्यांचा त्याग करावा.
  4. दात घासून झाल्यानंतर डोळ्यांच्या रक्षणासाठी डोळ्यात अंजन अर्थात सूरमा / काजळ लावावे, ज्यामुळे डोळ्यांत उद्भवणारे कफाचे विकार संभवत नाहीत.
  5. स्नानापूर्वी तेलाने संपूर्ण शरीरास अभ्यंग करावा. त्यामुळे त्वचा निरोगी राहते, वाताची वृद्धी होत नाही, वार्धक्य उशीरा येते.
  6. अभ्यंगानंतर यथाशक्ती व्यायाम करावा. त्यामुळे शरीरार हलकेपणा उत्पन्न होतो, भूक वाढते व वाढलेल्या चरबीची घट होते अंवयव सुदृढ, मजबुत होतात, साधे बळकट होतात. व्यायाम योग्य मर्यादेत करावा. शरीरसौष्ठत्वाच्या नादात प्रमाणाच्या बाहेर जास्त थकवणारा व्यायाम करणे टाळावे.
  7. स्थूल व्यक्तींनी स्नानापूर्वी व्यायामानंतर संपूर्ण शरीराला उद्वर्तन करावे म्हणजेच उटणे रगडावे, त्याने फाजील मेद कमी होतो व कांती सतेज होते.
  8. कोमट पाण्याने स्नान करावे. अती शीत किंवा अती गरम पाणी टाळावे.
  9. चांगली भूक लागली असताना आहार सेवन करावे. आहार करताना मधे-मधे पाणी प्यावे जेणेकरुन अन्नाचे योग्य पचन होईल. अन्न शक्यतोवर गरम खावे. त्यात दूध-तूप-तेल आदी स्निग्ध पदार्थांचा समावेश असावा. फार भरभर किंवा अतिशय हळूहळू खाऊ नये. जेवत असताना बडबड करणे, हसणे, वाचन करणे इत्यादी टाळावे. शांतचित्ताने आपल्या पचनशक्तिचा विचार करुन योग्य प्रमाणात भोजन करावे.

ऋतुचर्या

निसर्गातील बदलांनुसार आपल्या दिनचर्येत बदल करावेत. ऋतुनिहाय वातावरणातील बदल आरोग्यास प्रभावित करतात. त्यांना साजेशा जीवनशैलीचा अंगिकार केल्यास दोष न वाढता आरोग्य अबाधित राहिल.

  • जानेवारी – फेब्रुवारी (शिशिर ऋतु)

शीतकाळ व रुक्ष – शीत हवा अशा वातावरणामुळे शरीरातील उष्मा आतच कोंडला जातो.  त्यामुळे भूक चांगली लागते. स्निग्ध आहाराचे सेवन करावे. शेंगदाणे, गुळ, तीळ, खोबरे इ. पदार्थांचा प्रचूर मात्रेत वापर करावा. सकाळी आंघोळीआधी तीळ तेलाने अभ्यंग करावे. गरम पाण्याने आंघोळ करावी. उडिद, दूधाचे पदार्थ, मांसाहारी असल्यास मांसाहार, नवीन तांदूळ यांचा आहारात समावेश करावा. यथाशक्ती व्यायाम अवश्य करावा.

  • मार्च – एप्रिल (वसंत ऋतु)

वातावरणातील उष्णता हळू हळू वाढीस लागते. शीतकाळात शरीरात जमा झालेला कफ पातळ होऊन कफाचे विकार जसे सर्दी – पडसे निर्माण होतात. भूक मंदावते. त्यामुळे कफ शमन करणारा आहार – विहार हितकर आहे. सुंठ, मिरे, हिंग इ. मसाल्याच्या पदार्थांचा वापर करावा. पराठे – भाकर्‍या यांचे सेवन करावे. शीत पदार्थ, स्निग्ध पदार्थ, अति गोड, अति आंबट पदार्थांचे सेवन टाळावे. मध, जव, गहू, आले, लसूण ह्यांचा समावेश आहारात अवश्य करावा. प्राणायाम, श्वासाचे यथाशक्ती व्यायाम करावेत.

  • मे – जून (ग्रीष्म ऋतु)

उष्ण वातावरणामुळे शरीरबल कमी झालेले असते. तांदूळ, दूध, तूप, द्राक्षे, नारळाचे पाणी, साखर यांचा आहारात समावेश करावा. माठामध्ये वाळा ठेवावा किंवा जिर्‍याने सिद्ध जल वापरावे. तिखट, मधुर व आंबट पदार्थ टाळावेत. उन्हात हिंडणे, अति व्यायाम टाळावा.

  • जुलै – ऑगस्ट (वर्षा ऋतु)

वाढलेल्या आर्द्रतेमुळे वात दोषाचा प्रकोप असतो. भूक मंदावते. शरीरबल कमी असते. मूगासारखे धान्य, सुठीबरोबर शिजवुन त्याचे सूप, जुने तांदुळ, गहु, जव यांचा आहेरात समावेश करावा. डोक्याला तेल लावावे. पाणी उकळुन शुद्ध करुन वापरावे. संसर्गजन्य व्याधींचा प्रादुर्भाव असतो, त्यामुळे उघड्यावरचे पदार्थ कटाक्षाने टाळावेत. अति भोजन, अति द्रव पदार्थांचे सेवन टाळावे.

  • सप्टेंबर – ऑक्टोबर (शरद ऋतु)

पावसाचा जोर कमी होत जातो व ऑक्टोबर हीटमुळे उष्णता वाढते. त्यामुळे पित्ताचा प्रकोप होतो. तूप, मधुर, कडू व तुरट चवीचे पदार्थ अधिक प्रमाणात सेवन करावेत. साठीचे तांदूळ, मूग, साखर, मध, आवले, गोड द्राक्षे, पडवळ इ. पदार्थांचा आहारात समावेश करावा. दही, क्षारयुक्त पदार्थ, चायनीज, अती उन्हाशी संपर्क टाळावा.

  • नोव्हेंबर – डिसेंबर (हेमंत ऋतु)

ऑक्टोबर हिट ओसरुन थंडीचा जोर वाढू लागतो. भूकही वाढू लागते. आहार – विहार ह्या कालाव्धीत देखील जानेवारी – फेब्रुवारीप्रमाणेच हितकर ठरते.

व्याधीग्रस्त झाल्यावर योग्यवेळी वैद्याकडे जाणे, योग्य ती औषध योजना सुरु करणे आणि वैद्याने दिलेले पथ्याचे काटेकोरपणे पालन करणे ह्या त्रिसुत्रीचे पालन केल्यास व्याधीमुक्तीचे उद्दीष्ट विनासायास साध्य होते.

आयुर्वेदामध्ये पथ्याचे महत्त्व विषद करताना सांगितले आहे,

पथ्ये सति गदर्तस्य किमौषधनिषेवणै:, पथ्ये असति गदार्तस्य किमौषधनिषेवणै:|

अर्थात, जर एखदी व्यक्ति पथ्य पाळत आहे तर तिला औषधाची गरजच काय? कारण केवळ पथ्य पाळले तरी त्या व्यक्तिचा आजार बरा होणारच असतो आणि जर ती व्यक्ती पथ्य पाळत नसेल तरी तिला औषधाची गरजच काय? कारण अपथ्य केल्यास औषधाचा परिणाम होत नाही.

आयुर्वेदात सर्व रोगांसाठी एक महत्त्वाचा उपचार सांगितला आहे, ‘निदान-परिवर्जन’!  म्हणजेच, ज्यामुळे रोग झाला ते कारण टाळणे. बस्स, एवढे केले तरी व्याधि आटोक्यात येतो आणि त्याला योग्य त्या औषधांची जोड मिळाली व्याधिमुक्ती नि:संशय!