बाळासाहेब ठाकरे

बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे (जानेवारी २३, इ.स. १९२६; पुणे – नोव्हेंबर १७, इ.स. २०१२;मुंबई) हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी, व्यंगचित्रकार, संपादक होते. सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादक होते.ज्यांच्या एका ‘आवाजा’वर हजारो मुठी वळल्या अशा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी मनावर अखंड गारुड केले आहे. प्रबोधकरांच्या या ‘बाळा’ने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात मराठी आणि हिंदुत्ववादाचा ‘भगवा’ सतत फडकवत ठेवला. व्यंगचित्रकार ते महानेता असा प्रवास केलेल्या बाळासाहेबांचे अल्पचरित्र…

व्यंगचित्रकार

सर्वप्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. इ.स. १९५० मध्ये ते ‘फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. ‘फ्री प्रेस जर्नल’मध्ये काम करीत असतानाच बाळासाहेब विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे-व्यंगचित्रे-जाहिरातीचे डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत असत.

‘मार्मिक’ व्यंगचित्र साप्ताहिक

पुढे बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वत:चे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट, १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना प्रबोधनकारांनीच सुचविले. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. ‘मार्मिक’च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. या समारंभास प्रा. अनंत काणेकरही उपस्थित होते. महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमान जागृतीसाठीच बाळासाहेबांनी ‘मार्मिक’ची सुरुवात केली. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता, पण मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतच होता. या प्रश्नाला मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणार्‍यांना बाळासाहेबांनी प्रथम व्यंगचित्रांच्या माध्यमातून वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला. इ.स. १९६० पासून ते आजतागायत राष्ट्रीय व महाराष्ट्र स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत, तसेच इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठीजनांना मार्गदर्शन करत ‘मार्मिक’ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

शिवसेनेची स्थापना

महाराष्ट्रात निर्माण झालेले मराठी द्वेषाचे व मराठी माणसांवरील अन्यायाचे व्यंग केवळ चित्रांनी दूर होणार नाही. त्यासाठी आणखी संघटित प्रयत्न करायला हवेत असा विचार बाळासाहेबांनी केला. ‘हर हर महादेवची’ गर्जना मराठी माणसाच्या मनात पुन्हा एकदा घुमायला हवी आणि प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्राचा स्वाभिमान मनात बाळगायला हवा. एक दिवस प्रबोधनकार ठाकरेंनी प्रश्न विचारला..“बाळ लोकं तर जमली पण याला संघटनेचे रूप देणार की नाही? काही नाव सुचतंय का संघटनेसाठी?” बाळासाहेब बोलले ..” विचार तर चालू आहे..पण संघटनेला नाव…” “मी सांगतो नाव……..शिवसेना………यानंतर बाळासाहेबांनी १९ जून १९६६ रोजी ‘शिवसेनेची स्थापना केली.

समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, पण मराठी माणूस दुविधेत आहे. महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार;तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब. ही परिस्थिती बाळासाहेबांसारख्या सूक्ष्म निरीक्षकाने ओळखली. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे. हा विरोधाभास बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिला. यातूनच मराठी माणूस संघटित झाला.

शिवसेनेचा पहिला मेळावा ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला. या मेळाव्यास सुमारे पाच लाख लोकांनी गर्दी केली होती. या मेळाव्यापासूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि शिवतीर्थावरील (शिवाजी पार्कवरील) मराठी माणसांची प्रचंड गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत शिवतीर्थ, बाळासाहेब आणि गर्दी हे गणित आजतागायत कायम आहे.

दैनिक ‘सामना’

वक्तृत्वाबरोबरच भेदक लेखन हेदेखील बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य. प्रबोधनकार ठाकरे व प्रल्हाद केशव अत्रे यांचा प्रभाव त्यांच्या लेखनात जाणवतो. शिवाय व्यंगचित्रकाराची वेधक-वेचक निरीक्षणदृष्टीही त्यांच्यामध्ये आहेच. बाळासाहेब संपादक असलेल्या ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखांबद्दल लोकांना कायमच उत्सुकता असते.

शिवसेना-भाजप युती

बाळासाहेब व भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या मुत्सद्दीपणातून शिवसेना-भाजप युती आकाराला आली. तसेच पुढे प्रामुख्याने शिवसेनाप्रमुखांच्या झंझावाती सभांमुळे-दौऱ्यांमुळे इ.स. १९९५ मध्ये शिवसेना-भाजपचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले आणि मनोहर जोशी हे शिवशाहीचे पहिले मुख्यमंत्री बनले. हे महाराष्ट्रातील खर्‍या अर्थाने पहिले काँग्रेसेतर सरकार होते. हा सत्तांतराचा चमत्कार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्व व कार्यशैलीमुळेच घडला.

हिंदुत्व

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही बाळासाहेबांनी आपले विचार नेहमीच रोखठोकपणे मांडले. बॉंबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणार्‍या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. मतपेटीचे राजकारण करत अशा मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. भारताला आपला देश मानणार्‍या राष्ट्रवादी मुस्लीम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही, असे स्पष्ट विचार त्यांनी शिवसैनिकांसमोर व जनतेसमोर मांडले. या स्पष्ट आणि जहाल भूमिकेमुळे ते ‘हिंदुहृदयसम्राट’ म्हणून ओळखले जाऊ लागले. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ या घोषणेला खरा अर्थ महाराष्ट्रात प्राप्त झाला तो शिवसेनाप्रमुखांमुळेच.

एक राजकारणी

झुणका-भाकर केंद्रांची योजना, वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडपट्टीवासीयांना घरे, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, बॉम्बे चे मुंबई असे नामकरण… अशा अनेक योजना-प्रकल्पांची मूळ संकल्पना ही बाळासाहेबांचीच. व्हॅलेंटाईन डे सारख्या संस्कृतिविघातक पाश्चिमात्य उत्सवांना विरोध, परप्रांतीयांच्या तसेच बांगलादेशींच्या विरोधातील आंदोलने यांमागचा विचारही बाळासाहेबांचाच. बाळासाहेबांनी राजकारणात (सत्ताकारणात) जात या घटकाचा अजिबात विचार केला नाही. तसेच त्यांनी तरुणांच्या आकांक्षांना पंख लावले. त्यामुळेच अनेक जातीपातींच्या मराठी तरुणांना विविध सत्तापदे प्राप्त झाली, होत आहेत. इतर पक्षांत व शिवसेनेत आणि इतर नेत्यांत व बाळासाहेबांमध्ये हाच फरक आहे. बाळासाहेब आणि शिवसेनेच्या विरोधकांनीही कधी ते नाकारले नाही.

जातीपातींचे राजकारण, सहकारी संस्था, साखर कारखाने स्थापन करून केलेले सत्ताकारण, कुटिल राजकीय डावपेच असे महाराष्ट्रातील परंपरागत राजकारण बाळासाहेब ठाकरे यांनी केले नाही. तरुणांची मने महाराष्ट्राच्या अभिमानाने भारून टाकणे, जनतेच्या मनातील विचार नेमके ओळखून, त्यांची नाडी ओळखून ते विचार ‘ठाकरी’मांडणे आणि आक्रमक संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलने करणे, अशी कार्यपद्धती बाळासाहेबांनी अवलंबिली. मनोहर जोशी, सुधीर जोशी, प्रमोद नवलकर, मधुकर सरपोतदार, छगन भुजबळ, आनंद दिघे, दत्ताजी नलावडे,…. असे असंख्य नेते बाळासाहेबांनी घडविले. शिवसेनेचे सध्याचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जडणघडणीतही अर्थातच बाळासाहेब ठाकरे यांचाच मोठा वाटा आहे. स्वत: प्रत्यक्ष कोणतेही सत्तापद न भूषविता राजकारण करण्याची पद्धतही खास बाळासाहेबांचीच.

अनेक नेते येतात आणि जातात. निवडणूक, प्रचार, पद, पैसा आणि शेवटी एखादा पुतळा एवढ्यावरच बहुतेक राजकारण्यांचे राजकारण संपून जाते. पण लोकांच्या हितासाठी जिवाच्या आकांताने लढणारा योद्धा मात्र कधीच संपत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब केशव ठाकरे हे असेच योद्धे आहेत.