• तिथी :

फाल्गुन शुध्द पौर्णिमा

  • पार्श्वभूमी :

होळीच्या संदर्भात जी गोष्ट सांगितली जाते ती अशी की “हिरण्यकश्यपूच्या बहिणीचे नाव होलिका असे होते. अग्नीपासून तुला मुळीच भय रहाणार नाही असा तिला वर प्राप्त झाला होता.या वराचा दुरुपयोग करुन तिने आपला भाचा भक्त प्रल्हाद याला जिवंत जाळण्याकरिता त्याला मांडीवर घेऊन स्वतः धगधगत्या अग्नीत जाऊन बसली. परंतु परिणामाअंती तीच स्वतः जळून खाक झाली व भक्त प्रल्हाद याला काहीही इजा न होता तो सुखरुपपणे अग्नीतून बाहेर पडला. तो दिवस म्हणजे फाल्गुन शुध्द पौर्णिमा.”

  • साजरा करण्याची पारंपारिक पद्धत :

अंगणातील थोडी जागा सारवून भोवती रांगोळी काढून मध्ये शेणाच्या गोव-या ठेवून त्यात एरंडाची फांदी ठेवतात. पूजा करण्यापूर्वी ती पेटवतात. पेटल्यानंतर पुरुष हळद-कुंकू अक्षता वगैरेंनी होळीची पूजा करतात. होळी भोवती तीन प्रदक्षिणा घालतात. बायका पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून होळीला हळद-कुंकू वाहून होळीत पुरणाची पोळी टाकतात. ह्या मागील उद्देश हाच असतो की उन्हाळयाच्या दिवसात ठिकठिकाणी आग वगैरे लागते. तेव्हा अग्नीला शांत करण्यासाठी ही पौर्णिमा साजरी केली जाते. तसेच उन्हाळाही कडक भासू नये म्हणून वरीलप्रमाणे अग्नीदेवतेची पूजा करतात. हा सण सर्वत्र संध्याकाळी किंवा रात्री साजरा करतात.

  • वैशिष्ट्य :

जे जुनं आहे, कालबाह्य आहे, अमंगल आहे त्या सर्वांचा जाळून नाश करायचा. नव्याचा चांगल्याचा उदात्ततेचा स्विकार करायचा हाच होळीचा खरा संदेश आहे. होळी आपल्याला त्याग आणि समर्पण शिकवते..

  • खाद्यपदार्थ :

पुरणपोळी