•  तिथी :

मार्गशीर्ष पौर्णिमा

  • पार्श्वभूमी :

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. अत्रीऋषींची पत्नी अनसूया ही पतीव्रता होती. पातिव्रत्यामुळे तिच्या अंगी एवढे सामर्थ्य आले की, इंद्रादी देव घाबरले आणि ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांकडे जाऊन म्हणाले, ‘‘तिच्या वराने कोणालाही देवांचे स्थान मिळू शकेल किंवा कोणीही देवांना मारू शकेल; म्हणून तुम्ही काहीतरी उपाय करा, नाहीतर आम्ही तिची सेवा करू.’’ हे ऐकून त्रिमूर्ती म्हणाले, ‘‘एवढी काय मोठी पतीव्रता, सती आहे, ते आपण पाहू.’’

एकदा अत्रीऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेल्यावर अतिथींच्या वेशात त्रिमूर्ती आले आणि अनसूयेकडे त्यांनी भिक्षा मागितली. त्यावर अनसूयेने सांगितले, ‘‘ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले आहेत. ते येईपर्यंत थांबा.’’ तेव्हा त्रिमूर्ती अनसूयेला म्हणाले, ‘‘ऋषींना परत यायला वेळ लागेल. आम्हाला खूप भूक लागली आहे. लगेच अन्न द्या, नाहीतर आम्ही दुसरीकडे जाऊ. `आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छाभोजन देता’, असे आम्ही ऐकले आहे; म्हणून इच्छाभोजन करण्यास आम्ही आलो आहोत.’’ मग अनसूयेने त्यांचे स्वागत केले आणि जेवायला बसण्याची विनंती केली. त्याप्रमाणे ते जेवायला बसले. ती जेवण वाढायला आल्यावर ते म्हणाले, ‘‘तुझे सुंदर रूप पाहून आमच्या मनात अशी इच्छा झाली आहे की, तू विवस्त्र होऊन आम्हाला वाढावेस.’’ त्यावर ‘अतिथीला विन्मुख पाठवणे अयोग्य होईल. माझे मन निर्मळ आहे, मग कामदेवाची काय बिशाद आहे ? माझ्या पतीचे तपफळ मला तारील’, असा विचार करून ती अतिथींना म्हणाली, ‘‘मी तुम्हाला विवस्त्र होऊन वाढीन. तुम्ही आनंदाने भोजन करा.’’ मग स्वयंपाकघरात जाऊन पतीचे चिंतन करून तिने विचार केला की, ‘अतिथी माझी मुले आहेत’ आणि विवस्त्र होऊन वाढायला आली. पहाते तो अतिथींच्या जागी रडणारी तीन लहानबाळे ! त्यांना कडेवर घेऊन तिने स्तनपान करवले आणि बाळांचे रडणे थांबले. इतक्यात अत्रीऋषी आले. तिने त्यांना सर्व वृत्तान्त सांगितला. ती म्हणाली, ‘‘स्वामिन् देवेन दत्तं ।’’ याचा अर्थ असा आहे – ‘हे स्वामी, देवाने दिलेली (मुले).’ यावरून अत्रींनी त्या मुलांचे नामकरण ‘दत्त’ असे केले. बाळे पाळण्यात राहिली आणि ब्रह्मा, विष्णु आणि महेश त्यांच्यासमोर उभे राहिले आणि प्रसन्न होऊन ‘वर मागा’, असे म्हणाले. अत्री आणि अनसूयेने ‘बालके आमच्या घरी रहावी’, असा वर मागितला. पुढे ब्रह्मदेवापासून चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शंकरापासून दुर्वास झाले. तिघांपैकी चंद्र आणि दुर्वास तप करण्यास जाण्यासाठी अनुमती घेऊन अनुक्रमे चंद्रलोकी आणि तीर्थक्षेत्री गेले. तिसरा दत्त विष्णुकार्यासाठी भूतलावर राहिला.

पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल आणि सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस दत्तजयंती म्हणून साजरा करतात.

  • साजरा करण्याची पारंपारिक पद्धत :

उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्रसप्ताह असे म्हणतात. भजन, पूजन आणि विशेषकरून कीर्तन वगैरे भक्तीचे प्रकार प्रचारात आहेत. महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते.

दत्तयाग यामध्ये पवमान पंचसूक्ताच्या आवृत्त्या (जप) आणि त्याच्या दशांशाने किंवा तृतीयांशाने घृत (तूप) आणि तीळ यांनी हवन करतात. दत्तयागासाठी केल्या जाणार्‍या जपाची संख्या निश्चित नाही. स्थानिक पुरोहितांच्या समादेशानुसार जप आणि हवन केले जाते.