भारतातील देवीची अनेक मंदिरे शक्तिपीठे म्हणून ओळखली जातात.

सतीचा पिता प्रजापती दक्ष याने आयोजित केलेल्या यज्ञात दक्षाने सतीचा पती असलेल्या शिवशंकरांचा अपमान केल्याने शिव पत्नी सतीने यज्ञात उडी मारून आत्मदहन केले. हे समजल्यावर रागावलेल्या शिवाने वीरभद्रास आज्ञा करून यज्ञाचा विध्वंस केला. शोकाकुल अवस्थेत पत्नी सतीचे प्रेत घेऊन शिव सैरावैरा फिरू लागले. या भ्रमंतीत सतीच्या शरीराचे विविध अवयव ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी शक्ती पीठे निर्माण झाली. या पौराणिक कथेतून भारतभरातील देवीची विविध मंदिरे एकाच आदिशक्तीची मानली गेली.

असे असले तरी, शक्तिपीठांच्या या ठिकाणांविषयी व त्यांच्या संख्येविषयी मतभिन्नता आढळते. ही संख्या कोठे १०८ तर काही लिखाणात ५१, ५२, ५५ किंवा ६४ अशी दिली आहे. देवीभागवतामधे पुढील १०८ पीठांमधील देवतांचा उल्लेख आहे.

महाराष्ट्रात कोल्हापूरची महालक्ष्मी ऊर्फ अंबाबाई, तुळजापूरची भवानी, माहूरची रेणुका ही तीन पूर्ण पीठे आणि वणीची सप्तशृंगी हे अर्धे अशी साडेतीन शक्तिपीठे आहेत.

  • तुळजापूर येथील भवानी देवी

देवीच्या शक्तिपीठापैकी हे आद्यपीठ. उस्मानाबाद जिल्ह्यात असलेले हे देवालय सोलापूरपासून प्रवासाच्या दृष्टीने जवळ आहे. देवीचे मंदिर बालाघाटमधील एका डोंगरमाथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्याखेरीज या मंदिराचा कळस दिसत नाही. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभावानी देवीस अग्रमान आहे. स्वराज्य संस्थापना करणारे छत्रपत्री श्रीशिवाजी महाराज यांची ही कुलदेवता होय. या देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दृष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती, अशी आख्यायिका आहे. भोसले घराण्याची ही कुलदेवता असून रामदास स्वामी हे देखील या देवीचे उपासक होते.

नजीकचे रेल्वे स्टेशन : सोलापूर (द.म. रेल्वे)
मुंबई-सोलापूर : ४५५ कि.मी. रेल्वेने), ४०८ कि. मी (रस्त्याने)
सोलापूर-तुळजापूर : ४० कि.मी.

  • कोल्हापूर येथील अंबाबाई (महालक्ष्मी)

देवीची उपासना करणाऱ्या लक्षावधी भक्तांचं कोल्हापूरची महालक्ष्मी हे मोठं श्रध्दास्थान आहे. हजारो कुटुंबियांची ती कुलदेवता असल्याने या देवीच्या दर्शनासाठी दूरदूरवरून भक्त मंडळी येतात. दिवसभर दर्शनार्थीचा राबता मंदिरात चालू अस्तो. भक्त मंडळी या देवीचा उल्लेख प्रेमाने ‘अंबाबाई’ असा करतात. महाराष्ट्रातील ते एक जागृत श्रध्दास्थान आहे.
सातव्या शतकात चालुक्य राजाने या देवालयाच्या बांधकामास सुरुवास केली. परंतु नवव्या शतकात शिलाहार यादव राजांनी हे देवालय हेमाडपंती बांधणीने व इतर अन्य कलात्मक शिल्पकलेने सुशोभित केलं. हे संपूर्ण देवालय म्हणजे शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. देवळाचा गाभारा, सभामंडप, महिरप, खांब, छत या सर्व ठिकाणी शिल्पकलेचं सौंदर्य प्रगट होतं. देवळाच्या आवारात काशी विश्वेवर, कार्तिकस्वामी, शेषशायी, सिध्दिविनायक, महासरस्वती, महाकाली तसेच श्री दत्तात्रेय व श्रीराम आदी देवदेवतांच्या अतिशय सुंदर व देखण्या मूर्त्या लहान-मोठ्या मंदिरात बसविलेल्या आहेत. मंदिराचा सर्व परिसर श्री-मंत्राने कोरलेला आहे.
देवळातील महालक्ष्मी देवीची मूर्ती स्वयंभू असून तिचं वजन ४०किलो इतकं आहे. साडेतीन फूट उंचीची ही मूर्ती चतुर्भुज आहे. तिच्या शिरोभागी शेषशाई नागाने फणा धरून छाया केली आहे. दर शुक्रवारी देवाची पालखी निघते. नवरात्रात आणि चैत्री पौर्णिमेस येथे मोठा उत्सव असतो. देवीच्या गाभाऱ्यापुढे ‘गरुडमंडप’ नावाचा विस्तृत सभामंडप आहे. तो.इ.स.१८३८ मध्ये बांधण्यात आला असून या सभामंडपात संगीत क्षेत्रातील कलावंत आपल्या गायन वादनाने देवीची सेवा करतात. मराठी सत्तेच्या काळात या देवळाचा लौकीक सर्वदूर पसरला. सर्व जातीचे लोक या देवाची पूजा करतात.

नजीकचे रेल्वे स्टेशन : कोल्हापूर ( पुणे मीरज-कोल्हापूर मार्गे)
मुंबई-कोल्हापूर : ४३० कि.मी., पुणे-कोल्हापूर : ३२७ कि. मी

  • रेणुका देवी

माहूर येथील रेणुका देवी ही तीन शक्तिपीठांपैकी एक. त्यामुळेच हे स्थान देवी भक्तांच्या दृष्टीने महत्त्वाचे श्रध्दास्थान आहे. माहूर हे नांदेड जिल्ह्यातील एक लहान गाव असून दत्तात्रेय या त्रिगुणी अवताराचे ते जन्मस्थान आहे, अशी दत्तभक्तांची श्रध्दा आहे. ‘काशी क्षेत्री स्नान करितो, करवीर भीक्षेला जातो माहूर निद्रेला वरितो’ असे वर्णन दत्तात्रेयांच्या एका आरतीत आहे.
रेणुका ही दत्तात्रेयांची माता असल्याने माहूर क्षेत्रास मातापूर असेही संबोधले जाते. नवरात्रात रेणुका देवीची मोठी यात्रा भरते. विजयादशमीला या यात्रेची सांगता होते. माहूर येथे सती अनुसया, कालिका आदी देवदेवतांची अनेक प्राचीन मंदिरे आहेत. इतिहास प्रसिध्द राजगड किल्ला याच गावापासून दोन अडीच कि. मी. अंतरावर आहे. १२ व्या शतकात बांधण्यात आलेला हा भुईकोट किल्ला माहूरगड या नावानेही प्रसिध्द आहे.

नजीकचे रेल्वे स्टेशन : किनवट (द.म. रेल्वे)
किनवट-माहूर : ४५ कि.मी., मुंबई-किनवट (व्हाया मनमाड): ७५१ कि.मी. (रेल्वेने)
मुंबई-माहूर (रस्त्याने) : ७८९ कि.मी.

  • सप्तशृंगी येथील देवी

नाशिक शहरापासून उत्तरेकडे असलेल्या सह्याद्री पर्वताच्या अजंठा- सातमाळा नावाच्या लांबच लांब उपशाखेवरील सप्तशृंगी हे सर्वात उंच म्हणजे १३८० मीटरपेक्षा अधिक उंचीचे शिखर आहे. या शिखरावरच सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. वणीची देवी म्हणूनही ती ओळखली जाते. देवीच्या साडेतीन पीठापैकी हे अर्धे पीठ होय. नाशिकहून दिंडोरी किंवा पिंपळगावमार्गे वणीपर्यंत बसने प्रवास करून नंतर वणीपासून संपूर्ण गड पायी चढून सप्तशृंगी देवीच्या मंदिरापर्यंत जाता येते. या मार्गाने चढण खूप असल्याने नांदुरी मार्गाने अनेक भक्त देवीला जातात. त्यासाठी वणीला न उतरता पुढे १४ कि.मी. अंतरावर नांदुरी येथे जावे लागते. नांदुरी येथून एस.टी. बसने सप्तशृंगी गडाच्या पठारापर्यंत जाता येते. त्यानंतरची चढण अडीचशे पायऱ्यांची असून ती चढणे सोपे आहे. मंदिर एका कड्यात खोलगट असल्याने पायथ्यापासून मंदिर दिसत नाही. खूप वर गेल्यानंतर मंदिराचे दर्शन होते.
ऐन डोंगरात आणि उंच ठिकाणी हे स्थान असल्याने सभोवतालचा निसर्ग मात्र खूपच उल्हसित करणारा आहे. म्हणूनच गड चढताना शीण वाटत नाही. देवस्थानाचा परिसर अत्यंत रमणीय आहे.
सप्तशृंगी हे महाराष्ट्रातील एक जागृत देवस्थात असून शुंभ-निशुंभ व महिषासूर या असुरांचा नाश केल्यानंतर तप-साधना करण्यासाठी देवीनी या गडावर वास्तव्य केले अशी आख्यायिका आहे.
सह्याद्रीच्या या शाखेवर सात उंच शिखरे असल्याने या स्थानास सप्तशृंगी असे नाव मिळाले असावे. देवळाच्या परिसरात प्राचीन मंदिरे आहेत तसेच काही कुंडे आहेत. नवरात्रात या ठिकाणी मोठी यात्रा भरते व लक्षावधी लोक दर्शनासाठी येतात.

नजीकचे रेल्वे स्थानक : नाशिक रोड
नाशिक-नांदुरी : ५४ कि.मी (दिंडोरी मार्गे)
नाशिक-नांदुरी : ६५ कि.मी. (पिंपळगाव मार्गे)