• तिथी :

माघ वद्य चतुर्दशी

  • पार्श्वभूमी :

महाशिवरात्रीविषयी एक कहाणी प्रसिध्द आहे. फार पूर्वी एक शिकारी शिकार करण्याकरितां अरण्यात गेला होता. तो झाडावर दबा धरुन बसला. ते झाड बेलाचे होते. परंतु शिकार करण्याच्या दृष्टीने झाडाच्या फांद्या आड येऊ लागल्या. म्हणून त्याने बेलाची पाने तोडण्यास सुरवात केली. त्या झाडाखाली शंकराची एक पिंड होती. त्या पिंडीवर आपोआप बेल पडू लागला. इतक्या अवधीत पाणी पिण्यासाठी एक हरिणी आली. त्या शिकार्‍याने तिच्यावर नेम धरला. याची हरिणीला चाहूल लागली. तेव्हा तिने शिका-याला सांगितले की माझी लहान बाळे घरी आहेत. त्यांना मी भेटून सूर्योदयापूर्वी पुन्हा इकडे येते. मग माझी शिकार कर. शिकार्‍याने तिचे म्हणणे कबूल केले. हरिणी परत येण्याची तो वाट पाहू लागला. रात्रभर झाडावर राहिल्याने त्याला आपोआपच उपवास घडला. शिकार्‍याला सांगितल्याप्रमाणे हरिणी तेथे हजर झाली. तिचा प्रामाणिकपणा पाहून शिकार्‍याचे अंतःकरण द्रवले. त्याला तिची दया आली व तिला मारायचे नाही असे त्याने ठरवले. या सर्व गोष्टीमुळे शंकर शिकार्‍यावर प्रसन्न झाले. आणि त्यांनी शिकार्‍याला व हरिणीला विमानांत बसवून उध्दरून नेले. म्हणून जे लोक महाशिवरात्रीचे व्रत करतील ते सदैव सुखी रहातील असे म्हंटले जाते.

  • साजरा करण्याची पारंपारिक पद्धत :

महाशिवरात्रीला शंकराची पूजा करुन रुद्राभिषेक व उपवास करतात. या दिवशी बेलाच्या पानाला विशेष महत्त्व असते. अनेक ठिकाणी महाशिवरात्रीची जत्राही भरते. एकेका हिंदू देवतांची स्वत:च्या आवडीची फळे-फुले कोणती ते ठरलेले आहे. शंकराला बेलाचे त्रिदल आणि धोत्र्याचे फूल प्रिय आहे.

  • या दिवशी सर्वांनी उपवास करण्याची पध्दत आहे. सकाळी स्नान वगैरे करून शंकराला जाऊन बेलाची पाने व कवठ हे फळ शंकराला वाहिले जाते. आंब्याला या सुमारास मोहोर येतो. महाशिवरात्रीला शंकराला आंब्याचा मोहोर वाहण्याचीही प्रथा आहे. हाताने तयार केलेल्या कापसाच्या दोर्‍याच्या ७५० वाती करून शंकराच्या देवळात किंवा घरातील देवापुढे या वाती तुपांत भिजवून लावल्या जातात.
  • वैशिष्ट्य :

ह्या पवित्र दिवशी शिवशंकराला रुद्राभिषेक करणे, जप करणे, बेल पत्र वाहणे, उपास करणे इ. गोष्टी आवर्जून केल्या जातात. शिव म्हणजे कल्याण, शिव म्हणजे ज्ञान, महाशिवरात्रीच्या उपासनेमुळे उपासकाचे निश्चितच कल्याण होते. त्याला ज्ञान प्राप्त होते. त्याला उत्कर्षाचा, मुक्तीचा विकासाचा मार्ग सापडतो.

शंकरास प्रसन्न करण्यासाठी शिवलिलामृत, काशीखंड सारख्या ग्रंथांचे वाचन किंवा ‘ॐ नमः शिवाय’ ह्या पंचाक्षरी मंत्राचा जप करण्याची देखील प्रथा आहे. तसेच अनेक भावीक यानिमित्ताने बारा ज्योतीर्लिंगाची यात्रा देखील करतात.

  • खाद्यपदार्थ :

उपवास असल्याकारणे साबुदाणा खिचडी, रताळी, बटाटे यांपासून केलेले जिन्नस खाण्याची प्रथा आहे.