पंचकर्म

१) आजारानुसार पंचकर्म

आयुर्वेदात व्याधीच्या अवस्थांचे वर्णन आहे .पेशंट ची आजाराची लक्षणे पाहून ,नाडी आणि पोट तपासून वैद्यास व्याधीची अवस्था कळते.अशा काही अवस्थांमध्ये गोळ्या काढे औशधे देऊन व्याधी आटोक्यात राहीनासा,बरा होण्यासारखा नसतो.अशावेळी हे उपचार उपयोगी ठरतात.

२)आजाराचा जोर कमी करण्यासाठी लाक्षणिक उपचार म्हणूनही काहीवेळा हे उपचार करावे लागतात.

उदा.खूप दिवस मलप्रव्रुत्ती न झाल्यास , मलाचे खडे झाल्यास बस्ती देतात. दम्यात कफाची घरघर वाढलेली असताना कधीकधी तात्कालिक उपाय म्हणून वमन द्यावे लागते.

३)ऋतू नुसार शरीरात दोषांचे प्रमाण कमी जास्त होत असते, अशावेळी काही आटोक्यात असलेल्या(सध्या लक्षणे न दिसणार्या) व्याधी बळावतात्,जोर धरतात अशा व्याधीत त्यापूर्वीच्या ऋतूत हे उपचार करावे लागतात.

४)विशिष्ट आजार लक्षणे नसणार्या व्यक्तीस तिच्या शरीरातील दोषबदल पाहून ऋतू नुसार एखादा उपचार सुचवला जाउ शकतो. उदा. स्थूल (obese ) स्वेदन.

५) आयुर्वेदात सांगितलेल्या रसायन उपचारापूर्वी हे उपचार केले जातात

पंचकर्माचा साधारण कालावधी

प्रथम पंचकर्म उपचार म्हणजे हे सगळे उपचार एकत्र घ्यायचे हा समज चुकीचा आहे.

व्याधीच्या गरजेनुसार,ऋतूनुसार्,प्रक्रुती(body constitution)नुसार रुग्णास उपचार केला जातो.

काहीवेळा शोधन उपचारापूर्वी चे पूर्वकर्म (स्नेहन आणि स्वेदनाचे उपचार ) केल्यानंतर दोषांची गती ( दिशा पाहून रुग्णाचे पोट आणि नाडी तपासून गरजेनुसार जवळच्या मार्गाने दुषित दोषांना) शरीरातून बाहेर काढले जाते. अशावेळी वमनासाठी औषध द्यायचे का विरेचनासाठी हे त्या त्या वेळी ठरते.

दोषांच्या शक्ती नुसार प्रमाणानुसार तसेच आजारानुसार पूर्वकर्म साधारणपणे ३ ते ५ दिवस करावे लागते

त्यानंतर रुग्णाचे पोट आणि नाडी तपासून गरजेनुसार वमन किवा विरेचन दिले जाते

बस्ती,नस्य हे उपचार काही दिवस सतत/दिवसाआड/एका दिवसातून दोनदाही गरजेनुसार करावे लागतात

रक्तमोक्षण त्या आजाराच्या लक्षणांनुसार करावे लागते.

काही आजारांमध्ये पूर्वकर्म (स्नेहन-स्वेदन) हीच मु़ख्य उपचार म्हणून केली जातात.

 पंचकर्मा साठी पथ्य

कोणत्याही उपचारात पथ्यास खूप महत्व आहे,मग ती कोणतीही उपचार पद्धती असो.

हे उपचार करण्यापूर्वी,ते सुरू असताना आणि त्यानंतरही काही दिवस आहार विहारा संबंधीचे पथ्य पाळावेच लागते.यात अगदी खाण्यापिण्यापासून ,गरम कपडे,

आंघोळीसाठी गरम पाणी ,थंड हवेत न जाणे , दिवसा न झोपणे ई. सर्व काटेकोर पणे पाळावेच लागते.

इतर उपचारांप्रमाणेच ह्या उपचारातही अयोग- अतीयोग असे धोके असतात, मात्र अनुभवी,वैद्याकडून उपचार झाल्यास ते नगण्य असतात.

ह्या उपचारानंतर शरीर घटक दोषांचे प्रमाणात रहाणे योग्य आहारविहाराने,काही वेळा काही औषधांच्या सहाय्याने राखता येऊ शकते .

पण हे उपचार एकदा केले म्हणजे झाले असे नेहमीच नसते. बर्‍याच व्याधीत त्यांच्या अवस्थेनुसार्/ऋतू बदलान्चे परीणाम म्हणून नंतरही ते आवश्यकतेनुसार करावे लागतात.

वेगवेगळ्या व्याधीत,लक्षणानुसार,वयानुसार ह्या उपचारात वापरली जाणारी औषधी तेले-तुपे,काढे,शेकाचे प्रकार वेगवेगळे असतात.

या उपचारास मर्यादा आहेत, कोणावरही सरसकट हे उपचार करता येत नाहीत आजाराच्या विशिष्ट अवस्था,वय,गर्भार स्त्री,अती नाजुक प्रकृतीची माणसे हे अपवाद ठरू शकतात.

यासर्व उपचारापूर्वी,उपचार चालू असताना आणि पूर्ण उपचार संपल्यानंतर(त्यानंतर जावा लागणारा पथ्याचा कालावधी झाल्यावर) त्या त्या आजारानुसार लक्षणान्ची ,vital signs ची नोंद ठेवली जाते.

पंचमहाभूत विचार

भारतीय विचारपरंपरा आणि आयुर्वेदानुसार सर्व जीवसृष्टी ही पंचमहाभूतांपासून (पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश) बनलेली आहे. शरीराची आकृती, घनत्व, गंध, (वास), इत्यादी गोष्टी पृथ्वीतत्त्वापासूनः होतात. रसत्व, जलत्व, रुचिज्ञान आपतत्त्वापासून येतात. वर्ण, रूप, उष्णत्व हे तेजतत्त्वापासून; आणि हालचाल वायुतत्त्वापासून येतात. पोकळया (स्त्रोतस) आणि पोकळ मार्ग आकाशतत्त्वापासून होतात. असे आपले शरीर पंचमहाभूतांपासून बनलेले आहे. ज्ञानेंद्रियेही एकेका पंचमहाभूताचे प्रतिनिधित्व करतात. याप्रमाणे दृष्टीज्ञान-तेजतत्त्व, ध्वनिज्ञान – आकाशतत्त्व, रुचिज्ञान -आपतत्त्व. हालचाल, स्पर्शज्ञान-वायुतत्त्व. गंध, वास- पृथ्वीतत्त्व असा संबंध आहे.

पंचमहाभूतांपासून त्रिदोष तयार होतात असा यापुढचा सिध्दान्त आहे. पृथ्वी आणि आप यांपासून मुख्यतः कफदोष, तेजापासून पित्तदोष, वायू-आकाश यांपासून वातदोष तयार होतो असे मांडले जाते.

पंचकर्म म्हणजे आयुर्वेदाने सांगितलेल्या पाच उपाययोजना.

  • नस्य(नाकात थेंब घालणे)
  • वमन(उलटी करवणे)
  • विरेचन(कोठा साफ करण्यासाठी जुलाब घडवणे. रेचक देणे)
  • बस्ती(गुदाशयात टिकणारी तैलयुक्त औषधयोजना)
  • रक्तमोक्षण(जळवामार्फत किंवा शिरेतून रक्त काढणे)

त्रिदोषांतील निरनिराळया दोषांसाठी निरनिराळी कर्मे उपयुक्त आहेत. आजारांच्या माहितीबरोबर यांपैकी कोणती क्रिया करायची हेही पाहू या.

नस्य

नस्य म्हणजे नाकात औषधी थेंब किंवा चूर्ण टाकणे. नाकाच्या पोकळीत सायनसची तोंडे उघडतात. नाकातील नेहमीचे स्त्राव अंतर्भाग ओलसर ठेवतात. यामुळे फुप्फुसात जाणारी हवा ओलसर दमट होते.यामुळे फुप्फुसांना कोरडेपणा येत नाही. मात्र हा स्त्राव जास्त प्रमाणात निर्माण झाला तर तो नाकपुडयांच्या बाजूच्या कप्प्यांमध्ये साठून राहतो.

हा चिकट पदार्थ हवेच्या मार्गातही येतो. शरीर-डोके उभ्या अवस्थेत असताना हे स्त्राव बाहेर पडणे अवघड असते. मात्र डोके लोंबते ठेवले तर हे स्त्राव बाहेर पडायला मदत होते. यासाठी डोके अगदी उलटे न करता आडवे झोपवून मान, डोके खाटेच्या बाहेर लोंबकळू दिले की पुरते.

आधी त्या व्यक्तीचे (डोळे सोडून) गाल, नाक, कपाळाचा भाग तेल चोळून कपडयाने शेकल्यास सायनस पोकळयांमधील स्त्राव सुटायला मदत होते. यानंतर त्या व्यक्तीस हाताचे तळवे एकमेकांवर चोळायला सांगून थेंब सोडावेत.

या अवस्थेत नाकात काही औषधी थेंब टाकल्यास हे स्त्राव सुटायला मदत होते. तेल, मिठाचे पाणी (अश्रूंच्या इतके खारट), सुंठ-शिकेकाई उगाळलेले सौम्य पाणी, इत्यादींचे थेंब वापरले जातात. प्रत्येक नाकपुडीत याचे दोन-तीन थेंब टाकलेले पुरतात. थेंब टाकताना थोडा वेळ झणझणते. पण याने काही अपाय होत नाही. या अवस्थेत थेंब टाकल्यावर थेंब डोक्याकडे जातात हे त्या व्यक्तीस स्पष्ट जाणवते (या अवस्थेत थेंब घशात उतरत नाहीत.)

या अवस्थेत डोके दोन-तीन मिनिटे तसेच राहू द्यावे. मग उठून गुळण्या करावयास सांगावे. डोळा, कान, नाक यांचे आरोग्य सुधारण्यास, सायनस मोकळे होण्यास, डोकेदुखी (काही प्रकारची) थांबण्यास नस्य चांगले उपयोगी आहे. दीर्घकाळची सायनसदुखी नस्य क्रियेने सुधारते असा अनुभव आहे. मिरगी-फेफरे (फिट येणे) यांसारख्या आजारांच्या उपचारात जाग आणण्यासाठी नस्य फारच उपयुक्त आहे.

वमन

अनेक प्रकारचे त्वचारोग, दमा, सांधेदुखी, सूज, आम्लपित्त, इत्यादी आजारांवर वमन (उलटी) करवणे हिताचे असते. अन्नमार्गातला कफ घालवून स्वच्छ, रिकामा करणे हे वमनक्रियेचे उद्दिष्ट आहे. अशी स्वच्छता वेळोवेळी न केल्यास अन्नमार्गात कुजण्याची क्रिया होते. त्यातून निर्माण होणारे विषारी पदार्थ निरनिराळे आजार उत्पन्न करतात असे आयुर्वेदाचे सांगणे आहे.

वमनक्रिया तज्ज्ञांकडून शिकून घेणे आवश्यक आहे. वमनक्रिया स्वतःवर करून पाहावी म्हणजे आत्मविश्वास येईल.

वमन क्रियेसाठी अन्नमार्गात नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात स्त्राव पाझरवून त्यावर कडू गिळगिळीत पदार्थ देऊन उलटी करवली जाते. गावात कडू पडवळ, कडू दोडका, कडू इंद्रावण, इत्यादी फळे सापडतात, ती यात उपयोगी पडतात.

आधी तीन-चार दिवस थोडे थोडे तूप पाजावे.

वमनाआधी दही, उडदाच्या डाळीचे वरण खावयास द्यावे.

यावर तीन चार तास गेल्यावर मदनफळाचे चूर्ण किंवा इंद्रावण एक ग्रॅम + एक चमचा काढा किंवा कडू दोडके किंवा पडवळ यांचा काढा पाजावा.

यानंतर दोन ते पाच मिनिटांनी उसाचा रस (एक -दीड लिटर ) पाजावा, म्हणजे भरपूर घाम येऊन भडभडून उलटी होते. उलटीत चिकट तार, फेस येणारे स्त्राव पडतात.

असे चांगले वमन झाल्यावर लगेच काही खाऊ देऊ नये. वमन घेतल्याच्या दिवशी भूक लागल्यावर केवळ साळीच्या लाह्या खाव्यात. त्यांना साजूक तुपाची फोडणी देऊन गरम गरम खाव्यात. तहान लागल्यास गरम पाणीच प्यावे.

दुसरे दिवशी तांदळाची पेज, मग मऊ भात त्यानंतर मुगाच्या डाळीपासून बनवलेली खिचडी आणि मग गव्हाचे गरम फुलके, पोळी अशा पध्दतीने आहार दोन-तीन दिवसांत वाढवत जाऊन पूर्ववत आणावा. यालाच संसर्जनक्रम असे म्हणतात.

वमनानंतर काही दिवसांत वरील प्रकारच्या आजारांत फरक पडतो.

विरेचन

विरेचन म्हणजे रुग्णास अगोदर तीन-चार दिवस रोज तूप किंवा तेल पाजून नंतर जुलाबाचे औषध देणे. पित्तदोषाच्या आजारांना (आग, जळजळ, लालसरपणा ही लक्षणे असणा-या आजारांत) विरेचन सांगितले जाते. विरेचनाचा उद्देशही पित्त घालवून कोठा साफ रिकामा करणे हाच आहे. वमनात मुख्यत्वेकरून जठर, इत्यादी वरचा अन्नमार्ग स्वच्छ होतो. याउलट विरेचनात आतडी वगैरे खालचा अन्नमार्ग साफ होतो.

विरेचनासाठी आधी तीन -चार दिवस तित्तक तूप (म्हणजे कडू औषधांनी तयार केलेले तूप) 15-20 मि.ली. या प्रमाणात रोज सकाळी रिकाम्या पोटी घेण्यास सांगावे.

यानंतर संध्याकाळी जेवणानंतर दोन-तीन तासांनी त्रिफळा चूर्ण (2-3 ग्रॅम) एक कप गरम पाण्यातून द्यावे. जेवणानंतर हे चूर्ण देणे जास्त परिणामकारक ठरते.

पहाटेपासून सकाळपर्यंत दोन-तीन जुलाब होतात. हलका कोठा असणा-यांना त्रिफळा चूर्णाऐवजी बहाव्याचा दोन-तीन ग्रॅम मगज पाण्यात कुस्करून दिला तरी अपेक्षित परिणाम होतो.

सकाळी जुलाब झाल्यानंतर भूक लागली तरी 4-5 तास काही खाऊ नये. नंतर तोंडाने मूग-तांदळाची पातळ खिचडी द्यावी.

सर्वसाधारणपणे वमनक्रियेनंतर विरेचन दिले जाते. या दोन्हींचा परिणाम होऊन अन्नमार्ग साफ होतो.

बस्ती

बस्ती म्हणजे तैलयुक्त औषधे (कधी केवळ तेल) गुदद्वारातून मोठया आतडयात सोडणे. तेथून तेल शरीरात शोषले जाते. या स्नेहनाने (तेलकट पदार्थाच्या वापराने) आतडयातील कोरडे मळाचे थर सुटतात. तेल आतडयात शोषले जाऊन काही आवश्यक घटकांचा पुरवठा होतो. बस्तीमध्ये यासाठीच आहारातले अनेक पदार्थ वापरले जातात. या पदार्थाच्या वापराप्रमाणे बस्तीचे प्रकारही पाडले आहेत.

आपण एनिमाबद्दल (गुदद्वारात साबण पाणी) ऐकले असेल. एनिमाचा उद्देश गुदाशयातील आणि त्यामागच्या भागातील विष्ठा, मळ काढून टाकणे हा असतो. मात्र बस्ती वेगळी असते. एनिमामध्ये साबण-पाणी विष्ठेबरोबर बाहेर पडते. याउलट बस्तीत दिलेला पदार्थ आत राहून शोषला जातो. एनिमा छोटया दोन-तीन इंच नळीद्वारे दिला जातो तर बस्ती देताना लांब रबरी नळी वापरली जाते. एनिमा देताना अर्धा-पाऊण लिटर पाणी वापरले जाते, मात्र बस्तीत जास्तीत जास्त 150 मि.ली. मिश्रण दिले जाते. 40-60 मि.ली. ची बस्ती (लहान बस्ती) मात्रा बस्ती म्हणून ओळखली जाते. मात्रा बस्ती देणे सोपे असते.

लहान मुलांमध्ये-अगदी नवजात अर्भकालाही बस्ती देता येते. अपु-या दिवसांच्या नवजात बाळांची वाढ नियमित बस्तीमुळे सुधारते असा अनुभव आहे. फक्त शरीराच्या आकारमानाप्रमाणे आतडयाचा आकार लहान मोठा असतो. हे लक्षात घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली आपल्यालाही बस्ती शिकता येईल.

बस्तीआधी त्या व्यक्तीस मलमूत्र विसर्जन करून येण्यास सांगतात. बस्तीसाठी औषधी काढे, सैंधव, वनस्पतीची कुटलेली चटणी, तेल, इत्यादी वापरून मिश्रणे तयार केली जातात. हे सर्व मिश्रण पिचकारीमार्फत मोठया आतडयात सोडले जाते. यासाठी त्या व्यक्तीला डाव्या कुशीवर झोपवावे. पायथ्याची बाजू किंचित उंच करून गुदद्वारातून एक रबरी नळी (8 ते 13 क्रमांकाची लघवी काढण्याची नळी) तेलाने बुळबुळीत करून 3 ते 5 इंच आत सारावी. त्यानंतर नळीच्या टोकाला पिचकारी जोडून दांडा दाबून मिश्रण आत ढकलावे.

आत द्यायचे मिश्रण शरीराच्या तापमानापेक्षा किंचित गरम असावे. असे मिश्रण पिचकारीने नळीने हळूहळू आत सोडले जाते. पिचकारीऐवजी सलाईनप्रमाणे बाटली वर टांगून त्याला नळी जोडूनही मिश्रण थेंब थेंब आत सोडता येते. असे करायचे असेल तर चिकटपट्टीने रबरी नळी गुदद्वारास चिकटवून ठेवावी लागेल. या पध्दतीने बस्ती आत टिकून राहते.

सुमारे 6 ते 24 तासांत हे मिश्रण आतडयातून पूर्ण शोषले जाते, जेवढा वेळ बस्ती आत राहील तेवढे चांगले. बस्ती क्रियेनंतर पचन सुधारते. बस्तीने नेहमीचे अन्न चांगले अंगी लागते असा अनुभव आहे.

रक्तमोक्षण

रक्तमोक्षण म्हणजे रक्त काढणे. आयुर्वेदात यासाठी जळवांचा वापर करतात. पण आधुनिक पध्दतीने सुई, सिरींज वापरूनही रक्तमोक्षण करता येते. पण त्वचाविकारात, गळू पिकले असल्यास मात्र जळवांचा उपयोग होत नाही. रक्तमोक्षण करायचे असल्यास जळूचा वापर अधिक योग्य आहे. इतर उपचारांत सुई, इत्यादी वापरण्यास हरकत नाही. रक्तदान करण्यानेही रक्तमोक्षणाचे काम होते. या दृष्टीने पाहू जाता रक्तदान त्या व्यक्तीस स्वतःला उपकारकही आहे.

जळू वापरून रक्तमोक्षण करणे अगदी सोपे आहे. पण यासाठी जळवा पाळणे आवश्यक आहे. नद्या-नाल्यांच्या दलदलीत, ऑगस्ट ते डिसेंबर काळात या जळवा मिळू शकतील. त्या रुंद तोंडाच्या एका बाटलीत जमा करून ठेवता येतात. बाटलीत थोडे पाणी व थोडी माती टाकावी (अगदी चिमूटभर माती पुरते). बाटलीच्या झाकणास एक-दोन भोके पाडावीत म्हणजे हवा खेळती राहील.

मात्र पाणी नळाचे असेल तर त्यात क्लोरिन वायू असण्याची शक्यता असते. असे पाणी दहा-बारा तास परातीत उघडे ठेवून क्लोरिन वायू जाऊ देऊन वापरावे. नाहीतर या पाण्याने जळवा मरतील.

जळवांना उष्ण तापमान सोसत नाही. म्हणून उन्हाळयात, ऑक्टोबरच्या उष्णतेत जळवांची बरणी माठात, ओल्या फडक्यात ठेवणे आवश्यक आहे. जळवांना माती पुरते, वेगळे खाणे लागत नाही. जळवा निवडताना लहान-मध्यम आकाराच्या (पाच इंचांपेक्षा जास्त लांब नको), आणि पट्टे नसणा-या निवडाव्यात. पट्टेरी जळवा विषारी असतात.

जळू लावायची वेळ आल्यावर ती आधी पाण्याच्या लहान भांडयात टाकावी. या पाण्यात चिमूटभर हळदपूड टाकावी. यामुळे जळू भराभर हालचाल करू लागते. मग ती जळू वापरावी. त्वचेवर जळू लावताना त्यावर स्पिरीट, आयोडीन, इत्यादी काही न लावता फक्त पाण्याने दोन-तीन वेळा पुसून घ्यावे. जळू खराब त्वचेवर लावावी. जळू रक्त शोषते आणि रक्त शोषताना तिचे तोंड घोडयाच्या खुराप्रमाणे दिसते. रक्त शोषताना ते लाटालाटांनी जळवेच्या शेपटीपर्यंत पोहोचते व जळू हळूहळू फुगते. जळवेचे शेपूट आधारासाठी त्वचेवर टेकलेले असते. रक्त शोषून पूर्ण फुगलेली जळू आपोआप गळून पडते. पण आधी काढायची असल्यास तोंडापाशी चिमूटभर हळद किंवा मीठ टाकल्यास काम होते. रक्त प्यायलेली जळू लगेच पाण्यात टाकून त्यावर चिमूटभर हळद टाकावी. म्हणजे रक्त ओकून जळू रिकामी होते. हे करण्याचा आळस करू नये नाहीतर रक्त प्यायलेली जळू मरून जाण्याची शक्यता असते. जळू हलके हलके शेपटाकडून तोंडाकडे दाबूनही रक्त बाहेर काढता येते. रिकामी केलेली जळू दोन-तीन दिवसांनी परत लावता येते. लगेच लावू नये. जास्त रक्त काढायचे असल्यास दोन-तीन जळवा वापराव्यात. प्रत्येक जळू 10-15 मि.ली. रक्त शोषू शकते.

स्वस्थ आणि निरोगी व्यक्तींनी पंचकर्मे करून घेताना वमन वसंत ऋतूच्या सुरुवातीस करून घ्यावे. कारण वसंत ऋतूमध्ये शरीरातील कफाचा प्रकोप होतो. वमन हा कफावरील उत्तम उपचार आहे. त्याप्रमाणे विरेचन शरद ऋतूमध्ये, रक्तमोक्षण शरद ऋतूमध्ये आणि बस्ती वर्षाऋतूमध्ये करवून घ्यावी.