शंकरराव खरात (जुलै ११, १९२१ – एप्रिल ९, २००१) हे मराठी लेखक, कादंबरीकार होते. ते मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरूही होते. शंकरराव खरात हे यांचा जन्म आटपाडी येथे झाला. `तराळ-अंतराळ’ हे त्यांचे आत्मचरित्र गाजले. `मी स्वत: महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा शिष्य आहे` असे ते नेहमी म्हणत. इ.स. १९५८ ते १९६१ या काळात `प्रबुद्ध भारत` या नियतकालिकाचे त्यांनी संपादनही केले. इ.स. १९८४ साली जळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते..

`शंकराण्णा तुम्ही असाच साहित्य लेखनात जोर केला पाहिजे. आपण पुढं एकदा माडगूळलाच साहित्य संमेलन घेऊ ` असे माडगूळकर यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्याप्रमाणेच प्रा. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, शंकर पाटील, प्रा. द.मा. मिरासदार यांच्यासोबत आचार्य प्र.के. अत्रे, शिरीष पै यांनी त्यांना लेखनासाठी उत्तेजन दिले. इ.स. १९५७ साली त्यांची नवयुग दिवाळी अंकात, वयाच्या पस्तीसाव्या वर्षी `सत्तूची पडीक जमीन ` नावाची पहिली कथा प्रकाशित झाली. त्यांनतर रामा महार, बंडा मांग अशा बलुतेदारांच्या बारा कथा त्यांनी नवयुगमध्येच लिहिल्या.

इ.स. १९५७-५८ मध्ये शंकरराव खरातांची `माणुसकीची हाक’ ही महार बलुतेदारावर लिहिलेली कादंबरी गाजली. त्यामुळे ते पुढे लेखक म्हणून उदयाला आले. साहित्याच्या ओढीने त्यांनी राजकारणही सोडले.