पोशाख ( मध्ययुगीन पोषाखाचे स्वरूप )

इसवी सनाच्या सातव्या शतकापासून पुढे मुसलमानी सत्ता भारतात उदयास येईपर्यंत भारतातील पोशाकांमध्ये अनेक बदल होते गेले. मात्र अकराव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंतच्या काळात भारतीय पेहेरावावर मुस्लिम पेहेरावपद्धतीचा परिणाम झाल्याचे दिसून येते. तरीही भारतीय वैशिष्ट्य त्यात टिकून राहिलेच.

मुसलमानी अमलात मराठी पुरुष तंग तुमान व अंगरखा घालीत. पुढेपुढे खांद्यावर घट्ट बसणारा व पुढे सुटा असलेला लांब व सैल झगा (चोगा) घालण्याची पद्धत पडली. त्यानंतर अचकन (गुडघ्यापर्यंत पोहचणारा व पुढे गुंड्या असलेला लांब कोट-शेरवानी) प्रचारात आली. अठराव्या शतकाच्या शेवटी ब्राह्मण लोक डाक्क्याच्या मलमलीचा, भरतकाम केलेला तंग अंगरखा व रुंद लाल रेशमी काठांची नागपुरी धोतरे नेसत. बाहेर जाताना ते नडियादचा गडद लाल रंगाचा फेटा बांधीत. धोतर कधी कधी कमरेभोवती पायघोळ गुंडाळून घेऊन समोर गाठ मारीत. ही धोतरे उत्तम रंगाची वेलबुटीची किंवा भरतकाम केलेली असत. बंगाली लोक धोतर नेसत व अंगावर लांबरुद चादर (शाल) घेत. काही लोक फेटा बांधीत. सरदारवर्ग दरबारप्रसंगी जरीचा वा तत्सम घोट्याइतका लांब झगा वापरीत. महाराष्ट्रीय पुरुषाच्या डोक्यावर पागोटे, तिवट, पटका, मंदिल, फेटा व बत्ती यांपैकी काहीतरी असे. लहान मुले बंदाच्या टोप्या वापरीत. त्या जरीच्या किंवा मखमलीच्या देखील असत. श्रीमंतांची वस्त्रे जरीची, रेशमी व उंची लोकरीची असत. ते शालजोडी वापरीत. सामान्य लोक पासोडी वापरीत; तर गरीब लोक कमरेला लंगोटी’, खांद्यावर घोंगडी व डोक्याला छोटेसे मुंडासे गुंडाळीत, महाराष्ट्रीय स्त्रिया नऊवारी लुगडी नेसून अंगात खणाची चोळी घालीत. लग्न-मुंजीसारख्या समारंभप्रसंगी शालू वा पैठणी यांसारखी भरजरी पातळे नेसत व धार्मिक प्रसंगी रेशमी रंगीत वस्त्रे घालीत. विशेष प्रसंगी अंगावर शेला घेत.

मुसलमानांचाही असाच पेहेराव असे. ते विविध प्रकारच्या टोप्या वापरीत. वायव्य सरहद्द प्रांत (सध्या पाकिस्तानात) व पंजाबमधील (भारत आणि पाकिस्तान) मुसलमान पगडी घालीत. इतर भागांत राजे-सरदार वगैरे विशेष प्रसंगीच पगडी वापरीत. प्रथम मुसलमानी स्त्रियांचा पोशाख पुरुषांप्रमाणेच असे. फक्त रंग तेवढा वेगळा. बाहेर जाताना त्या बुरखा घेत. पुढेपुढे त्या सैल कपडे घालू लागल्या. तसेच डोळे व नाकाजवळ जाळी असलेला डोक्यापासून पायापर्यंत सर्वांग झाकणारा काळा किंवा रंगीत बुरखा त्या वापरू लागल्या.

परकर-पोलके

पारंपारिक म्हणून नावाजलेले परकर-पोलके,  मुलगी तीन वर्षांची झाली की मुलीची आत्या आपल्या भाची साठी पहिल्यांदा परकर-पोलके शिवायची. मुलगी वयात येईपर्यंत ती ते वापरत असे. हे  परकर-पोलके मुखत्वे करून  धटवाडी खणाचे असे. पूर्वी बायका घरातच ते शिवणकाम करीत असत. कमरेपर्यंत शिवलेले पोलकं आकर्षक दिसवं म्हणून  फुगा बाही, पफ बाही  कौतूकाने शिवली जात असे. केसांच्या घटट रिबीनी लावलेल्या दोन वेण्या, पायात पैंजण, पोटापर्यंत उंचीचा पोलका आणि पायाच्या लांबी इतका परकर असा बहुतेक मुलींचा पेहराव असे.

प्रिंटेड चिट चा कपडा वापरायची त्या काळी आवड होती. त्यावरची नक्षी ही नाजूक पण आकर्षक असायची. किशोरवयीन वयातील चंचलता, आणि दंग मस्ती लक्षात घेऊनच हा पेहेराव बनवला गेला होता.  मुलींना खेळतांना परकराचा छानसा ओचाही बांधता यायचा. हल्ली पारंपारिक परकर पोलक्यात आधुनिक बदल करून आवडीने घातले जातात.

नऊवारी साडी

भारतीय संस्कृती ही विश्वातील काही प्राचीन संस्कृतींपैकी एक. वेशभूषा आणि अलंकारांची विशेष आवड असणा-या भारतीयांसाठी, साडी हा महत्त्वाचा पेहराव आहे. असे मानले जाते साडीचे आगमन पाच हजार वर्षांपूर्वी झाले. काळानुसार, जीवनशैली आणि प्रदेशांनुसार साडी नेसण्याच्या पध्दतीत बदल होत गेले. साडीच्या बरोबरीने अनेक पेहराव आले, फॅशन बदलल्या तरी साडीचे अस्तित्व आजही टिकून आहे. वैश्विक बदलांमधे अनेक जीव, वस्तू, वास्तू लोप पावल्या, काळाच्या ओघात काही टिकल्या तर काही नवीन रुपात सामो-या आल्या. साडी ही त्यापैकीच एक. ‘साडी’ ह्या शब्दाचा उगम ‘सत्तिका’ या प्रक्रित शब्दापासून तयार झाला तर काहींच्या मते ‘चीरा’ (कापड) ह्या संस्कृत शब्दापासून झाला. हडप्पा संस्कृतीत बायका व पुरुष, दोघेही धोतर नेसत आणि बायका त्याच कापडाचे एक टोक शरीराचा वरचा भाग व डोके झाकायला घेत.

सध्या पाचवारी साडया प्रचलीत आहेत. ह्या साडया प्रसंगानुसार विविध पध्दतीने नेसल्या जातात. आतातर  डिसायनर साडयाही बाजारात उपलब्ध आहेत. भारतात साडी नेसण्याच्या साधरणपणे १०-१५ विविध पद्धती आहेत. प्रत्येक प्रांत आणि भाषेप्रमाणे साडी नेसण्याची पध्दती बदलत जाते. नऊवारी साडी हे महाराष्ट्राचे वैशिष्टय, लाल काठ आणि पांढ-या रंगाची साडी व त्यावर फ्रीलचे ब्लाऊज हे बंगाली बहूच नेसणार, कांजीवरम सोनेरी काठ असणा-या रेशमी साडया दक्षिणेची खासीयत, बांधणी नेसणारी डोक्यावर घेणारी मारवाडी नववधू, त्याउलट साडीला फक्त गुंडाळून घेणा-या आदिवासी स्त्रिया …. साडयांची ही कितीतरी विविध आणि वैशिष्टयपूर्ण रुपं.

साडयांचे रंगही प्रसंगानुरुप ठरवले गेलेले आहेत. लाल, हिरवा रंग नववधूसाठी, शांत आणि सौम्य रंग खानदानी स्त्रियांसाठी, भगवा रंग साधवींसाठी तर पांढरा रंग विधवांसाठी. काळानुसार विचार बदलत गेले आणि आपल्या आवडीप्रमाणे साडयांचे रंग घेण्याकडे स्त्रियांचा कल वाढू लागला.

नऊवारी ही महाराष्ट्राची पारंपारिक साडी. आजच्या आधुनिक काळात पाचवारी साडया वापरायला सोयीच्या असल्या तरी पण महाराष्ट्रातल्या गावांमध्ये आणि अपवादाने शहरांमधेही प्रौढ स्त्रिया नऊवारी साडयाच नेसतात. किंबहूना तरुण मुलीही मंगळागौरींना, लग्नात, मुंजीत अगदी कॉलेजच्या ‘साडी डे’ ला ही ठेवणीतली आजीची जुनी पण खास नऊवारी साडी नेसतात. अशी ही नऊवारी साडीची जादू वर्षानूवर्ष टिकून आहे. ‘नऊवारी’ चा शब्दशा अर्थ आहे नऊ-वार सलग कापड. न शिवलेले/कापलेले सलग कापड पुराण काळापासून अतिशय पवित्र मानले गेले आहे. हे कापड सुती, रेशीम असे विविध पोत आणि विविध रंगात असणारे असते. नक्षीकामाने पदर आणि काठाचे सौंदर्य अधिक उठून दिसते. राजा-महाराजांच्या जमान्यात तर सोन्या-चांदीच्या तारांनी नक्षीकाम केले जायचे. नऊवारी साडीच्या आत परकर घालावा लागत नाही, नऊवारीचा खालचा भाग धोतरासारखा असतो. शारीरिक काम करण्यसाठी नऊवारी नेसणे सोयीचे होते. इतिहास जागवणा-या राणी लक्ष्मीबाई,  जिजाबाई, अहिल्याबाई, ह्या नऊवारीतच वावरल्या, सावित्रीबाई, आनंदीबाई जोशी ह्यांनी आपल्या कार्याचा प्रसार नऊवारी नेसूनच केला. त्या काळी बायका ही साडी घट्ट नेसून पोहायलाही जायच्या!  आजही शेतात काम करणारया बायका, मजूर आणि आपल्या घरातली आजी (अपवादाने) सुध्दा नऊवारीत असतेच की.

ही नऊवारी साडी नेसायची कशी ? धोतर व नऊवारी नेसण्यात खूप साम्य लक्षात येईल. साडीचा मध्य दोन भागात घडी करून काढायचा. मग तो मध्य मागे कंबरेवर ठेऊन साडीची दोन टोकं पुढे आणाय ची. त्यांची पोटावर घटट गाठ मारायची. त्यानंतर ती दोन्ही टोके पायांमधून काढून उजव्या टोकाला नि-या घालून पाठीमागे कंबरेत खोचून द्यायचे. डाव्या टोकाला पायाभोवती घेऊन उजव्या खांद्यावर पदरासारखे टाकायचे. झाली नेसून नऊवारी ! हल्ली तरुणींना नऊवारी नेसणे एक आव्हान झाले आहे. त्यामुळे काळाची गरज म्हणून बाजारात आयत्या शिवलेल्या साडया उपलब्ध आहेत. असे म्हणतात, एकोणीसव्या शतकातले प्रतिभावंत चित्रकार राजा रवी वर्मा, हिंदू देवतांचे चित्र रेखाटण्यासाठी स्त्रियांच्या उत्कृष्ट वस्त्राच्या शोधात होता. अखेर त्यांनी नऊवार साडी पसंत केली, कारण हीच एक अशी साडी होती जी कुठल्याही आकाराच्या शरीराला शोभून दिसू शकत होती. त्यामुळेच कदाचित राजा रवी वर्माच्या सर्व चित्रांमधल्या देवतांनी नऊवारीच नेसल्या आहेत!

पैठणी

पैठणी ही मराठी स्त्रीची शान समजली जाते. काहीशी महाग असणारी पैठणी पूर्वी हाताने विणली जायची, त्यावर रंगकाम, भरतकाम  करणारे कलाकार होते. पैठणी बनवण्याची कला साधारण २००० वर्ष जुनी आहे. पैठणीचे मूळ गाव म्हणजे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले मराठवाडयातले ‘प्रतिष्ठान’ म्हणजेच आताचे पैठण. प्राचीन काळात पैठण रेशीम व जरीच्या व्यापाराचे महत्त्वाचे ठिकाण होते. त्यावेळी रोमन देशाच्या राजाला कापसाचे सूत व रेशीम धागा निर्यात केला जायचा. १८व्या शतकात पेशव्यांचे राज्य होते. पेशव्यांनी पैठणींच्या उत्पादनाला प्रोत्साहन आणि चालना दिली. माधवराव पेशवे यांनी येवल्यात करागीरांना पैठणी विणायला सुरूवात करुन दिली. म्हणून पेशवे इतिहासात येवला हे पैठण इतकेच प्रसिद्ध झाले. असे मानले जाते की हैदराबादचा निजामही या पैठणीवर फिदा होता व त्या निमित्ताने त्याने पैठणला प्रत्यक्ष भेटी दिल्या. त्याची स्नूषा निलोफर हिनेही पैठणीच्या काठ व पदरावरचे नक्षीकाम सुचवले होते. मात्र इंग्रजांच्या राज्यात बाकी स्थानिक कलांसारखीच पैठणी तयार करण्याची कलाही कमी होत गेली.

पैठणी ही साडी जगभरात ‘रेशीम आणि जरीत विणलेली कविता’ म्हणून प्रसिद्ध आहे. आकर्षक, गडद रंग, नाजूक रेशीम, (मागणी नुसार अस्सल सोन्याच्या तारांचा) जरीचा काठ पैठणीला साडयांमध्ये सर्वात वरचे स्थान मिळवून देते. एक साडी पूर्ण करायला एक महिना ते एक वर्ष लागतो. आता जरी आधुनिक यंत्र उपलब्ध असली तरी उत्कृष्ट पैठणी ही फक्त हातानेच विणता येते असे विणकरांचे ठाम मत आहे. आधी पैठणीसाठी लागणारे रेशीम चीनहून आयात केले जायचे. मात्र अलिकडे बंगलोर मधून रेशीम मागवतात.

पैठणीचे रंग आणि नक्षी वैशिष्टपूर्ण असते. पैठणी मुख्यता दोन रंगात असते. एक साडीचा मूळ रंग व  दुसरा काठावरचा रंग. काही साडया ‘कॅलिडोस्कोपिक’ असतात. म्हणजे त्या साडीची वीण दोन रंगातली असते व आपल्याला कधी एक तर कधी दुसरा असे झटकन बदलणारे रंग दिसतात. पैठणी विणण्याकरता काही ठरलेले रंग आहेत. पैठणीत वापरण्यात येणारे रंग असे – पोफळी (ऑकर), लाल (रेड), फिक्कट जांभळा (लॅवेंडर), जांभळा (वायोलेट), निळा (ब्लू), किरमिजी तांबडा (मॅजेंटा), मोतीया (पर्ल पिन्क), वांगी (ब्रिन्जॉल), मोरपंखी (पिकॉक ब्लू). पूर्वी हे सर्व रंग नैसर्गिक असायचे. वेगवेगळ्या भाज्या, फळे, फुले यांच्यापासून ते तयार होत. कॅलिडोस्कोपिक रंग असे वापरले जातात – कुसूंबी (लाल/जांभळा) , लाल/हिरवा, काळा/पांढरा, लाल/काळा, पिवळा/हिरवा.

पैठणी साडीवरची नक्षी देखील वैशिष्टपूर्ण आहे. अजिंठा लेण्यांच्या प्रभावामुळे पैठण कारागीरांवर बौध्द धर्माचा प्रभाव अधिक होता. हा प्रभाव त्यांच्या नक्षीकामातही जाणवतो जसे कमळाचे फूल, हंस, फूलांची वेलबुटटी, नारळी, मोर, राघू-मैना इत्यादीचा वापर अत्यंत आकर्षकपणे केला जातो.