” वाचाल तर वाचाल “

आपण वाचलेल्या पुस्तकाचे रसग्रहण पाठवा. त्आया बरोबर आपला थोडक्यात परिचय आणि छायाचित्र .

Email address- marathiglobalvillage@gmail.com

ग्रंथ तुमच्या दारी या योजनेचाही आपण लाभ घेऊ शकता.

मराठी वाचक जेथे ,

ग्रंथ तुमच्या दारी तेथे .

ही यात्रा आहे अत्यंत चळवळ्या,वाचाल तर वाचाय या उक्ती प्रमाणे वाचन संस्कृती वाढीस लागावी या साठी प्रामाणिक प्रयत्न करणा-या श्री विनायक रानडे यांची.त्यांच्या

विक्रमी घोडदौडीला सलाम . जिथे म्हणून मराठी शब्द ,मराठी भाषा आहे ,मराठी माणूस आहे तिथे तिथे आमची योजना जावी अशी त्यांची इच्छा आहे.

महाराष्ट्र , गोवा , गुजराथ , दिल्ली , सिल्व्हासा, तामिळनाडू ,  कर्नाटक तर भारताबाहेर दुबई , नेदरलँड , टोकियो , अटलांटा , स्वित्झरलॅन्ड , ऑस्ट्रेलिया , फिनलँड , वॉशिंग्टन अशी ही ग्रंथ दिंडी निघाली आहे.

जगभरात आज मराठी माणूस नाही अशी भूमी नाही म्हणजेच ग्रंथ तुमच्या दारी योजनेच्या भरारीला आता आकाशाला गवसणी घालण्यास कोणतीच बंधने नाहीत,

ग्रंथ तुमच्या दारी योजनेतील सहभागी सर्व वाचक , समन्वयक , संस्था , देणगीदार , हितचिंतक यांच्या सक्रिय सहभागानेच हा विस्तार होत आहे .

वाढदिवस , एकसष्ठी , पंच्याहत्तरी , सहस्त्र चंद्र दर्शन तसेच दिवंगत आप्तेष्टांच्या स्मरणार्थ अशा अनेक प्रसंगानुरूप मिळालेल्या भारतात ८० जी अंतर्गत आयकरात सूट असलेल्या देणग्यांमुळे असंख्य मराठी वाचकांना  त्यांच्या निवासी भागात , कार्यालयात , दवाखान्यात अशा त्यांच्या जवळपासच्या भागात वाचनासाठी विनामोबदला विनासायास उपलब्ध होत आहेत .

वाचन संस्कृतीच्या समृद्धीसाठी प्रत्येकाने त्याच्या वाढदिवसानिमित्त पुस्तक खरेदीसाठीकुसुमाग्रज प्रतिष्ठानला यथा योग्य देणगी द्यावी या आवाहनालाही उस्फुर्त तसेच उदंड प्रतिसाद मिळतो

नाशिकच्या ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’चे विनायक रानडे. ते प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि वाचनालय समितीचे अध्यक्ष आहेत. त्या योजनेचा गेल्या सहा वर्षांतील प्रवास थक्क करणारा आहे.

आजच्या नेटयुगात संगणकाच्या पडद्यावर क्षणार्धात ग्रंथच्या ग्रंथ, पुस्तकेच्या पुस्तके आणि वैचारिक मंथन उपलब्ध होऊ शकते, या पार्श्वभूमीवर रानडे यांची ‘ग्रंथ तुमच्या दारी’ ही योजना लक्षणीय ठरते. रानडे यांना ही कल्पना सुचली तरी कशी? ते म्हणतात, ”वाचनालय ही महाराष्ट्राची गेल्या दीडशे वर्षांची परंपरा आहेच; पण ग्रंथालयापर्यंत न जाताही पुस्तक घरी आणून मिळाले, निदान घराच्या अगदी जवळ उपलब्ध झाले तर वाचक ग्रंथ- पुस्तकांकडे अधिक वेगाने आकृष्ट होतील असे वाटले. त्यातून या कल्पनेचा जन्म झाला…

विनायक रानडे मूळचे नाशिकचे. मध्यमवर्गीय घरात त्यांचा जन्म झाला. त्यांनी प्रांजळपणे त्यांचे एक स्वप्न सांगितले,

“आमच्या घरात मला लहानपणापासून कधी फळे आणली, की ती कापून फोडी करून, सर्वांनी मिळून खायची सवय होती. त्या काळी ‘विको वज्रदंती’च्या जाहिरातीत जसे अख्खे सफरचंद खातात तसे मला ते खायचे होते. मला पहिला पगार मिळाला तेव्हा मी पहिल्यांदा सफरचंदाच्या गाडीशी उभा राहून, एक पूर्ण सफरचंद एकट्याने खाल्ले! मला स्वप्नपूर्तीचा आनंद मिळाला खरा, पण एक सफरचंद दहाजणांत वाटून खाण्याची गंमत हरपल्याचेही ध्यानी आले.’”

रानडे यांनी पुण्याच्या ‘विद्यार्थी गृहा’त तीन वर्षे राहून प्रींटिंगचा डिप्लोमा मिळवला. नंतर ते नाशकात येऊन छपाईची लहानमोठी कामे करू लागले. त्या दरम्यान त्यांचे लग्नही झाले होते. त्याच काळात ते सर्व संवेदनाशील नाशिककरांप्रमाणे कुसुमाग्रजांच्या संपर्कात आले.

रानडे यांचा ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’च्या विश्वस्त मंडळातील ‘अध्यक्ष’ हे पद सांभाळताना खरा कस लागत आहे. त्यातूनच त्यांच्या अनेक कल्पक योजना साकारल्या गेल्या आहेत. त्यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे ‘ग्रंथ तुमच्या दारी!’ हा उपक्रम. अचाट जनसंपर्काची अफाट हौस हा रानडे यांचा मोठा आवश्यक विरंगुळा आहे. माणसाच्या मनापर्यंत पोचण्यासाठी त्याच्या ‘जन्मदिनाच्या  शुभेच्छां’चे निमित्त मोठे छान असते. त्यांनी आत्मियता पोचवण्याचा तो एक मार्ग निवडला. संबंधितांपैकी प्रत्येकाला शुभेच्छा देण्याचा चंगच त्यांनी बांधला. जनसंपर्क वाढत गेला, तशा विविध कल्पनाही त्यांना सुचू लागल्या. त्यांनी शुभेच्छा देता देता लोकांना वाढदिवसाच्या दिवशी पुस्तकांचा उपयोग करा अशी कल्पना सुचवली. लोकांना ती आवडत गेली. ‘प्रतिष्ठान’कडे पुस्तकांसाठी निधी जमवण्यासाठी नाशिकमधून सुरुवात केली आणि महत्त्वाचे लोक Tap केले तर? असा विचार मनात आल्यावर रानडे यांनी त्यांचा जनसंपर्काचा डाटा अभ्यासला. त्याचे गटनिहाय वर्गीकरण केले. उदाहरणार्थ पत्रकारांचा गट, मित्रमैत्रिणी यांचा गट, नात्यागोत्यातील मंडळींचा गट अशा सर्वांशी संपर्क साधला.

या सगळ्या धडपडीतून ‘ग्रंथपेटी’ची संकल्पना समोर आली आणि ‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजनेला प्रारंभ झाला.

योजनेची उद्दिष्टे :

वाचन संस्कृतीचे पुनरुज्जीवन, वाचन संस्कृतींचे संवर्धन करणे, लोकांमध्ये संवाद वाढवणे, टीव्ही, मोबाईल, ईमेल यांमध्ये अडकत चाललेल्या नव्या पिढीला वाचनाने दिशा देणे.

ग्रंथ तुमच्या दारी योजनेतील एक अनोखा उपक्रम :

वाचकांनी  त्याला आवडलेले

पुस्तक मोफत घेऊन जावे

आणि आपल्या जवळील

एक पुस्तक देऊन जावे

वाचून झालेली जास्तीत जास्त पुस्तकं बदलून घेऊया

सुस्थितीतील दर्जेदार

योजनेचे थोडक्यात स्वरूप :

पस्तीस जणांच्या एका वाचकसमूहाने काम करण्यासाठी त्यांच्यातीलच एक समन्वयक (Coordinator) निवडायचा. समन्वयकाने पुस्तके वाचण्यासाठी ‘प्रतिष्ठान’कडे ग्रंथपेटी मिळवण्यासाठी अर्ज करायचा.

प्रतिष्ठान आणि समन्वयक यांमधील कराराची कलमे अशी:

करार शंभर रुपयांच्या मुद्रांक कागदावर केला जातो. या करारात वाचकांना ग्रंथ वाचनासाठी उपलब्ध करणे, त्यांच्याकडून परत घेणे, ग्रंथ गहाळ झाल्यावर अथवा फाटल्यास त्याच्या छापील किंमतीची भरपाई करणे इत्यादी. करारपत्रात समन्वयकावरील जबाबदारीचा उल्लेख आहे. शंभर रुपयांच्या मुद्रांक कागदाचा खर्च ‘प्रतिष्ठान’ करते.

पेटीतील शंभर पुस्तकांत अनेक साहित्यिकांचे नवे-जुने कथासंग्रह, कादंबऱ्या, नाटके, ललित लेख, अनुवादित कादंबऱ्या, आत्मचरित्रे, लेखसंग्रह असतात. वीस हजार रुपयांपर्यंत किंमतीची ती पुस्तके समन्वयकाच्या स्वाधीन केली जातात.

सहकारी बँका/ पतपेढ्या, ग्रंथ प्रकाशक या ग्रंथपेट्यांचे प्रायोजक असून काही वैयक्तिक वाचकांनी स्वत:चा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, एकसष्टी, सहस्रचंद्रदर्शन अथवा आप्तजनांच्या स्मरणार्थ अशा दिलेल्या देण्ग्यांतून या पेट्या निर्माण झाल्या आहेत.

पाचशे रुपयांपासून कितीही जास्त रकमेची देगणी स्वीकारली जाते.

‘ग्रंथपेटी वाचनालय’ सुरू करावे असे रानडे यांचे आवाहन आम जनतेला आहे. ग्रंथपेटी चार महिने एका वाचक समूहाकडे ठेवता येते. ग्रंथांची देवाण घेवाण करण्याचे ठिकाण समन्वयक आणि वाचकांच्या संमतीने ठरते. सभासदाकडून अनामत रक्कम घेण्याची मुभा आहे.

दर्जेदार विविध विषयांची , लेखकांची २५ पुस्तकांची एक पेटी असेल,

ज्यामध्ये उत्तमोत्तम ,निवडक मराठी अथवा इतर भाषांतील साहित्याचा मराठीत अनुवाद असलेली  पुस्तके असतील .

साहित्याचे ,लेखनशैलीचे जास्तीत जास्त नमुने जसे कथा , कादंबरी , विनोदी , रहस्य , चरित्र , प्रवासवर्णन .

थोडक्यात सर्व समावेशक ग्रंथ संपदा देण्याचा  आटोकाट प्रयत्न असेल.

एका वाचक कुटुंबाकडे सदर ग्रंथ पेटी २ महिन्यांच्या कालावधी साठी असेल . किमान एक वाचक ते ग्रंथ पेटीतून वाचनासाठी सहजगत्या पुस्तक घेवून जावू शकणारे जवळपास वास्तव्यास असणारे जास्तीत जास्त १० वाचकांना यामुळे वाचनाचा आनंद घेत येईल .

योजना सुरु करताना किमान १२ ग्रंथ पेट्या विविध भागातील वाचकांसाठी उपलब्ध व्हाव्यात .

प्रत्येक ग्रंथ पेटीतील पुस्तके वेगवेगळी असतील . कुसुमाग्रज प्रतिष्ठान च्या निवड समिती मार्फत प्रत्येक पेटीत वैविध्यपूर्ण तसेच कोणतेही पुस्तक दुसऱ्या पेटीत सारखे होणार नाही याची दक्षता घेतली जाते .

दर २ महिन्यांनी वाचक गटातील ग्रंथ पेटी इतर गटांसोबत बदलली जाते .

वैद्यकीय सेवा , दुकाने , कामानिमित्त भ्रमंती  तसेच कारखानदारी  यामुळे कामाच्या व्यापात बुडालेल्या आमच्या मराठी वाचक बांधवांना वाचनासाठी वाचनालयात जाणे शक्य होत नाही .  पुस्तके कोणती व किती विकत घ्यावी आणि वाचून झाल्यावर त्यांचे पुढे काय ?अथवा ग्रंथ तुमच्या दारी योजनेत सहभागी होण्यासाठी ३५ वाचकांचा समूह होवू न शकणे . अशा वाचन प्रेमींसाठी ग्रंथ तुमच्या दारी योजनेचे माझे ग्रंथालय हा नवा उपक्रम ठाणे , मुंबई , नाशिक , पुणे . . .  कालांतराने सर्व शहरात सुरु करीत आहोत

‘प्रतिष्ठान’कडे एक कोटी सत्तर लाख रुपयांची ग्रंथसंपदा जमा झाली आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दिल्ली, सिल्व्हासा, तामिळनाडू, कर्नाटक तसेच भारताबाहेर दुबई, नेदरलँड, टोकियो, अटलांटा, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी ‘ग्रंथ तुमच्या दारी’शी संबंधित वाचकवर्ग विखुरलेला आहे.

‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजनेला आजवर भरघोस प्रतिसाद मिळत आलेला आहे. पेटी वाचनालायची शतकपूर्तीकडे वाटचाल होत आहे. रानडे यांच्या उपक्रमात ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. रंगनाथन यांनी मांडलेल्या पाच परिमाणांचे पालन होत आहे. ते पाच नियम असे –

१. ग्रंथ उपयोगासाठी आहेत, २. ग्रंथाला वाचक हवा, ३. वाचकाला ग्रंथ उपलब्ध व्हायला हवा, ४. वाचकाचा वेळ वाचायला हवा आणि ५. वाचकांमध्ये वाढ व्हायला हवी.

‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ आणि ‘nab इंडिया मोडक सेंटर, नाशिक’ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील एकवीस अंध शाळांना ‘बोलकी पुस्तके’ या पेट्यांचे वितरण करण्यात आले आहे. मुंबई पश्चिम विभागाच्या सहकार्याने वर्तक कॉलेज, बोरीवली येथे शंभर पुस्तकांच्या पंचवीस ग्रंथपेट्यांचे वितरण करण्यात आले आहे. मुंबई पश्चिम विभागाचे समन्वयक डॉ. महेश अभ्यंकर यांच्या नेतृत्वाखाली आणि सह समन्वयक असलेले अशोक काणे, अरुण शिरस्कर, घनश्याम देटके, भाग्यश्री राव व अनेकांच्या सहकार्याने गौरवास्पद घौडदौड होत आहे. अल्पावधीतच एकशेपंचवीस ग्रंथपेट्यांचा विस्तार हे यश लक्षणीय आहे. राज्य मराठी विकास संस्था, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या आर्थिक सहकार्यामुळे वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी कार्यरत असलेल्या या योजनेला मोलाची साथ मिळाली आहे.

असंख्य वाचक, समन्वयक, देणगीदार, सहभागी संस्था, हितचिंतक यांचा सक्रिय सहभाग योजनेला लाभत आहे. ‘अखिल भारतीय नाट्य परिषदे’तर्फे ५ नोव्हेंबर २०१६ रोजी मराठी रंगभूमी दिनानिमित्त करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात, ‘ग्रंथ तुमच्या दारी’चा ग्रंथसेवेबद्दल विशेष योगदान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

त्‍या सगळ्या घौडदौडीमागे विनायक रानडे आणि त्यांच्या चमूचे अथक परिश्रम आहेत.

विनायक रानडे – 99 22 22 5777 (What’s up – 9423972394)

vinran007@gmail.com

‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’, तरण तलावामागे, टिळकवाडी, नाशिक- ४२२००२, महाराष्ट्र.

http://granthtumchyadari.blogspot.com