वेचिले, कुटुंब पोशिले’ ही जगरहाटी आहे, पण समाजाकडून उपेक्षित अशा, दुर्दैवाने देहविक्रय करणार्‍या स्त्रिया व मुलांना आधार देणारे विरळा! नागपूरचे रामभाऊ इंगोले यांचे कार्य या दुर्लक्षित क्षेत्रात आहे. १९८०च्या सुमारास जांबुवंतराव धोटे यांनी वेश्यांच्या पुनर्वसनासाठी मोहीम सुरू केली. या मोहिमेत राम इंगोले नावाचा हा सामान्य माणूसही सामील झाला होता. निरागस मुला-मुलींचे चेहरे पाहिल्यानंतर या निरागसांनी वाईट धंद्यात का उतरावे, त्यांच्यासाठी आयुष्याचे काहीच ध्येय नाही का, हा प्रश्न त्यांना सतत छळू लागला. या देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलाबाळांसाठी आपण काहीतरी करू शकतो, हा विचार मनात आला आणि विमलाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली.  गेल्या ३२-३३ वर्षांपासून सुरू असलेल्या मार्गक्रमणातील अनेक टप्प्यांवर त्यांनी अनेक कटू प्रसंगांना तोंड दिले आहे..

रामभाऊ इंगोले यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते, त्यामुळे रामभाऊंना लहानपणापासून समाजसेवेचे जणू बाळकडू मिळाले. त्यांच्या कार्याची सुरुवात नागपूरमधील वेश्यावस्ती हटवण्यासाठी कटिबद्ध असलेल्या षड्यंत्राविरुद्ध लढा देण्यापासून, १९८० मध्ये झाली. रामभाऊंवर अनेक वेळा गुंडांकडून हल्ले झाले, तरीही ते त्या आंदोलनात डगमगले नाहीत. वेश्या या समाजाच्या घटक असूनही त्यांना त्यांचे हक्क नाकारले जातात. वारांगनांच्या व त्यांच्या मुलांच्या उन्नतीसाठी त्यांनी १९९२ साली ‘विमलाश्रम घरकुला’ची स्थापना केली. तेव्हापासून ती संस्था उपेक्षित व वंचित मुलांचे पुनर्वसन करत आहे. त्यांना समाजात सन्मानाने जगता यावे म्हणून स्वावलंबी बनवत आहे. संस्थेच्या विद्यमाने ‘पाचगाव’ येथे ‘नवीन देसाई निवासी’ विद्यासंकुल उभे राहिले आहे. वीस मुलांपासून सुरू झालेल्या या शाळेत दोनशे विद्यार्थी आहेत.

शेतकर्‍यांचे नैराश्य व दारिद्रय दूर करण्यासाठी, त्यांनी शेतकर्‍यांच्या मुलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. त्याचबरोबर खाणीत काम करणार्‍या मजुरांच्या मुलांसाठी त्यांनी ‘देसाई फन स्कूल’ सुरू केले आहे. त्याची पुनर्वसनाची चळवळ नागपूर जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता अमरावती , अकोला , सुरत या ठिकाणीही पसरली आहे. त्यांनी मानवी हक्कांसाठी लढताना वेगवेगळ्या चळवळींमध्ये सहा वेळा तुरुंगवास भोगला आहे.

१. रोटरी क्लब ऑफ नागपूर, ऑरेंज सिटी पुरस्कार
२. रोटरी क्लब इंटरनॅशनल तर्फे ह्युमॅनिटेरियन सर्विस सेंटेनरी पुरस्कार
३. दीनदयाळ उपाध्याय सेवा पुरस्कार
४. सह्याद्री नवरत्न सेवा पुरस्कार
५. दीपस्तंभ पुरस्कार

अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. त्यांच्या जीवनावर आधारित ‘आधारवड’, ‘तळपत्या तलवारी’, ‘वारांगनांच्या मुलांचा आभाळाएवढा बाप’ अशी पुस्तकेही प्रसिद्ध केली गेली आहेत. ‘गोल्डन आय ग्रूप’ने त्यांच्या कार्यावर आधारित सिनेमा केला आहे, त्याचे दिग्दर्शन अरुण नलावडे यांनी केले आहे.

हे कार्य अखंड सुरूच रहावे हीच इच्छा..
विमलाश्रम आणि नवीन देसाई निवासी शाळेत देहविक्रय करणाऱ्या महिलांचीच नव्हे तर खाण कामगार, मजूर, रस्त्यावर टाकून दिलेली अनाथ मुलेदेखील येऊ लागली आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र, रामभाऊंच्या मर्यादा आहेत. संख्या वाढल्याने मदतीसाठी याचकासारखे रोज धावावे लागते. अनेक सेवाभावी संस्था, जवळचे मित्र आणि दानशूरांच्या भरवशावर किती दिवस पुढे ढकलायचे हा त्यांच्यापुढील सर्वात मोठा प्रश्न आहे. या मुलांची उद्याची जबाबदारी कोण घेणार, हा विचार नेहमीच त्यांना सतावतो. तरीही माझ्यानंतर एखादा निश्चितपणे हे अवघड कार्य पुढे चालवू शकेल, या विश्वासाने समाधानाची शांत झोपसुद्धा लागते. पण, समाजाने मदतीचा हात दिला तरच हे शक्य आहे..

  • पत्रव्यवहारासाठी पत्ता

    Vimalashram Gharkul, AmrapaliUtkarshSangh(AUS) 

    Nagpur Umred Road,Pachgaon

  • दूरध्वनी

    +919881213298,9860990514

  • ई-मेल

    Vimlashram@yahoo.co.in