वासुदेव चाफेकर

वासुदेव चाफेकरांचा जन्म १८८० मध्ये कोकणात चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांनी मराठी भाषेमधून शिक्षण घेतले. राजकारणात आणि क्रांतिकारी कारवायांमध्ये दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर या त्यांच्या बंधुंसह सहभाग घेतला. भारतीय तरुणांना शस्त्रांचे प्रशिक्षण दिले. रँडच्या पुण्यातील वाईट वागणुकीबद्दल त्याच्या वधाचा कट रचला. त्यांना अटक करून खटला चालविण्यात आला. अखेर येरवडा तुरूंगात फाशी देण्यात आली.

चाफेकरांचे वडील हरिपंत, पुणे व मुंबईत हरिकथा सांगायचे. त्यांमुळे चाफेकर बंधूंच्या शिक्षणात खंड पडला. बालवयात तिघेही भाऊ हरि कीर्तनात वडिलांना मदत करायचे. पुण्यातील राजकीय घडामोडींनी प्रेरीत होऊन चळवळीकडे वळले. ब्रिटिशांनी आणलेल्या संमती वयाच्या विधेयकास त्यांचा तीव्र विरोध होता. भारतीय संस्कृतीत हस्तक्षेप करणा-या ब्रिटीशांबिरूद्ध टिळकांनी केसरीमधून घणाघाती प्रहार करायला सुरूवात केली होती. या आवाहनाने तीनही भाऊ प्रेरित झाले. त्यांनी लोकसंघटन केले. याचवेळी पुण्यात प्लेगच्या साथीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याने ब्रिटिशांनी वॉल्टर चार्ल्स रॅंडला भारतात पाचारण केले. रॅंडचे प्लेग रोग निवारण करण्याच्या नावाने अत्याचाराचे सत्र सुरु झाले. रॅंडने सामाजिक पायदंड पायदळी तुडवून लोकांचा असंतोष ओढवून घेतला. यामुळे चाफेकर बंधूच्या मनात ब्रिटिशाविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला. या सा-याचा सूड घेण्याची योजना त्यांनी तायर केली.

त्यावेळी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा हिरकमहोत्सव साजरा करण्यात येत होता. सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती. तसेच मेजवानी चे आयोजन करण्यात आले होते. दामोदर चाफेकर या तरुणाने गाडी काढली व गणेश खिंड येथे वाट पाहत २२ जून १८९७ सालच्या मध्यरात्री निवास्थानातून बाहेर पडलेल्या रॅंड ह्याचेवर जवळून गोळ्या झाडल्या. रॅड हा काही काळ कोमात राहिला व कालांतराने ३ जुलै १८९७ रोजी मरण पावला.

याचवेळेस दामोदराच्या भाऊ बाळकृष्णाने रॅंड सोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरीस्टवर गोळ्या झाडल्या. चाफेकर बंधू निसटण्यास यशस्वी झाले तरी नंतर तिघाही भावांना पकडण्यात आले. दामोदराला मुंबईत अटक झाली व १८ एप्रिल १८९८ रोजी त्यास फासावर चढवण्यात आले. त्यापाठोपाठ वासुदेवाला ८ मे १८९९ व बाळकृष्णाला १६ मे १८९९ रोजी फासावर चढवण्यात आले. चाफेकर बंधू देशाकरीता शहीद झाले.