चंदन वंदन

कथा आणि कादंबरी मध्ये जुळ्या भावा विषयी आपण नेहमीच ऐकत असतो मात्र दुर्गविश्र्वातही अशी जुळी भावंडे आढळतात त्यांच्यापैकीच एक चंदन-वंदन. सातारच्या अलीकडे २४ कि.मी. अंतरावर ही दुर्गजोडी उभी आहे. ऊसाच्या पिकामुळे सधन झालेला हा सर्व परिसर त्यामुळे रस्ते, वीज, एस्.टी. या सर्व प्राथमिक सुविधा गावा गावा पर्यंत पोहोचल्या आहेत. सपाट माथा असल्यामुळे पुणे-सातारा मार्गावरून हे किल्ले सहजच ओळखता येतात. यांच्या पूर्वेस जरंडेश्र्वर कल्याणगड, भवानीचा डोंगर, पश्चिमेस वैराट्गड, पांडवगड. एकीकडे महाबळेश्र्वर प्रांत तर दुसरीकडे सातारा शहर यांच्या सीमेवर हे किल्ले उभे आहेत.

इतिहास :
इ.स. ११९१-११९२ सालच्या ताम्रलेखानुसार हे किल्ले शिलाहार राजा दुसरा भोज याने बांधले. १६७३ च्या सुमारास शिवरायांनी सातारा प्रांत जिंकला आणि त्याचवेळी सज्जनगड, कल्याणगड, अजिंक्यतारा या किल्ल्यांसोबत यांना देखील स्वराज्यात सामील करून घेतले. पुढे संभाजी राजांच्या कारकिर्दीत सन १६८५ मध्ये फेब्रुवारी महिन्यात अमानुल्ला खानाने चंदन-वंदन येथे असणा-या मराठांच्या तुकडीवर हल्ला केला. या चकमकीत मोघलांच्या हातात २५ घोडी, २० बंदुका, २ निशाणे, १ नगारा सापडला. पुढे १६८९ पर्यंत हा सर्व परिसर मराठांच्या ताब्यात होता. नंतर मात्र तो मोगलांच्या हातात पडला. छत्रपती शाहुमहाराजांनी सन १७०७ मध्ये पावसाळ्यात हा प्रदेश जिंकून घेतला. पुढे सन १७५२ मध्ये ताराबाईवर लक्ष ठेवण्यास पुरेसा फौजफाटा देऊन बाळाजी विश्र्वनाथांनी या किल्ल्यावर दादोपंत यांची नेमणूक केली. नंतर हा किल्ला इंग्रजांच्या हातात पडला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
चंदनच्या प्रवेशद्वाराजवळील रस्ता पूर्वी बराच कठीण होता. मात्र सध्या तेथे असलेल्या मशिदीमुळे हा रस्ता बराच रुंद झाला आहे. दोन अर्धवट पडलेले बुरूज आपणास प्रवेशद्वाराची जाणीव करून देतात. येथून साधारण १५ पाय-या वर गेले असता डाव्या बाजूस एक पडकी वास्तू दिसते. तिच्या वरच्या अंगास एक वडाचे झाड आहे. पाच वडांचा मिळून बनलेला असल्यामुळे त्यास ‘पाचवड’ म्हणतात. बाजूलाच एक शंकराचे मंदिर आहे. यातील दोन्ही महादेवाच्या पिंडी या पाच लिंगांच्या आहेत. ग्रामस्थांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. श्रावणात येथे यात्रा असते. (येथून दहा एक पाय-या चढून गेल्यावर समोरच मोठा मोठा शिळा रचलेल्या दिसतात) वंदनप्रमाणेच येथेही एक दर्गा आहे. दर्ग्याच्या बाजूस एखाद्या वाड्याच्या भिंतीसारखे बांधकाम आढळते. एका अर्धवट दरवाजासारखे काहीतरी दिसते. साधारण सदरेसारखे येथील बांधकामाचे अवशेष दिसतात. याच्या मागील भागात सुद्धा अनेक उद्ध्वस्त अवशेष आपणास दिसतात. हीच गडावरील मुख्य वस्ती असावी. गडाच्या उत्तर टोकावर मजबूत बांधणीचा अगदी सुस्थितीत असलेला एक बुरूज आढळतो. याच वाटेवर एक समाधी आढळते. याच्या वरील बाजूस अस्पष्ट असे शिवलिंग आहे आणि एका बाजूस मारुतीची मूर्ती आहे. गडाच्या दक्षिणेकडे तीन कोठा असलेली पण वरचे छप्पर उडालेली वास्तू आढळते. गावक-याच्या मते हे कोठार म्हणजे दारूगोळा साठवण्याची जागा होती. गडाच्या मध्यभागी प्रशस्त चौथरा आहे. यावर काय वास्तू होती याचा मात्र अंदाज लागत नाही.

गडावर जाण्याच्या वाटा :
चंदन आणि वंदन या दोन्ही किल्ल्यांवर जाणा-या सयुंक्त वाटा आहेत. पुणे-सातारा मार्गावर भुईंज गाव आहे. तेथे उतरून २० कि.मी. अंतरावर किकली गाव आहे. वाई-सातारा या दोन्ही ठिकाणाहून किकलीला येण्यासाठी बस आहे. किकलीच्या जवळच बेलमाची नावाचे गाव आहे. या बेलमाची गावाचे दोन भाग आहेत. एक आहे ती खालची बेलमाची तर दुसरी वरची बेलमाची. येथूनच एक वाट चंदन आणि वंदन यांच्या खिंडीत पोहोचते. डावीकडे राहतो तो चंदन तर उजवीकडे वंदन. या चंदन किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत :

राहण्याची सोय :
 दर्ग्यात रहायचे असल्यास ३० ते ४० जणांना राहता येते.
जेवणाची सोय : नाही
पाण्याची सोय : फक्त पावसाळ्यात अन्यथा गडावर पाणी नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ : अडीच ते ३ तास