मराठी भाषेचा इतिहास

मराठी भाषा हि इंडो-आर्यन कुटुंबातील मानली जाते. साताऱ्यामध्ये सापडलेले तांब्याचे शिलालेख ७९५ सी.ई. चे मानले जातात. असेच काही शिलालेख रायगड जिल्ह्यातील अक्षी तालुक्यात सापडले जे १०१२ सी.ई. चे मानले जातात. दिवे इथे सापडलेले जमीन व्यवहाराचे तांब्याचे शिलालेख हे १०६० किंवा १०८६ सी.ई. चे आहेत. याचा अर्थ असा कि मराठी हि १२व्या शतकापर्यंत एक अधिकृत लिखित भाषा झाली होती. यादव काळ ११८७ सी.ई. नंतर यादव काळात मराठीचा वापर वाढला. यादव राजे अगोदर कन्नड आणि संस्कृत भाषा वापरत असत. १४ व्य शतकाच्या शेवटी पर्यंत मराठी वर्णलेखनाची प्रमुख भाषा झाली होती. असे मानले जाते कि यादवांनी मराठीला प्राधान्य दिले कारण ते मराठी बोलणाऱ्या प्रजेशी स्वतःला जोडण्याचा प्रयत्न करत होते. पुढे मराठी भाषेचा प्रसार महानुभाव आणि वारकरी पंथांमुळे झाला. यांनी आपल्या धर्माचा आणि शिकवणीचा प्रसार करण्यासाठी मराठीचा उपयोग केला. सेउण राज्याच्या काळात मराठी भाषा न्यायालयात सुद्धा वापरली जाऊ लागली. यादव राजवटीतील शेवटच्या तीन राज्यांच्या काळात ज्योतिष, आयुर्वेद, पुराण, वेदांत वर मराठी साहित्य गद्य आणि काव्य रूपात तयार करण्यात आले. मराठीतील सर्वात जुने गद्य पुस्तक हे “विवेकसिंधु” मानले जाते, जे मुकुंदराज यांनी लिहिले. मुकुंदराज हे एक नाथ योगी होते, ते त्या काळातील अग्रगण्य कवी होते. मुकुंदराजांनी शंकराचार्यांच्या कथन आणि शिकवणींवरून हिंदू तत्वज्ञान आणि योग मार्ग यांच्या मूलभूत सिद्धान्तांचे वर्णन केले. मुकुंदराजांचा “परमात्म” ग्रंथ मराठी भाषेत वेदांत स्पष्ट करण्याचा पहिला पद्धतशीर प्रयत्न समजला जातो. पुढे १२३८ मध्ये माहीमभट्ट यांनी “लीळाचरित्र” लिहिले, हे महानुभाव पंथातील चक्रधर स्वामी यांचे आत्मवृत्त होते. पुढे माहीमभट्ट यांनी चक्रधर स्वामी यांचे गुरु गोविंदप्रभू यांचे आत्मवृत्त “गोविंदप्रभूचरित्र” लिहिले. महानुभाव संप्रदायाने धर्म आणि संस्कृतीच्या प्रसारासाठी मराठीला वाहन बनवले. महानुभाव साहित्यात साधारणपणे देवतांच्या अवतारांचे वर्णन, संप्रदायाचा इतिहास, भगवद्गीतावरील टीका, श्रीकृष्ण भगवानांच्या कथा आणि व्याकरणाचे वर्णन करण्यात आले. मध्ययुगीन आणि डेक्कन सल्तनत कालावधी १३ व्या शतकातील महान वारकरी संत ज्ञानेश्वर यांनी भगवद्गीतेवर मराठीत “ज्ञानेश्वरी” ग्रंथ लिहिला. त्यांचे समकालीन, संत नामदेव यांनी मराठीत तसेच हिंदी भाषेत श्लोक, अभंग लिहिले. मुकुंदराज हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध कवी होते,त्यांनी “विवेक-सिद्धी” आणि “परममित्र ” ग्रंथ लिहिले जे पौराणिक वेदांताशी संबंधित आहेत. १६ व्या शतकात संतकवी एकनाथ यांनी “एकनाथी भागवत” लिहिले जे भागवत पुराणावरील भाष्य आहे. तसेच संत एकनाथांनी भारुडे सुद्धा लिहिले जी आजच्या काळातही प्रसिद्ध आहेत. संत तुकाराम महाराज यांनी मराठी एक समृद्ध साहित्यिक भाषा बनविली. संत तुकाराम यांनी सुमारे ३००० अभंग लिहिले. सल्तनत काळातही मराठीचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. या काळात जरी शासक मुस्लिम होते, तरी स्थानिक जमीनदार, महसूल अधिकारी आणि बहुसंख्य लोकसंख्या हिंदूच होती. यामुळे मराठीचा वापर व्यवहारात करण्यात आला. या काळात खूप सारे पर्शिअन शब्द मराठीमध्ये प्रचलित झाले, जसे बाग, शहर, कारखाना, बाजार, कागद, हुशार, जमीन, खुर्ची, हजार, जाहिरात आदी. हे शब्द आजही मराठीमध्ये वापरले जातात. मराठा साम्राज्य आज मराठी ज्या रूपात जिवंत आहे ती फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे, त्यांच्या काळात मराठीला खरे महत्व प्राप्त झाले. शासकीय कामकाज आणि बोली भाषा म्हणून मराठीचा विस्तार झाला. मराठी भाषेवरील पर्शिअन भाषेचा प्रभाव या काळातच कमी झाला. जसा जसा मराठी साम्राज्याचा विस्तार झाला तसा मराठीचा ही विस्तार झाला. या काळात मराठी ही मोडी लिपीत लिहली जात असे. १८ व्या शतकात, पेशवा काळात खूप मराठी साहित्य लिहिले गेले. यातील काळातील प्रसिद्ध काम म्हणजे वामन पंडित यांचे “यथार्थदीपिका”,रघुनाथ पंडित यांचे “नळदमयंती स्वयंवर”. या काळात नवीन साहित्यिक प्रकारचा प्रयोग करण्यात आला. संत एकनाथांचे नातू मुक्तेश्वर यांनी “ओवी” प्रकार निर्माण केला. त्यांनी महाभारत आणि रामायणाचे मराठी भाषांतर ही केले. याच काळात “पोवाडा” आणि “लावणी” प्रकारचा उगम झाला. अनंत फंदी, राम जोशी आणि होनाजी बाळा यांनी पोवाडा आणि लावणी प्रसिद्ध केले. ब्रिटिश राज कालावधी १९व्या शतकाच्या सुरुवातीला ख्रिश्चन धर्मप्रचारक विल्यम केरी यांनी मराठी व्याकरणाचे प्रमाणीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बायबल चे मराठी भाषांतरही केले. साल १८३१ मध्ये कॅप्टन जेम्स थॉमस मॉलवर्थ आणि मेजर थॉमस कँडी यांनी पहिला मराठी-इंग्रजी शब्दकोश (डिक्शनरी) संकलित केला. १८३२ मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिले मराठी वर्तमानपत्र “दर्पण”सुरु केले. याच काळात संगीत नाटक ही विकसित झाले. मराठी नाटकाच्या प्रसिद्धीमुळे मराठीचा विस्तार झाला. आधुनिक मराठी काव्याचे पिता केशवसुत यांनी आपली पहिली कविता १८८५ मध्ये प्रकाशित केली. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात निबंधकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी आपले नियतकालिक सुरु केले. ज्योतिबा फुले आणि गोपाळ हरी देशमुख यांनी “दिनबंधू” आणि “प्रभाकर” नियतकालिकांची सुरुवात केली. २०व्या शतकात मराठी भाषेने पुढचा टप्पा गाठला. मराठी साहित्य,नाटक, चित्रपट यांनी मराठी भाषा आणखी विस्तारली. एन.के. केळकर यांचे जीवनचरित्र लेखन, हरि नारायण आपटे, नारायण सीताराम फडके आणि व्ही. एस. खांडेकर यांचे कादंबरी, विनायक दामोदर सावरकर यांचे राष्ट्रवादी साहित्य आणि मामा वरेरकर आणि किर्लोस्कर यांची नाटके यांनी मराठी भाषा समृद्ध केली. भारतीय स्वातंत्र्यानंतर भारताच्या स्वातंत्र्यानंतर मराठीला घटना दुरुस्ती (आर्टिकल) ३४४(१) आणि ३५१ नुसार शासकीय राजभाषेचा दर्जा मिळाला. १९६७ मध्ये झालेल्या २१ व्या घटना दुरुस्तीपर्यंत १४ भाषांना अधिकृत दर्जा होता. आताच्या सुधारणेनुसार कोंकणी, मणीपुरी, सिंधी, आणि नेपाळी वगैरेंचा अधिकृत भाषांमध्ये समावेश करण्यात आला. त्यानुसार अधिकृत भाषांची संख्या ही २२ झाली. मराठीला अजूनही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही. यासाठी मागील दोन दशक प्रयत्न केले जाते आहेत. महाराष्ट्राच्या मुख्य मंत्र्यानी भारतीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे तसा अर्ज भरला आहे. एखाद्या भाषेला अभिजात भाषा ठरवण्यासाठी काही अटी असतात. त्या म्हणजे ती भाषा प्राचीन असावी (१५०० ते २००० वर्ष जुनी), प्राचीन आणि मूळ साहित्य हवे इत्यादी. संस्कृत, तेलुगू, तमिळ,कन्‍नड,ओडिया, मल्याळम या भाषांना अभिजात भाषा म्हणून मान्यता आहे. लवकरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा अंदाज आहे. १ मे १९६० मध्ये विदर्भ आणि मराठवाडा प्रदेश महाराष्ट्रात जोडण्यात आले. हे एकत्रीकरण भाषेच्या आधारावर झाले होते. राज्य आणि सांस्कृतिक संरक्षणामुळे ९० च्या दशकात मराठीभाषेची खूप प्रगती झाली. दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी नाटक संमेलन आयोजित केले जाते. तसेच दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम ठेवले जातात जसे “सवाई गंधर्व” इत्यादी जे मराठी कला, संगीत, संस्कृती आणि भाषेचा गौरव करतात. २०व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठीत उल्लेखनीय कार्ये झाली, यात प्रमुख वाटा होता तो म्हणजे खांडेकर, विजय तेंडुलकर, पु.ल. देशपांडे, विष्णू वामन शिरवाडकर, पी.के. अत्रे, प्रबोधनकार ठाकरे आणि आणखी खूप साहित्यिक, कलाकारांचा. २१ वे शतक २१ व्या शतकात व्यावहारिक फायद्यांमुळे इंग्रजीला खूप महत्व प्राप्त झाले. इंग्रजी भाषा सरकार सुद्धा व्यवहारासाठी वापरते. जागतिकारणामुळे इंग्रजीची मागणी वाढली. आता अशे दिसून येते कि शहरी भागातील पालक मुलांना इंग्रजी शाळेंत भरती करतात त्यामुळे हळू हळू मराठीचा ऱ्हास होऊ शकतो असे मानले जाते. मराठी चित्रपट, नाटक, संगीत, वर्तमानपत्रे हे आजच्या पिढीला मराठीशी जोडून ठेवण्यात आपली जबाबदारी बजावत आहे. निष्कर्ष मराठी हि एक प्राचीन आणि सुंदर भाषा आहे, तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे. बदलत्या काळात इंग्रजी सुद्धा शिकली पाहिजे, हिंदी सुद्धा बोलावी लागते पण जो गोडवा मराठीत आहे तो कशातच नाही. आपण वेळेनुसार बदलले पाहिजे पण याचा अर्थ असा नाही की आपण आपले मूळ, आपली भाषा, मराठी संस्कृती विसरली पाहिजे. यासोबत आपण हे पण लक्षात ठेवले पाहिजे कि आदर, प्रेम हे परस्पर असते, म्हणजे दोन्ही बाजूंनी ते असावे लागते. जर आपल्याला भारतात, जगात मराठीला आदर आणि प्रेम मिळवून द्यायचे असेल तर आपल्याला दुसऱ्या भाषेंचा सुद्धा आदर केला पाहिजे.

आद्य ग्रंथ

मराठी साहित्याचा आरंभ

इसवी सनाच्या दहाव्या शतकापर्यंत मराठी भाषेची चिन्हे शोधता येतात. आधीच्या काळातही तिचे अस्तित्व असावे याचेही काही उल्लेख आढळतात. मात्र, ‘लीळाचरित्र’ अथवा ‘ज्ञानदेवी’च्या आधीचे ग्रंथ उपलब्ध नसल्यामुळे आद्य मराठी ग्रंथ कोणता हा प्रश्न वारंवार उपस्थित होतो. मुकुंदराजांचा ‘विवेकसिंधु’ हा आद्यग्रंथ असे समजले जात असे. परंतु साहित्यसंशोधकांच्या मते तो इ.स. ११८८ च्या बराच अलिकडचा, म्हणजे ‘ज्ञानदेवी’ नंतरचा (इ.स. १२९०) असावा त्यामुळे इ.स. १२७८ च्या सुमारास रचला गेलेला ‘लीळाचरित्र’ हाच अभ्यासकांच्या मते आद्यग्रंथ ठरतो

इतिहासाचार्य राजवाडे यांनी ‘श्रीपतिकृत मराठी ज्योतिषरत्नमाला शक ९६१ सुमार’ या लेखात श्रीपतिगृह विरचित ज्योतिषरत्नमाला या संस्कृत ग्रंथाची त्याने स्वतःच केलेली टीका हा मराठीतील पहिला उपलब्ध ग्रंथ होय असे म्हटले आहे. मराठी वाङ्मयकोशात (खंड पहिला, संपादक श्री. गं. दे. खानोलकर) म्हटले आहे. ‘श्रीपतींची मराठी टीका गद्यात असून ती त्यांनी इ.स. १०५० मध्ये लिहिली. हा टीकाग्रंथ मराठीतील प्राचीनांत प्राचीन असा पहिलाच (उपलब्ध) गद्य ग्रंथ आहे असे आज तरी मानावयास हरकत नसावी.’ प्रा. श्री. रं. कुलकर्णी यांनी म्हटले आहे. ‘शक ९६१ च्या पूर्वीचा एकही मराठी ग्रंथ उपलब्ध नसल्यामुळे आणि ज्योतिषरत्नमालेचा (मराठी टीकेसह) काल याच सुमाराचा असल्याने श्रीपतिभट्ट, विरचित ज्योतिषरत्नमालेवरील टीका हा मराठी भाषेतला आद्यग्रंथ ठरतो.’(राजवाडे समग्र साहित्, खंड दुसरा, प्रस्तावना)

ज्योतिषरत्नमाला, विवेकसिंधु, लीळाचरित्र, ज्ञानदेवी या आरंभीच्या उपलब्ध ग्रंथांखेरीज मराठीत लिहिले गेलेले साहित्य असले पाहिजे. ग्रंथलेखनासाठी आज जशी सामग्री उपलब्ध आहे तशी प्राचीन काळी नव्हती. कागदावर लिहिलेले उपलब्ध असे प्राचीनतम हस्तलिखित म्हणजे विठ्ठल गलंडकृत ‘रसकीमोदी’ची इ.स. १५३४ मध्ये लिहिली गेलेली प्रत हे होय. त्र्यं.शं. शेजवलकर यांच्या मते पंधराव्या शतकापर्यत कागदाचा प्रसार महाराष्ट्रात नव्हता. ते म्हणतात, ‘महाराष्ट्रात बहामनी राजवटीत दौलताबाद, जुन्नर वगैरे ठिकाणी कागदाचे कारखाने निघू लागलेले असावेत. सोळाव्या शतकात पोर्तुगिजांच्या पश्चिम किनाऱ्यावरील आगमनामुळे त्यांच्या कागदाचा कोकणातून महाराष्ट्रात प्रवेश झाला. (शेजवलकर, १९६४) इरफान हबीब यांच्या मते, इ.स.१२२३-२४ मध्ये गुजरातमध्ये कागदावर लिहिलेले हस्तलिखित सापडले आहे. (हबीब, १९९६ : ३२) महाराष्ट्रात लेखनासाठी ताडपत्रांचा आणि कापडाचा वापर होत असावा. शिवकालापासून पुढे शिलालेख, ताम्रपट, कार्पासपट मागे पडून कागद सर्वत्र रूढ झालेला दिसतो. (शेजवलकर, १९६४)

लेखननिविष्ट वाङ्मय थोडेफार असेल, पण त्याहून मौखिक वाङ्मय बरेच असण्याची शक्यता आहे. राजवाडे यांच्या मते, शक १०५१ त (इ.स.११२९) मराठीत पद्य सारस्वत होते. ज्ञानदेवीपूर्वी १६१ वर्षे मराठीत पद्य सारस्वत होते हे आता निश्चित आहे असा त्यांचा निष्कर्ष आहे.

इ.स.११२९ मध्ये लिहिलेल्या ‘मानसोल्लास’ अथवा ‘अभिलषितार्थचिंतामणी’ तील मराठी पदापासून इ.स.१२९० मध्ये लिहिल्या गेलेल्या ज्ञानदेवीपर्यंतच्या मधल्या दीडशे वर्षात काहीही साहित्यनिर्मिती झालेली नसणे अशक्यच आहे. ती उपलब्ध नाही एवढेच.

उपलब्ध ग्रंथांच्या आधाराने मराठी साहित्याच्या इतिहासाचा आरंभ यादवकालात होतो. सातवाहन ते यादव हा जसा राजवटींमधल्या बदलाचा काळ आहे तसाच महाराष्ट्री-प्राकृत, महाराष्ट्री-अपभ्रंश, मराठी हा भाषित परिवर्तनाचाही काळ आहे. साहित्यात संस्कृतऐवजी प्राकृताचा अवलंब ही गोष्ट जरी सातवाहनांच्या काळात घडलेली असली तरी धर्मकारणासाठी मराठीचा अवलंब ही घटना यादवकाळातच घडलेली आहे. मराठीच्या आरंभकाळातले उपलब्ध साहित्य मनोविनोदनासाठी लिहिले गेलेले साहित्य नसून जनसाधारणांच्या आध्यात्मिक मुक्तीसाठी लिहिले गेलेले आहे. त्यामुळे मराठी साहित्याचा इतिहास लिहिताना केवळ राजवटींचा इतिहास उपयोगाचा ठरत नाही. राजवटींबरोबरच विविध ग्रंथ आणि संप्रदाय यांचाही मागोवा घेणे अटळ ठरते. मराठीतल्या आरंभकाळातल्या साहित्याला विविध उपासना पंथांनी प्रेरणा दिलेली आहे. त्यातला अत्यंत महत्त्वाचा पंथ म्हणजे नाथपंथ होय. नाथपंथ हा यादव साम्राज्यातला एक प्रभावी संप्रदाय होता. डॉ. जोगळेकर यांच्या मते, महाराष्ट्रात तेराव्या शतकापासून प्रभावशाली ठरलेल्या महानुभाव, वारकरी आदी सर्व संप्रदायांचा मूलस्रोत नाथसंप्रदायच आहे आणि नंतरच्या संप्रदायांनी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात नाथसंप्रदायाचीच तत्त्वे अंगिकारली आहेत असे दिसून येते. रा.चिं.ढेरे यांच्या मते, नाथसंप्रदायाची प्रथम लीलास्थली आहे. (जोगळेकर, १९८४ : १७४)

यादवकाळात साम्राज्यविस्तार झालेला होता, मंदिरे बांधली जात होती, दाने दिली जात होती. व्रतवैकल्ये यांना महत्त्व दिले जात होते, परंतु एकंदरीत समाजव्यवस्थेचा ताणाबाणा पाहिला तर सामान्यजन आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक स्तरांवर अभावांनी ग्रस्त होते असेच म्हटले पाहिजे. राजवटीच्या आश्रयाने समाजातला एक विशिष्ट स्तर फोफावत जातो आणि बाकीचा समाज समृद्धीच्या फळांपासून वंचित राहतो. यादवकाळातल्या संस्कृत साहित्याचा सामान्य जनतेशी काहीही संबंध राहिलेला नव्हता. पंडित आणि राजाच्या दरबारासाठीच ते लोक लिहित होते. संस्कृतमध्ये साहित्य विपुल लिहिले गेले पण त्यात मौलिकता, चैतन्य आणि प्रेरकतेचा अभाव होता.

ज्योतिषरत्नमाला

‘श्रीपति भट्ट’ याने १०३९ च्या सुमारास मूळ संस्कृतात हा ग्रंथ रचला व त्यावर संस्कृतात व मराठीत टीकाही लिहिली. मराठीत उपलब्ध असलेली ही टीका अपूर्ण आहे. या ग्रंथाची एकूण ७४ पृष्ठे इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांना सापडली व तीही मूळ मराठी पोथी नसून त्यांच्या मते, १४४७ च्या सुमारास केव्हा तरी केलेली तिचा नक्कल आहे. ही पोथी राजवाडे यांनी १९९४ साली ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’च्या वार्षिक इतिवृत्तांत छापून प्रसिद्ध केली.

‘तेया ईश्वररूपा कालाते मि

ग्रंथकर्ता श्रीपति नमस्कारी ।।’

अशी सुरुवात करून प्रस्तृत ग्रंथात श्रीपतीने युगे, संवत्सरे, त्यांचे स्वामी, ऋतू, मास, राशी, तिथी, महिन्यातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व व त्या दिवशी करावयाची कर्तव्ये, शुभाशुभ योग इत्यादींची चर्चा केली आहे. मराठीतल्या हा या प्रकारचा पहिलाच ग्रंथ म्हणून तो महत्त्वाचा आहेच. परंतु राजवाडे यांच्या मते, या ग्रंथांतील भाषेचे स्वरूप पाहता तो ‘मराठीतील आद्य ग्रंथ’ आहे. राजवाडे यांच्या या मताशी इतर वाङ्मयेतिहासकार व संशोधक सहमत नाहीत.

लीळाचरित्र

महानुभाव पंथांचे संस्थापक चक्रधर यांनी लिहिलेले काही वाङ्मय उपलब्ध नाही. परंतु त्यांच्याविषयीच्या आख्यायिका वेळोवेळी उतरून ठेवल्या गेल्या आहेत. या आख्यायिकांच्या संग्रहाला लीळाचरित्र असे नाव आहे. मराठीतील पहिला गद्य चरित्रग्रंथ म्हणून त्या ग्रंथाला विशेष महत्त्व आहे. महींद्रबास ऊर्फ म्हाईंभट यांनी हा चरित्रग्रंथ संकलित केला आहे. चक्रधरांच्या उत्तरापंथे गमनानंतर त्यांचे सर्व शिष्य ऋद्धिपूर येथे जमले आणि स्वामींच्या आठवणी-स्मृती-लीळांचे स्मरण करू लागले. यातूनच म्हाईंभटास लीळाचरित्राची प्रेरणा मिळाली. पुढे मग त्याने नागदेवाचार्यांच्या मदतीने चक्रधरांच्या लीळा संकलित केल्या. रचनाकाल १२८३ च्या आसपास.

लीळाचरित्राच्या विविध उपलब्घ प्रतींमधील लीळांची संख्या कमीजास्त आहे. ९०० पासून १५०० पर्यंत ही संख्या आढळते. एकांक, पूर्वाध व उत्तरार्ध असे लीळाचरित्राचे तीन विभाग करण्यात आले. लीळाचरित्राच्या पूर्वार्धातील व उत्तरार्धातील लीळा अनेक शिष्यांकडून मिळाल्या पण त्यांच्या एकाकी अवस्थेतील लीळा कोणालाच ज्ञात नव्हत्या. महदाईसा या जिज्ञासू शिष्येकडून चक्रधरांच्या पूर्वायुष्यातील लीळा मग म्हाईंभटाने मिळवल्या.

चक्रधरस्वामी आणि महानुभाव संप्रदाय यांची वैविध्यपूर्ण माहिती या चरित्रग्रंथातून व्यक्त झाली आहे. चक्रधरस्वामी हे लीळाचरित्राचे नायक आहेत. त्यांचे बहुगुणी व्यक्तिमत्व यातून साकार झाले आहे. चक्रधर हे एकांतातून लोकांतात कसे कसे आले याची माहिती म्हणजे लीळाचरित्र होय. तत्कालीन राजकीय, सामाजिक व धार्मिक जीवनाचे मार्मिक चित्रण लीळाचरित्रातून सहजच आले आहे. महानुभाव पंथाचे तत्वज्ञान, चक्रधरांची वचने इत्यादी अनेक बाबी लीळाचरित्रातून साकार झाल्या आहेत. लीळाचरित्राची भाषा म्हणजे यादवकालीन मराठी गद्याच्या समृद्धतेचा नमुनाच होय. छोटी छोटी अर्थपूर्ण वाक्ये, अलंकृत साधेपणा हे तिचे विशेष होत.

लीळाचरित्र हे चक्रधरांचे चरित्र असले तरी त्यातील अनेक लीळांमघून तेव्हाच्या समाजजीवनाच्या विविध अंगांचे आपोआपच दर्शन घडते. त्यावेळचे भोजनपदार्थ, वस्रविशेष, चालीरिती, करमणुकीचे प्रकार,कायदे, सामाजिक सुरक्षितता, सण, उत्सव इत्यादी सामाजिक जीवनाच्या दृष्टीने उपयुक्त असे अनेक उल्लेख या चरित्रग्रंथातून आले असल्यामुळे तत्कालीन समाजजीवनाच्या व धार्मिक जीवनाच्या दृष्टीने हा ग्रंथ महत्त्वाचा आहे.

लीळाचरित्रात चक्रधरांचे व्यक्तिचित्र व त्या अनुषंगाने गोंविदप्रभू, महदंबा, नागदेव इत्यादींची रेखाटलेली स्वभावचित्रे लक्षणीय वाटतात. त्याचप्रमाणे विविध ठिकाणी आलेले संवाद, वर्णने यामुळे ही चरित्रे एखाद्या कादंबरीप्रमाणे वेधक वाटतात. चक्रधरांच्या काळातील वाक्प्रचार, म्हणी यांचा उपयोग करून भाषेला सजविण्याचा प्रयत्न म्हाईंभटाने केला आहे. साधी, सरळ, सोपी पण आलंकारिक भाषा ही वाङ्मयीन वैशिष्ट्ये या चरित्रग्रंथात पहावयास मिळतात.

विवेकसिंधु

मुकुंदराजाने हा ग्रंथ १३६५ च्या सुमारास लिहिला. प्रा.कृ.पां.कुळकर्णी आणि वि.ल.भावे या ग्रंथाला मराठीतील आद्य ग्रंथ मानतात. हा ग्रंथ ज्ञानेश्वरी पूर्वीचा असे त्यांचे मत होते. नवीन संशोधन हा ग्रंथ १३६५ च्या सुमारास लिहिला असे मानते.

विवेकसिंधु हा ग्रंथ उपनिषदांच्या मंथनातून तयार झालेला, शांकर अद्वैत मताचे प्रतिपादन करणारा आहे. विशेषतः ‘योगवासिष्ठ’ या ग्रंथाचा प्रभाव या ग्रंथावर आढळतो. मायावादाचे सूत्रबद्ध विवेचन या ग्रंथात केले आहे.

विवेकसिंधुत पूर्वार्ध आणि उत्तरार्ध मिळून एकूण १८ प्रकरणे आहेत. १६८४ पर्यंत ओवी संख्या आहे. गुरु-शिष्यसंवाद रूपाने येथे ब्रह्मज्ञान सांगितले आहे. शास्रीय विषयाचे यात निरूपण आले आहे. पहिल्या भागात सृष्टीची उभारणी, दुसऱ्या भागात सृष्टीचा संहार आणि जीव, प्रपंच, परमेश्वर, जीव मुक्ती यांचे विवेचन केले आहे. ‘ग्रंथीचे हेंचि चातुर्य । जे रोकडे स्वानुभव सौंदर्य । म्हणौनि सेवीतु मुनिवर्य । विवेकसिंधु हा ।।’ असे भाषासौष्ठव असणारा हा ग्रंथ रचनादृष्ट्या सुंदर आहे. त्यात लेखकाची बहुश्रुतता दिसते. प्रतिभासृष्टी संपन्न व समृद्ध आहे. कल्पनाविलास व विविध अलंकाराची योजना त्यात आहे. मराठीचा गौरव

‘धुळी आंतील रत्न । जरि भेटे न करिता प्रेत्न ।

तरी चतुरी येत्न । का न करावा ।’

या शब्दांत केला आहे. ‘ मराठी भाषेतल्या वेषातला शांकरमठातला सुबोध वेदान्त पाठ ’ म्हणजे विवेकसिंधु असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्री जोशी यांनी म्हटले आहे.