श्री रथसप्तमी सण माहिती व कथा

या दिवशी श्री आदित्य नारायण ची पुजा करतात श्रीसुर्या देवाला श्रीनारायण स्वरूप म्हणजे श्रीविष्णु स्वरूप असे म्हणले आहे जो नित्य श्री सुर्य देवा पुजा करतो व रोज अर्घ देतो तो आरोग्यवान होतो व त्याचे अष्टदरिद्र नष्ट होते सुख होतो
श्रीसुर्य देवता परिवार माहिती
सुर्य पिता:-श्री कश्यप ऋषि
सुर्य माता:- अदिती देवी

श्रीसुर्य देवाला चार धर्मपत्नी होत्या
1) सुर्यदेव- सविता देवी
(याचा पासुन पुत्र व कन्या)
पुत्र:- वैवस्वत मनु व यम देव
कन्या:- यमुना (नदी)

2)सुर्यदेव- राज्ञी देवी
पुत्र- रैवत

3)सुर्यदेव – प्रभा देवी
पुत्र- प्रभात

4)सुर्यदेव- छाया देवी(सविता देवीच्या छाया पासून छाया देवी)

पुत्र:- शनि देव व सावर्णि
कन्या:- भद्रा(विष्टी) व तपती
असा परिवार आहे मत्स्य पुराण नुसार माहिती आहे

रथसप्तमी महत्व :

जाणून घ्या सौभाग्य, पुत्र, धन प्राप्तीचे व्रत, कथा आणि महत्त्व

माघ शुद्ध सप्तमीला महासप्तमी किंवा रथसप्तमी म्हणतात. या दिवशी पूजा करून सूर्याला पायसचा नैवेद्य दाखवतात. भगवान सूर्यनारायण रोज विश्वाला प्रकाश देत असतात पण त्यासाठी त्याची अव्याहत घोडदौड चाललेली असते. त्याच्या रथाला सप्त अश्व असतात. हे अश्व म्हणजे सप्तरंग, सप्तवार, सप्तछंद आहेत. अशी लोकमनाची भावना असल्यामुळे रथसप्तमीच्या व्रताचरणात प्रथम ध्यानमग्नता नंतर नाममंत्रासह सूर्यनमस्कार आणि अखेरीस तीर्थप्राशन हे नित्याप्रमाणेच करायचे असते. रथ हे वैदिक हिंदू धर्मातील प्राचीन वाहन आहे. देवगणांसाठी देवरथ, राजा महाराजांनी पुष्परथ, खेळ, स्पर्धांसाठी क्रीडारथ, स्त्रियांसाठी कणीरथ, रथविद्येच्या रक्षणासाठी वैजयिक रथ, युद्धासाठी सांग्रमिक रथ असे रथांचे विविध प्रकार आहेत. रथचक्र हे समाजजीवनाच्या प्रगतीचे चिन्ह व उत्कर्षाचे प्रतीक आहे.
स्थानपरत्वे बदलती नावे:
महासप्तमीला स्थानपरत्वे वेगवेगळी नावे प्राप्त झाली आहेत. बंगालमध्ये या दिवसाला भास्कर सप्तमी म्हणतात. उत्तरेत ही तिथी जयंती सप्तमी व अचला या नावांनी प्रसिद्ध आहे. हा मन्वंतराचा पहिला दिवस असून या दिवशी सूर्यनारायणाची स्वारी सात अश्व जुंपलेल्या रथातून आकाशमार्गे फिरावयास निघते. या समजुतीने दक्षिणेत रथसप्तमी म्हणतात. शब्दकल्पद्रुमकारांनी माघ मासास सामरी मास हे नाव दिले असून या तिथीला माकरी सप्तमी म्हटले आहे. तसेच सूर्य सप्तमी, भानू सप्तमी या नावांनीही ही सप्तमी ओळखली जाते. त्या त्या प्रांतानुसार पूजेमध्ये बदल होत गेला आहे
रथसप्तमीची कथा अशी:
कांबोज देशाचा यशोवर्मा नावाचा एक राजा होता. त्याला म्हातारपणी एक मुलगा झाला. तो जन्मताच रोगी होता. त्याला आरोग्य कसे प्राप्त होईल म्हणून यशोवर्माने एका ज्योतिष्याला विचारले तेव्हा त्याने सांगितले की, पूर्वजन्मी याने गरिबांचा छळ केला आणि सूर्याची पूजा केली नाही, म्हणून त्याची अशी अवस्था झाली. याच्या आरोग्यासाठी तुम्हाला रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा करावी लागेल तरच हा निरोगी होईल. राजाने ज्योतिषाचा सल्ला ऐकून तसे केले. त्यामुळे मुलगा निरोगी व सुखी झाला.
सणामागे शास्त्रीय दृष्टिकोन:
भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण व उत्सव हा चांगल्या भावनेने, विचाराने साजरा केला जातो. प्रत्येक सणामागे शास्त्रीय दृष्टिकोनही असतो. पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरांना असा भावनिक आधार आहे तसा नैसर्गिक दृष्टिकोनातून शास्त्रीय पाठिंबाही आहे. म्हणून तर आज 21 व्या शतकामध्येही आपण परंपरा मनापासून जपतो आहोत

सौभाग्य, पुत्र, धनाची प्राप्ती
वर्षभर सूर्यापासूनचे व्रत करून अखेरीस रथाचे दान केले असता महासप्तमी, मस्तकावर बोरीची व रूईची प्रत्येकी सात पाने धारण करून उपासना केली असता माघसप्तमी, मस्तकावर दीप धारण करून उपासना केली असता अचलासप्तमी इ.प्रकारे व्रतभेद सांगितला जातो. या दिवशीचे स्नान हेच विख्यात माघस्नान, असे काहींचे मत आहे. सर्व रोगांतून व पाषांतून मुक्तता आणि सौभाग्य, पूत्र, धन, इ.ची प्राप्ती हे या व्रताचे फळ सांगितले जाते.
अंगणातच शिजवलेली दुधाची खीर:
महाराष्ट्रात प्रामुख्याने स्त्रिया हे व्रत करतात. षष्ठीला एकभुक्त राहून व्रताचा संकल्प करणे, सप्तमीला अरुणोदयाच्या वेळी स्नान करून अंगणात काढलेल्य़ा सूर्यप्रतिमेची पूजा करणे, अंगणातच शिजवलेल्या दुधाच्या खिरीचा सूर्याला नैवेद्य दाखवणे आणि अंगणातच सूर्यासाठी दूध ऊतू जाऊ देणे हे व्रताचे स्वरूप असते. हळदीकुंकू व वाण देणे असा कार्यक्रमही असतो. दक्षिणेत त्या दिवशी अन्याध्याय असतो. रात्री गायन, वादन, दीपोत्सव असे कार्यक्रम असतात.
सप्तधान्ये, रूईच्या पानांचा नेवैद्य:
आपल्याकडे रथसप्तमीच्या दिवशी सकाळी तुळशीवृंदावनाजवळ रांगोळी काढून त्यावर एक पाट ठेवतात. त्या पाटावर रवतचंदनाने सात घोड्यांचा सूर्याचा रथ व त्यावर अरुणासह सूर्यप्रतिमा काढतात. नंतर ध्येय, सदा सवितुमण्डल मध्यवर्ती, या मंत्राने ध्यान करून पूजा करतात. गोवल्यावर मातीच्या भांड्यात खीर शिजवून तिचा नैवेद्य दाखवतात. सप्तधान्ये, सात रूईची पाने व सात बोरे सूर्याला वाहतात. अष्टांग अघ्र्य देतात, ब्राह्मणाला भोजन घालतात.
श्री सुर्यनाराणयाची कहाणी (रविवार कहाणी)

ऐका आदित्यराणूबाई तुमची कहाणी

आटपाट नगर होतं. त्या नगरांत एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा, फुलं, दूर्वा, आणायला रानांत जात असे. तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणानं विचारलं,“काय ग बायांनो, कसला वसा वसता? तो मला सांगा”. “ तुला रे वसा कशाला हवा? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील.” ब्राह्मण म्हणाला, “उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही.” तेव्हा त्या म्हणाल्या, “श्रावणमास येईल, तेव्हा पहिल्या आदितवारी मौन्यानं (मुकाट्यानं) उठावं, सचीळ (वस्त्रासहित) स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं. विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्यराणूबाई काढावी. सहा रेघांचं मंडळ करावं, सहा सुतांचा तातू करावा. त्याला सहा गाठी द्याव्या. पानफूल वहावं, पूजा करावी. पानाचा विडा, फुलांचा झेला, दशांगांचा धूप, गुळाखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, सहा मास चाळावी, सहा मास पाळावी, माघी रथसप्तमी संपूर्ण करावं. संपूर्णाला काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर, लोणकडं तूप, मेहूण जेवूं सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोडगळसरी द्यावी, ती नसेल तर दोन पैसे दक्षणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं.” असा वसा ब्राह्मणानं केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला.

भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावूं धाडलं, ब्राह्मण जाते वेळेस भिऊ लागला. कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं, “भिऊ नका, कापू नका, तुमच्या मुली आमचे येथे द्या” “आमच्या मुली गरीबाच्या, तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल.” राणी म्हणाली, ” दासी करीत नाही, बटकी करीत नाही. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू.”

मार्गेश्वराचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या, एक राजाचे घरी दिली. दुसरी प्रधानाचे घरी दिली. गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही. बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. “बाबा बाबा, गूळ खा पाणी प्या.” गूळ खात नाही, पाणी पीत नाही. माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक.” तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याचे मनात राग आला. तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला. तिनं पाहिलं, आपला बाप आला. म्हणून बसायला पाट दिला; पाय धुवायला पाणी दिलं. “बाबा, बाबा, गूळ खा, पाणी प्या”. ” गूळ खात नाही पाणी पित नाही, माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक.” तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू?” घरात गेली, उतरडीची सहा मोत्ये आणलीं. तीन आपण घेतली. तीन बापाच्या हातात दिली. त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेकीनं चित्तभावे ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोनं विचारलं, “मुलींचा समाचार कसा आहे?” जिनं कहाणी ऐकली नाहीं, ती दरिद्रानं पीडली. दुःखानं व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती, ती भाग्यानं नांदत आहे.”

इकडे दरिद्री जी झाली होती, तिनं आपल्या लेकाला सांगितले. “मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये.” पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. “अग अग दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या?” “आम्ही दासी प्रधानाच्या”. “प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे.” “कसा आला आहे? तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे.” ‘परसदारनं घेऊन या.’ परसदारानं घेऊन आल्या. न्हाऊ माखू घातलं, पीतांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं. कोहोळा पोखरला, होनमोहोरा भरल्या. वाटेस आपला जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला. हातीचा कोहोळा काढून नेला. घरी गेला. आईनं विचारलं, “काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?” दैवे दिलं, कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं. पण सर्व गेलं.

पुढं दुसर्;या आदितवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. “अग अग दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या?” “आम्ही दासी प्रधानाच्या.” प्रधानाच्या राणीला निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन न्हाऊ माखू घातलं, पीतांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं. काठी पोखरून होनामोहोरांनी भरून दिली. “बाबा, ठेवू नको. विसरू नको. जतन करून घरी घेऊन जा” म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला, हातची काठी काढून घेतली. घरी गेला, झालेली गोष्ट राणीला सांगितली. “दैवे दिलं, ते सर्व कर्मानं नेलं.”

पुढं तिसरे आदितवारी तिसरा मुलगा गेला, तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाचे घरी नेऊन न्हाऊ माखू घातलं, पीतांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं, नारळ पोखरून होनमोहोरांनी भरून दिला. “ठेवू नको, विसरू नको.” म्हणून सांगितलं, घरी जाताना विहिरीत उतरला. तो नारळ गडबडून विहिरीत पडला. घरी गेला. आईनं विचारलं, “काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?” आई गं, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व बुडालं.”

चवथ्या आदितवारी चवथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन न्हाऊ माखू घातलं, पीतांबर नेसायला दिला. जेवू खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होनामोहोरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईनं विचारलं, “काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?” “आई मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व नेलं.”

पाचव्या आदितवारी आपण उठली, तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं. न्हाऊ घातलं. माखूं घातलं, पाटाच बेसायला दिला. प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली. “काय वसा करतेस तो मला सांग.” बहीण म्हणाली, “अग अग चांडाळणी, पापिणी, बापाची कहाणी ऐकली नाहीस, म्हणून तुला दरिद्र आलं.” राजाच्या राणीनं सांगितलं मग ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावणास आला. सांगितल्याप्रमाणं सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावूं धाडलं. “मावशी मावशी, तुला छत्रं आली, चामरं आली, पाईक आले, परवर आले.” “मला रे पापिणीला छत्रं कोठली? चामरं कोठली? पाईक कोठले? परवर कोठे?” बाहेर जाऊन दाराशी बघतात, तो राजा बोलावूं आला आहे. राजा आला तशी घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणीबहिणीनी अहेर केले. वाटेनं जाऊ लागली.

पहिल्या मजलेस स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं, तों कहाणीची आठवण झाली. “करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा. नगरात कोणी उपाशी आहे का? याचा शोध करा.” “तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ? माझं पोट भरलं पाहिजे.” असं म्हणून तो राणीकडे आला. तशी सहा मोत्ये राणीनं घेऊन तीन त्याला दिली. तीन आपल्या हातांत ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली, चित्त भावे त्यानं ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती, ती सोन्याची झाली. तो म्हणाला, “बाई बाई! कहाणी ऐकल्याचं एवढं फळं, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा.” “तुला रे वसा कशाला हवा? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील,” उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही.” तेव्हा वसा सांगितला.

पुढं दुसर्;या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढला, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं, तेव्हा कहाणीची आठवण झाली. “करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा. नगरात कोणी उपाशी आहे का? याच शोध करा.” “उपाशी नाही, काही नाही” माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही, असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला हाक मारली. ‘आमच्या बाईची कहाणी ऐक’. तो आला. राणीनं सहा मोत्ये घेऊन तीन आपण घेतली, तीन माळ्याला दिली. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. चित्तभावे माळ्यानं ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, “बाई बाई! कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा.” मग राणीनं त्याला वसा सांगितला.
पुढं तिसर्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं. मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं, तेव्हा कहाणीची आठवण झाली. “करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा. नगरात कोणी उपाशी आहे का? याचा शोध करा.” “उपाशी नाही, काहि नाही.” एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनांत गेला होता, एक डोहात बुडाला होता, एक सर्पानं खाल्ला होता, त्यामुळं चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, “आमच्या बाईची कहाणी ऐक”. ती म्हणाली, “कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलांसाठी रडते आहे. बरं येते” मग ती राणीकडे आली. राणीनं पहिल्याप्रमाणं तिला कहाणी सांगितली. तिनं चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता तो आला. डोहात बुडाला होता तो आला. सर्पानं खाल्ला होता तो आला. ती म्हणाली,” बाई बाई! कहाणी ऐकल्याचं हे फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा.” मग राणीनं तिलाही वसा सांगितला.

पुढं चौथ्या मजलेस गेलीं. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं, तेव्हा कहाणीची आठवण झाली. “करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा. नगरांत कोणी उपाशी आहे का? याचा शोध करा.” “उपाशी नाही, कांही नाही”. काणा डोळा, मांसाचा गोळा, हात नाही, पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालथा होता तो उताणा केला. सहा मोत्ये होती. तीन मोत्ये त्याच्या बेंबीवर ठेवलीं, तीन मोत्ये आपण घेतली, राणीनं मनोभावे कहाणी सांगितली; ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. तो म्हणाला, “कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला.
पाचव्या मुक्कामाला घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. साती दरवाजे उघडले. लोहघंगाळ पाणी तापवलं. पंचपक्वान्नं जेवायला केली. सूर्यनारायण भोजनाला बसले, त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, “अग अग, कोणा पापिणीचा केस आहे?” राजाच्या राणीला बारा वर्षं दरिद्र आलं होतं. तिनं आदितवारी वळचणीखाली बसून केस विंचरले. “काळं चवाळं, डोईचा केस, वळचणीची काडी, डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे”. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला, तसा कोणाला होऊ नये.
ब्राह्मणाला, मोळीविक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कोणा डोळा मांसाचा गोळा, इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला, तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठां उत्तराची कहाणी, पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण