शेगावीचा योगीराणा- संत गजानन महाराज

!! गणगण गणात बोते !!
|| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिँतानंद
भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

संत श्री गजानन महाराजांना भगवान दत्तात्रेयचे तिसरे रूप मानले जाते, आधीचे दोन रूप म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि शिर्डीचे साई बाबा, महाराजांचे सर्वप्रथम दर्शन शेगाव मध्ये झाले. जानन महाराज परमज्ञानी, अध्यात्मिक, महान योगी आहेत.

महाराजांनी या भूतलावर अवघे ३२ वर्ष वास्तव्य केले आणि यादरम्यान त्यांनी आपल्या अनन्य लीला दाखवून भक्तांना जीवन संपन्न केले. महाराज हे अवलिया संत आहेत तरी स्वच्छताबद्द आहेत. महाराजांनी भक्तांना रोगमुक्त आणि भयमुक्त केले, भूतबाधा निमावल्या, गरिबांनाही धन्य केले, तसेच कुत्सितांचे अज्ञान दूर केले आणि दाम्भिकांना धडा शिकवला

जन्म: ज्ञात नाही, माघ वद्य ७, १८७८ दिनांक २३-२-१८७८ रोजी शेगाव मध्ये प्रकट झाले,
आई/वडील: ज्ञात नाही
वेष: दिगंबर
कार्यकाळ: १८७८ ते १९१०
समाधी/निर्वाण: ऋषीपंचमी ८-९-१९१०, भाद्रपद शुक्ल पंचमी
चरित्र ग्रंथ: श्री गजानन विजय चरित्र ग्रंथ (लेखक: दासगणू महाराज )

गजानन महाराजांचे प्रकटीकरण

वऱ्हाडातील शेगाव हे गाव प्रसिद्ध झाले ते श्रीसंत गजानन महाराजांचे पुनीत वास्तव्यामुळे. शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील गाव. सध्या तालुक्याचे ठिकाण असून पूर्वी खामगाव तालुक्यातील प्रमुख शहर म्हणून प्रसिद्ध होते. फार पूर्वी या गावाचे नाव शिवगाव असे होते. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन ‘शेगाव’ असे नाव रूढ झाले. संत गजानन महाराज शेगावात माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम प्रकटले. तो दिवस होता शके १८०० म्हणजेच २३ फेब्रुवारी १८७८ रोजीचा. श्री. देविदास पातूरकर यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खात असताना व गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिताना ते बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले.
सुमारे ३२ वर्षे गजानन महाराजांनी भक्तजनांना या परिसरातून मार्गदर्शन केले. चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला. दिगंबर वृत्तीच्या या अवलिया गजाननांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला. त्यावेळी त्यांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले. ते सिद्धयोगी पुरुष होते. अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत महाराजांच्या “गण गण गणात बोते” या सिद्धमंत्रात व्यक्त झाला आहे.
“गण गण गणात बोते,”
हा त्यांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड ते जप करित. किंबहुना, त्यामुळेच त्यांना ‘गिणगिणेबुवा’ ‘गजानन महाराज’ अशी नावे पडली. वऱ्हाडातील भक्त त्यांना प्रेमाने ‘गजानन बाबा’ म्हणतात. दासगणूंनी ह्या संदर्भात लिहिले आहे,
एक दिवस बालअवस्थेतील गजानन महाराज पहाटेच्या वेळीअक्कलकोटला स्वामी समर्थाच्या आश्रमात पोचले. त्यावेळी अक्कलकोट स्वामी भक्तांना उपदेश करीत होते. महाराज स्वामींना भेटताक्षणी त्यांनी एकमेकांना परस्पर ओळखले. स्वामींनी बाल गजाननाची मूर्ती न्याहाळली, सिध्दपुरुष होण्याचा आशिर्वाद दिला. त्या दिवसापासून बाल गजानन स्वामींच्या आश्रमी राहू लागले. दिगंबर अवस्थेतील बाल गजाननाची मूर्ती आणि त्यांची तेजस्वी मुद्रा बघून दर्शनार्थी भक्त स्वामींबरोबर बाल गजाननाच्या पाया पडत. अशाप्रकारे स्वामींनी बाल गजाननास आपल्याजवळ ठेवून त्यांना आध्यात्मिक ज्ञानाचे धडे दिले नंतर स्वामींनी बाल गजाननास नाशिकला देव मामलेदारांकडे जावे, असे सांगितले व त्यानंतर, तु आकोटला नरसिंग महाराजाकडे आणि तेथुन शेगावला जाऊन भक्तांचा उध्दार करावा व तेथेच देह सोडावा, असे सांगितले.
त्यानंतर ते नाशिकला देव मामलेदारांच्या दर्शनाकरिता गेले. दोन्ही संतांची भेट झाली. त्यांनी बाल गजाननास आपल्याकडे ठेवून घेतले. देव मामलेदारांनी देह सोडण्याअगोदर संत गजाननास सांगितले की, स्वामी समर्थाच्या वचनानुसार विदर्भातील शेगाव या गावी जाऊन तू भक्तांचा उध्दार करावा व तिथेच देह सोडावा हे विसरू नको. त्यानंतर ते कावनाई गावातील सुप्रसिध्द कपिलधारा तीर्थावर आले व १२ वर्षे तपश्चर्या केली. त्यावेळी त्यांना रघुनाथदास या महंतांनी योगसिध्दी दिली. या योगसिध्दीनंतर ते महंताच्या आदेशानुसार नाशिकला आले व एका वटवृक्षाखाली राहू लागले.

गण गण गणात बोते । हे भजन प्रिय सद्गुरुते ।।
या श्रेष्ठ गजानन गुरुते । तुम्ही आठवीत राहायाते ।।
हे स्तोत्र नसे अमृत ते । मंत्राची योग्यता याते ।।
हे संजीवनी आहे नुसते । व्यावहारिक अर्थ न याते ।।

श्री संत गजानन महाराज लीला (श्री गजानन विजय ग्रंथाच्या आधारे)

१) बार्शीटाकळी येथील श्री गोविंद महाराज टाकळीकर हे शेगांवातील मोटे यांच्या श्री महादेवाच्या मंदिरात कीर्तन करीत असताना त्यांना श्री गजानन महाराज हे सिध्दपुरुष आहेत हे जाणवले.
महाराजांनी टाकळीकरांच्या बेफाम घोड्याला शांत केले.
२) कीर्तन सुरू होण्याआधी बंकटलाल आणि पितांबरने ‘श्री’ ना झुणका भाकर आणून दिली. त्या नंतर ‘श्रीं च्या आज्ञेवरून पितांबराने नाल्यात तुंबाबुडवून त्यांच्यासाठी पाणी आणले. आणि आश्चर्य म्हणजे तुंब्यातील पाणी स्वच्छ झाले होते.
३) बंकटलालांना ‘श्रीं’ च्या बद्दल आत्मीयता, आदर वाटल्याने त्यांनी ‘श्रीं’ ना त्यांच्या घरी नेऊन आंघोळ घालून त्यांची पूजा केली. पुढे बंकटलालचे चुलत भाऊ इच्छाराम हे सुद्धा श्री गजानन महाराजांचे परम भक्त झाले. त्यांनीसुद्धा ‘श्रीं’ ना आपल्या घरी नेऊन त्यांची यथाशक्ती पूजा केली.
४) एकदा श्री गजानन महाराजांना पहाटे चिलीम पेटवण्यासाठी विस्तव हवा होता. त्यांनी जानकीराम सोनाराकडे विस्तवाची मागणी केल्यावर सोनाराने मुलांना नकार दिला. तेव्हा श्री महाराजांनी विस्तवाविना चिलीम पेटवली.
५) अक्षय तृतीयेच्या दिवशी जानकीरामच्या घरी आलेल्या अतिथींच्या पानात वाढलेल्या चिचवणीत अळ्या आढळल्याने सर्व अतिथी पानावरून उठून गेले.
श्री गजानन महाराजांस चिलीम ओढण्यासाठी विस्तव न दिल्याने ही घटना घडली हे जाणून जानकीरामने आपली चूक कबूल केली व महाराजांची क्षमा मागितली व तत्क्षणी चिचवणीतील अळ्या नाहीशा झाल्या.
अशा प्रकारे श्री गजानन महाराजांच्या लिलांचा अनुभव अनेकांना आला.
७) अकोली, अडगांव जवळ कोरड्या विहिरीत जलाशय निर्माण करून भास्कर पाटील आणि गावकऱ्यांना महाराजांनी थक्क केले.
८) बंकटलालने कणसे खाण्यासाठी महाराजांना आणि काही गावकऱ्यांना मळ्यात नेले असताना कणसे भाजण्यासाठी आग पेटविल्यामुळे मधमाशा पोळयातून बाहेर पडल्याने सगळ्यांनी धूम ठोकली. मात्र महाराज शांतपणे त्याच जागी बसले. शरीराला यत्किंचितही इजा झाली नाही.
९) श्री. हरी पाटलांसारख्या श्रेष्ठ कुस्तीगिराच्या शक्तीचे महाराजांनी गर्वहरण केले.
१०) मारुती मंदिरात पाटलाच्या मुलांनी पाठीवर उसाचा मार दिला असता महाराजांनी हातानी रस काढला आणि सर्वांना प्यायला दिला.
११) महाराजांच्या आशीर्वादाने अनेक वर्षे संतती नसणाऱ्या खंडू पाटलाला पुत्ररत्न प्राप्त झाले.
१२) जानरावाचा आजार महाराजांचे तीर्थ ग्रहण करून बरा झाला तर कारंजाच्या लक्ष्मण घुडेंनी महाराजांनी दिलेला आंबा खाल्यावर त्यांची व्याधी दूर झाली.
१३) प्लेगची साथ आली असताना प्लेगची लागण झालेल्या पुंडलीक भोकरेच्या काखेत महाराजांनी आपला अंगठा लावताच आरोग्यात सुधारणा व्हायला लागली आणि पुंडलीक दोन दिवसात बरे झाले.
१४) पुंडलीक भोकरे सारख्या निस्सिम सेवक भक्ताला आपल्या पादुका दिल्या.
१५) बाळापूरला समर्थ रामदासी परम भक्त बाळकृष्ण आणि पुतळाबाईना श्रींनी समर्थांच्या स्वरूपात दर्शन दिले.
१६) अमरावतीच्या गणेशआप्पा नावाच्या गरीब भक्तास महाराजांनी त्याच्या घरी जाऊन त्याला भेट दिली.
१७) पंढरपूरला बापुना काळेंना आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचे रूप धारण करून दर्शन घडवले.
१८) सोमवती अमावस्येच्या दिवशी काही भक्तांसमवेत श्री महाराज नर्मदास्नानासाठी व ओंकारेश्वर दर्शनासाठी गेले होते. नर्मदेच्या जलप्रवासात नावेत पाणी शिरले. तेव्हा महाराजांच्या कृपेने नर्मदेने एका कोळिणीचे रूप धारण करून नाव काठास लावली व त्यांना वाचविले.
१९) बंडू तात्याला गुप्त धनाची वर्दी देऊन त्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले.
२०) श्रींनी सुकलालच्या व्दाड गाईला शांत केले,
२१) ब्रह्मगिरी पंडित आपले ज्ञान पाजळायला लागल्यावर पेटलेल्या पलंगावर बसून महाराजांनी गोसाव्यास त्याच पलंगावर बसायला सांगितले. भयभीत झालेल्या ब्रह्मगिरीचे गर्वहरण झाले.
२२) शिवजयंतीच्या प्रीत्यर्थ भरवलेल्या सभेत लोकमान्य टिळक आणि श्री गजानन महाराज एकत्र आले. त्या सभेत महाराजांनी असे भाकीत वर्तवले की लोकमान्यांना कारावास भोगावा लागेल आणि प्रत्यक्षात खरंच लोकमान्यांना मंडालेच्या तुरूंगात जावे लागले. तेथे ‘गितारहस्य‘ हा ग्रंथ लिहिला गेला.
या सर्व घटनाव्यतिरीक्त कुष्ठरोग बरा होणे, भाकरी प्रसादाने महान कामगिरी होणे. स्त्रियांच्या डब्यातून रेल्वेप्रवास करणे, मृत कुत्रा जिवंत होणे या लिलांव्दारे महाराजांची थोरवी सर्वांना जाणवत होती.
(अधिकृत श्री गजानन विजय ग्रंथाच्या आधारे)
प.प गजानन महाराजांना आवडणारे पदार्थ
१) बेसन भाकर:-
२) अंबाडीची भाजी आणि भाकर:-
३) पेढे:
४) मिरचीचे वरण:
५) चहा:
६) खिचडी:

२१ दुर्वांकुर

श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र –

शेगांव ग्रामीं वसले गजानन । स्मरणें तयांच्या हरतील विघ्न ।
म्हणुनी स्मरा अंतरी सद्गुरुला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१॥
येऊनी तेथे अकस्मात मूर्ति । करी भाविकांच्या मनाचीच पूर्ती ।
उच्छिष्ट पात्राप्रती सेवियेला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥२॥
उन्हा तहानेची नसे त्यास खंत । दावियलें सत्य असेचि संत ।
पाहूनी त्या चकित बंकटलाल झाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥३॥

घेऊनी गेला आपुल्या गृहासी । मनोभावे तो करी पूजनासी ।
कृपाप्रसादे बहु लाभ झाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥४॥
मरणोन्मुखीं तो असे जानराव । तयांच्या मुळे लाभला त्यास जीव ।
पदतीर्थ घेता पूनर्जन्म झाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥५॥
पहा शुष्कवापी भरली जलाने । चिलिम पेटविली तये अग्निविणें ।
चिंचवणें नाशिले करीं अमृताला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥६॥
ब्रह्म गिरीला असे गर्व मोठा । करि तो प्रचारा अर्थ लावूनि खोटा ।
क्षणार्धा त्याचा परिहार केला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥७॥
बागेतली जाती खाण्यास कणसं । धुरामुळे करिती मक्षिका त्यास दंश ।
योगबळे काढिलें कंटकाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥८॥
भक्ताप्रती प्रिती असे अपार । धावुनी जाती तया देती धीर ।
पुंडलिकाचा ज्वर तो निमाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥९॥
बुडताच नौका नर्मदेच्या जलांत । धावा करिती तुमचाचि भक्त ।
स्त्री वेष घेऊनी तिने धीर दिला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१०॥
संसार त्यागियला बायजाने । गजानना सन्निध वाही जिणे ।
सदा स्मरे ती गुरुच्या पदाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥११॥
पितांबरा करी भरी उदकांत तुंबा । पाणि नसे भरविण्यास नाल्यास तुंबा ।
गुरुकृपेने तो तुंबा बुडाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१२॥
हरितपर्ण फुटले शुष्क आम्रवृक्षा । पितांबराची घेत गुरु परीक्षा ।
गुरुकृपा लाभली पितांबराला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१३॥
चिलीम पाजावी म्हणून श्रीसी । इच्छा मनी जाहली भिक्षुकासी ।
हेतू तयाचा अंतरी जाणियेला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१४॥
बाळकृष्न घरी त्या बालापुरासी । समर्थरुपे दिले दर्शनासी ।
सज्जनगडाहूनी धावुनी आला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१५॥
नैवेद्य पक्वान्न बहु आणियेले । कांदा भाकरीसी तुम्ही प्रिय केले ।
कंवरासी पाहुनी आनंद झाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१६॥
गाडी तुम्ही थांबविली दयाळा । गार्डप्रति दावियेली हो लिला ।
शरणांगती घेऊनी तोही आला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१७॥
जाति धर्म नाही तुम्ही पाळियेला । फकिरा सवे हो तुम्ही जेवियेला ।
दावूनी ऐसे जना बोध केला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१८॥
अग्रवालास सांगे म्हणे राममूर्ति । अकोल्यास स्थापुनी करी दिव्यकीर्ती ।
सांगता क्षणीं तो पहा मानिएला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१९॥
करंजपुरीचा असे विप्र एक । उदरी तयाच्या असे हो की दु:ख ।
दु:खातुनी तो पहा मुक्त झाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥२०॥
दुर्वांकुरा वाहुनी एकवीस । नमस्काररुपी श्रीगजाननास ।
सख्यादास वाही श्रीगुरुच्या पदाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥२१॥

।। श्री गजानन महाराजांची आरती ।।

जय जय सतचितस्वरूपा स्वामी गणराया l
अवतरलासी भूवर जड़ -मूढ  ताराया ll
जयदेव जयदेव ll धृ.ll

निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी l
तें तूं तत्त्व खरोखर नि:संशय  अससी l
लीलामात्रे धरिले मानवदेहासी ll १ ll

होऊ न देशी त्याची जाणिव तू कवणा  l
करुनि ‘गणि गण गणात बोते’ या भजना l
धाता नरहरि गुरुवार तूची सुखसदना l
जिकडे पाहावे तिकडे तू दिससी नयना  ll २ ll

लीला अनंत केल्या बंकटसदनास l
पेटविले त्या अग्नीवाचुनि चिलमेस l
क्षणात आणिले जीवन निर्जल वापीस l
केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश ll ३ ll

व्याधी धारून केले कैकां संपन्न l
करवियले भक्तालागी विट्ठलदर्शन l
भवसिंधु हां तरण्या नौका तव चरण l
स्वामी दासगणूचे मान्य करा वचन ll ४ ll

।। श्री गजानन महाराज बावन्नी ।।

जय जय सद्गुरू गजानना । रक्षक तुची भक्तजना ।।१।।
निर्गुण तू परमात्मा तू । सगुण रूपात गजानन तू ।।२।।
सदेह तू परि विदेह तू । देह असूनि देहातीत तू ।।३।।
माघ वद्य सप्तमी दिनी । शेगांवात प्रगटोनी ।।४।।
उष्ट्या पत्रावळी निमित्त । विदेहत्व तव हो प्रगट ।।५।।
बंकटलालावरी तुझी । कृपा जाहली ती साची ।।६।।
गोसाव्याच्या नवसासाठी । गांजा घेसी लावुनी ओठी ।।७।।
तव पदतीथें वाचविला । जानराव तो भक्त भला ।।८।।
जानकीरामा चिंचवणे । नासवुनी स्वरूपी आणणे ।।९।।
मुकिन चंदुचे कानवले । खाऊनि कृतार्थ त्या केले ।।१०।।
विहिरीमाजी जलविहिना । केले देवा जलभरणा ।।११।।
मधमाश्यांचे डंख तुवा । सहन सुखे केले देवा ।।१२।।
त्यांचे काटे योगबले । काढुनि सहजी दाखविले ।।१३।।
कुस्ती हरिशी खेळोनी । शक्ती दर्शन घडवोनी ।।१४।।
वेद म्हणुनी दाखविला । चकित द्रविड ब्राम्हण झाला ।।१५।।
जळत्या पर्यकावरती । ब्रम्हगिरीला ये प्रचिती ।।१६।।
टाकळीकर हरिदासाचा । अश्व शांत केला साचा ।।१७।।
बाळकृष्ण बाळापूरचा । समर्थ भक्तचि जो होता ।।१८।।
रामदासरूपे त्याला । दर्शन देवुनि तोषविला ।।१९।।
सुकलालाची गोमाता । व्दाड बहू होती ताता ।।२०।।
कृपा तुझी होतांच क्षणी । शांत जाहली ती जननी ।।२१।।
घुडे लक्ष्मण शेगांवी । येता व्याधी तूं निरवी ।।२२।।
दांभिकता परि ती त्याची । तू न चालवूनि घे साची ।।२३।।
भास्कर पाटील तव भक्त । उध्दरिलासी तू त्वरीत ।।२४।।
आज्ञा तव शिरसा वंद्य । काकहि मानति तुज वंद्य ।।२५।।
विहिरीमाजी रक्षियला । देवां तु गणु जव-याला ।।२६।।
पितांबराकरवी लीला । वठला आंबा पल्लविला ।।२७।।
सुबुध्दी देशी जोश्याला । माफ करी तो दंडाला ।।२८।।
सवड्द येथील गंगाभारती । थुकुंनी वारिली रक्तपिती ।।२९।।
पुंडलिकांचे गंडांतर । निष्ठा जाणुनि केले दुर ।।३०।।
ओंकारेश्र्वरी फुटली नौका । तारी नर्मदा क्षणात एका ।।३१।।
माधवनाथा समवेत । केले भोजन अुच्छिष्ट ।।३२।।
लोकमान्य त्या टिळकांना । प्रसाद तूंची पाठविला ।।३३।।
कवर सुताची कांदा भाकर । भक्षिलीस त्वा प्रेमाखातर ।।३४।।
नग्न बैसुनी गाडीत । लिला दाविली विपरीत ।।३५।।
बायदे चित्ती तव भक्ती । पुंडलिकावर विरक्त प्रीती ।।३६।।
बापुना मनी विठ्ठल भक्ती । स्वये होशि तू विठ्ठल मूर्ती ।।३७।।
कवठ्याचा त्या वारक-याला । मरीपासूनी वाचविला ।।३८।।
वासुदेव यति तुज भेटे । प्रेमाची ती खुण पटे ।।३९।।
उध्दट झाला हवालदार । भस्मिभूत झाले घरदार ।।४०।।
देहांताच्या नंतरही । कितीजणा अनुभव येई ।।४१।।
पडत्या मजुरा झेलियले । बघती जन आश्र्चर्य भले ।।४२।।
अंगावरती खांब पडे । स्ञी वांचे आश्र्चर्य घडे ।।४३।।
गजाननाच्या अध्दत लीला । अनुभव येती आज मितीला ।।४४।।
शरण जाऊनी गजानना । दु:ख तयाते करि कथाना ।।४५।।
कृपा करि तो भक्तांसी । धावुनी येते वेगेसी ।।४६।।
गजाननाची बावन्नी । नित्य असावी ध्यानीमनी ।।४७।।
बावन्न गुरूवारी नेमे । करा पाठ बहू भक्तीने ।।४८।।
विघ्ने सारी पळती दूर । सर्वसुखाचा येई पुर ।।४९।।
चिंता साया दुर करी । संकटातूनी पार करी ।।५०।।
सदाचार रत सद् भक्ता । फळ लाभे बघता बघता ।।५१।।
सुरेश बोले जय बोला । गजाननाची जय बोला ।।५२।।

।। श्री गजानन महाराज अष्टक (दासगणूकृत) ।।

गजानना गुणागरा परम मंगला पावना ।
अशींच अवघे हरी, दुरीत तेवि दुर्वासना ।।
नसें त्रिभुवनामधे तुजविन आम्हां आसरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।१।।

निरालसपणें नसे घडलि अल्प सेवा करी ।
तुझी पतितपावना भटकलो वृथा भूवरी ।
विसंबत न गाय ती आपुलिया कधीं वांसरा ।
करी पदनातावरी बहु दया न रोषा धरा ।।२।।

अलास जगीं लावण्या परतुनी सु-वाटे जन ।
समर्थ गुरूराज ज्या भुषवि नाम नारायण ।।
म्हणून तुज प्रार्थना सतत जोडुनिया करा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।३।।

क्षणांत जल आणिले नसून थेंब त्या वापिला ।
क्षणांत गमनाप्रती करिसि इच्छिलेल्या स्थळा ।
क्षणांत स्वरूपे किती विविध धरिसी धीवरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।४।।

अगाध करणी तुझी गुरूवरा, न लोकां कळे।
तुला त्यजुनी व्यर्थ ते आचरितात नाना खुळे ।
कृपा उदक मागती त्यजुनी गौतमीच्या तिरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।५।।

समर्थ स्वरूपप्रती धरून साच बाळापूरी ।
तुम्ही प्रगट जाहलां सुशिल बाळकृष्णा घरी ।
हरिस्वरूप घेऊनि दिधली भेट भीमातिरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।६।।

सछिद्र नौकेप्रती त्वदिय पाय हे लागतां ।
जलांत बुडतां तरी तिजसी नर्मदा दे हाता ।
अशा तुजसि वाणण्या नच समर्थ माझी गिरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।७।।

अतां न बहु बोलतां तव पदांबुजा वंदितो ।
पडो विसर ना कदा मदिय हेंचि मी मागतों ।
तुम्ही वरद आपुला कर धरा गणूच्या शिरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।८।।

।। श्री गजानन महाराज स्तोत्र ।।

हे सर्वाद्या सर्वशक्ती | हे जगदोद्वारा जगत्पति |
साहय व्हावें सत्वरगति | या लेकराकारणें ||१||
जे जे काही ब्रम्हांडात | तें तें तुझें रुप सत्य |
तुक्यापुढें नाहीं खचित | कोणाचीही प्रतिष्ठा ||२||
तूं निरंजन निराकार | तूंच अवधूत दिगंबर |
साकाररुप सर्वेश्र्वर | विश्र्वनाथ तूंच की ||३||
जे जे काही म्हणावें | तें तें तुझे रुप बरवें |
दासगणूस आतां पावे | हीच आहे याचना ||४||
तूंच काशी विश्र्वेश्वर | सोमनाथ बद्रीकेदार |
महंकाल तेवि ओंकार | तूंच की रे त्र्यंबकेश्र्वरा ||५||
भीमाशंकरा मल्लिकार्जुन | नागनाथ पार्वतीरमण |
श्रीघृणेश्वर म्हणून | वेरुळगांवी तूंच की ||६||
तूंच परळी वैजनाथ | निधीतटाला तूंच स्थित |
रामेश्वर पार्वतीकांत | सर्व संकट निवारता ||७||
हे कृपार्णवा नारायणा| महाविष्णो आनंदधना |
हे शेषशायी परिपूर्णा | नरहरि वामना रघुपते ||८||
तूं वृंदावनीं श्रीहरी | तूं पांडुरंग पंढरपुरीं |
व्यंकटेश तूं गिरीवरीं | पुरीमाजीं जगन्नाथे ||९||
द्वारेसी नंदनंदन | नाम देती तुजकारण |
जैसे भक्तांचें इच्छील मन | तैसे तुज ठरविती ||१०||
आता हे चंद्रभागातटविहारा | या गजाननस्तोत्रा साहय करा |
हेंच मागें पसरुनि पदा | तुज विठठले दासगणू ||११||
गजानन जे स्वरुप कांही | तें तुक्याविण वेगळे नाही |
दत्त भैरव मार्तड तेही | रुपें तुझीच अधोक्षजा ||१२||
या सर्व स्वरुपांकारण | आदरे मी करी वंदन |
माझे त्रिताप करा हरण | हेंच आहे मागणे ||१३||
हें महालक्ष्मी कुलदेवते | कृपाकटाक्षें लेकरातें |
पाही दासगणूतें | हीच तुजला प्रार्थना ||१४||
आतां श्रीशंकराचार्य गुरुवर | तेवी नाथ मच्छिंदर |
निवृत्तीदास ज्ञानेश्वर | समर्थ सज्जनगडीचे ||१५||
हे तुकारामा महासंता | तुजलागी दंडवता |
करितों होई मला त्राता | नाहीं ऐसे म्हणूं नका ||१६||
हे शिडी।कर बाबासाई | लेकरांसाठी धांव घेई |
वामनशास्त्री माझे आई | माझी उपेक्षा करुं नका ||१७||
हे शेगांवीच्या गजानना | महासंत्ता आनंदघना |
तुला येऊं दे काहीं करुणा | या अजाण दासगणुची ||१८||
तुम्हां सर्वा प्रार्थून | स्तोत्र करितो हे लेखन |
माक्या चित्तीं म्हणून | वास आपण करावा ||१९||
जे जे तुम्ही वदवाल कांही | तेंच लिहीन कागदीं पाहीं |
स्वतंत्रता मलजा नाही | मी पोषणा तुमचना असें ||२०||
माघमांसीं सप्तमीस | वद्यपक्षीं शेगांवात |
तुम्ही प्रगटला पुण्यपुरुष | पंथाचिया माझारी ||२१||
उष्टया पत्रावळी शोधन | तुम्ही केल्या म्हणून |
मिळालें की नामभिमान | पिसा पिसा ऐसें तुम्हा ||२२||
उगी न वाढावी महती | म्हणून ऐसी केली कृती |
तुम्ही साच गुरुमूर्ती | लपून बसाया कारणे ||२३||
परि विचारवंत जे ज्ञानी | तें तुम्हालागी पाहुनी |
भ्रमा हातफळी देऊनी | पाय तुमचे वंदितात ||२४||
बंकटलाल दामोदर | हे दोघे चतुर नर |
भ्रमातें सारुन दूर | शरण आले तुम्हांला ||२५||
बंकटलालाचें सदनास | तुम्ही राहिला कांही दिवस |
तेथे जानराव देशमुखास | मरत असतां वांचविले ||२६||
केवळ पाजुनियां तिर्था | आपुल्या पदींचे समर्था |
तुजलागी दंडवता | असो आमुचा बरचेवर ||२७||
तुझीया लिलानिधीचा | नच लागे पार साचा |
टिटवींने सागाराचा अंत कसा घेववेल ? ||२८||
पितांबरा देऊनी भोपळा | नाल्यास तुम्ही पाठविला |
जल तें हो आणविण्यांला | तहान लागली म्हणून ||२९||
पितांबरासी बजाविलें | ओंजळीनें पाणी भले |
न पाहिजेतुंवा भरले | या माझिया भोपळयांत ||३०||
जलांत तुंबा बुडवावा | जलें पूर्ण भरुन घ्यावा |
आणि तोच मला आणून द्यावा | यांत अंतर करुं नको ||३१||
तुंबा बुडेल ऐंसे पाणी | नव्हते नाल्यालागुनी |
विश्र्वास ठेवलोनिया वचनीं | ऐसे केलें पितांबरे ||३२||
नाल्याचिया जलास | तुंबा तो लावितां सरसी |
आपोआप त्या ठायासी | भव्य खांच पडली की ||३३||
तुंबा त्यांत भरत आला | ऐशी तुझी अगाध लिला |
ती साच वर्णण्याला | शेषही थकेल वाटते ||३४||
सोमवारी प्रदोषांसी | बंकटलालच्या सदनरासी |
भाविकां आपण व्योमकेशी | दिसतसां महाराजा ||३५||
यात नवल ना तिळभर | कां की तूंच शंकर रमावर |
हे जेवढे चराचर | तेवढे तुम्हींच आहात की ||३६||
तुझे स्वरुप यथातथ्य | मानवासी नाहीं कळत |
म्हणून पडती भ्रमांत | मायावधहोऊनी ||३७||
प्रातः कालाचे वेळीं | संपली होती दिवासही |
जानकीराम देईना मुळीं | विस्तव तुमच्या चिलमिस ||३८||
जानकीराम सोनार बागेसरीचा वैश्र्वानर |
द्यावयासी कुरकुर | करुं लागला असे की ||३९||
तें अंतज्ञानी जाणून | कौतुक दाविले करुन |
चिलीम विस्तवांवाचून | पेटूनिया दाविली ||४०||
सोनार विस्तव देण्यांला | नाहीं ऐसे वदला|
म्हणूनिया येता झाला | राग भगवंताकारणें ||४१||
चिंचवणे ते सोनाराचें | नासलें अक्षय तृतीयेचें |
प्राणघातक किंडयांचे | झालें त्यांत साम्राज्य ||४२||
अवघे टकमका पाहती | नाका पदर लाविती |
एकमेकां सांगती | हें चिंचवणे खाऊ नका ||४३||
मग जानकीराम म्हणाला | साधूस वितव ना दिला |
त्याचा हा प्रत्यय आला | धन्य धन्य हा गजानन ||४४||
मग तात्काळ उठून वेगेंसी | आला बंकटलाल सदनासी |
हकीकत बंकटलालासी | सर्व केली निवेदन ||४५||

|| श्रींचे गादी समोर होणारी सायं. आरती ||

।। श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय ।।
(चाल आरती भुवनसुंदराची )

ओवाळीतो स्वामीराया । माथा पदी ठेवूनीया ।।धृ।। आवरी जगन्मोहिनीला । दावी चिन्मय स्वरूपाला ।। देई सद्बुध्दी मजला । प्रेमे तव यश गाण्याला ।।।।चाल।। भक्तांकितां स्वामीराया, चरणी मी शरण ।। करूनी भय हरण, दावी सुख सदन ।। अमित मम दोष त्यागुनीयां । विनवितो दास तुला सदया ।। १ ।। जन-पदमुक्ति-पदान्याया । स्थली या अवतरला राया ।।चाल।। ही जड मुढ मनुज-काया । पदीं तव अर्पियली राया ।।चाल।। हे दिग्वसन योगीराया, नको मज जनन पुनरपि मरण, येत तुज शरण ।। पुरवी ही आस संतराया । प्रार्थना हीच असे पाया ।। २ ।। नेण्या अज्ञ-तमा विलया । अलासी ज्ञान रवी उदया ।। करी तु ज्ञानी जनाराया । निरसुनी मोह – पटल माया ।। चाल ।। गजानन संतराया असशी बळवंत । तसा धीमंत नको बघु अंत । विनवितो दास तुम्हा राया । नका त्या दूर करू सदया ।।३।।

|| आरती ||

आरती सद्गुरू नाथा । अवलीया समर्था । आरती ओवाळीतो । मनोभावे मी आता । आरती सद्गुरू नाथा ।।धृ।। दिधले निजभक्ता । भावे इच्छीत फल त्वा, पाजुनि ज्ञानामृता । उध्दरिले समर्था । आरती सद्गुरू नाथा ।।१।। कविजन गुण गाता । थकियले समर्था । अघटित ऐसी लिला । मति धजि ही न आता । आरती सद्गुरू नाथा ।।२।। विनंती भगवंता । तारी रामात्मज आता । आरती पूर्ण करितो । शरणागत बलवंता। आरती सद्गुरू नाथा ।।३।।

|| कापुरार्ती ||

जयजय कर्पूरगौरा । तारी जयजय कर्पूरगौरा ।।धृ।। भस्म हे चर्चित निल गलांबर झल्लालती रूंडमाळा ।। इंदु लल्लाटी शोभतसे कटी । गजचर्म व्याघ्रांबरा । शंभो जयजय कर्पूरगौरा ।।१ ।। श्वेतासनी महाराज विराजित । अंकी बसे सुंदरा । भक्त दयाघन वंदिती चरण । धन्य तु लीलावतारा । शंभो जयजय कर्पूरगौरा ।। २ ।। मतिमंद दीन झालो पदी लीन । पार करी संसारा । काशीसूतात्मज मागतसे तुज । द्या चरणी मज थारा ।। शंभो जयजय कर्पूरगौरा ।।३।। कर्पूरगौरं करूणावतारं । संसारसारं भुजगेंद्रहारं । सदा वसंतं हृदयारविंदे । भवं भवान्यासाहित नमामि ।। मंदारमाला कपाल काय । दिगंबराय दिगंबराय ।। नमः शिवाय नमः शिवाय ।। कर्पूर महादीप समर्पयामी ।।

|| मंत्रपुष्पांजली ||

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् । ते ह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवः।। ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने । नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।। स मे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु । कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ।। ॐ स्वस्ति । साम्राज्यं, भौज्यं, स्वाराज्यं, वैराज्यं, पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्त पर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुष आन्तादापरार्धात पृथिव्यै समुद्रपर्यान्ताया एकराळिति । तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्याऽवसन् गृहे ।। आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ।। तन्नो सद्गुरू प्रचोदयात् ।। ॐ पूर्ण ब्रह्माय धीमहि, तन्नो सद्गुरू प्रचोदयात् ।।

|| श्लोक ||

पिता माता बंधु तुजविण असे कोण मजला ।
बहू मी अन्यायी परि सकळहि लाज तुजला ।।
न जाणे मी कांही जप तप पुजा साधन रिती ।
कृपादृष्टी पाहे शरण तुज आलो गणपती ।।

|| श्लोक ||

(वृत्त-भुजंगप्रयात)
सदासर्वदा योग तुझा घडावा ।
तुझे कारणी देह माझा पडावा ।।
उपेक्षूं नको गुणवंता अनंता ।
रघुनायका मागणे हेचि आता ।।१।।
उपासनेला दृढ चालवावे ।
भूदेव-संतासि सदा नमावे ।
सत्कर्मयोगे वय घालवावे ।
सर्वामुखी मंगल बोलवावे ।।२।।

|| नमस्काराष्टक ||

योगी दिगंबर विरक्तविदेही संत ।
उद्यान भक्तितरुचे फुलवी वसंत ।।
शेगांव क्षेत्र बनले गुरुच्या प्रभावे ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।१।।
ओहोळ घाण जल वाहत विषयांचे ।
भावार्थ तोय स्फटिकासम तेथ साचे ।।
तुंबी तुडुंब भरले किती स्तोत्र गावें ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।। २ ।।
संत्रस्त पंक्तिस करी बहु काकपंक्ती ।
गेली क्षणात उठुनी परसोत उक्ती ।।
आत्मैक्य हे गुरूवरा, प्रचितीस यावे ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।३।।
पेटूनी मंचक धडाडत अग्निज्वाला ।
मध्ये सुशांत गुरुमूर्ति न स्पर्श झाला ।।
ते योग वैभव पुन्हा नयना दिसावे ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।४।।
तारीयली सहजची तरि नर्मदेत ।
देवी सदिव्य प्रकटे नवलाव होत ।।
ज्याच्या कृपे भवजली तरुनीच जावे ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।५।।
जे ब्रह्म ब्रह्मगिरीला कळले न साच ।
पांडित्य मात्र नुसते उरला तसाच ।।
त्या सांगती नित मुखे हरीनाम घ्यावे ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।६।।
बाधे तृषा गुरुवरा जल ना मिळाले ।
खाचाड रूक्ष असतां झणि तोय आले ।।
प्रार्थू पदीं हृदय भक्ति जले वहावे ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।७।।
स्वामी समर्थ जगती अवतार घेती ।
कष्टोनि धेनु व्दिज धर्मचि रक्षिताती ।।
घ्या धेनुदास पदरी जरी पापि ठावें ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।। ८ ।।

|| श्लोक ||

ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे ।
त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे ।।
मी ठेवितों मस्तक ज्या ठिकाणी ।
तेथे तुझें सद्गुरू पाय दोन्ही ।
श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय ।।

|| प्रदक्षिणा ||

यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च ।
तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणं पदे पदे ।।

|| क्षमापनम् ||

अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम ।
तस्मात्कारूण्यभावेन रक्षरक्ष परमेश्वर ।
मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर ।
यत्पुजितं मया देव परिपूर्ण तदस्तु मे ।
आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम् ।
पुजां चैव न जानामि क्षमस्व परमेश्वर ।।
श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय ।।

|| मंत्रपुष्पांजली ||

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् । ते ह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवः।। ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने । नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।। स मे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु । कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ।। ॐ स्वस्ति । साम्राज्यं, भौज्यं, स्वाराज्यं, वैराज्यं, पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्त पर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुष आन्तादापरार्धात पृथिव्यै समुद्रपर्यान्ताया एकराळिति । तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्याऽवसन् गृहे ।। आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ।। तन्नो सद्गुरू प्रचोदयात् ।। ॐ पूर्ण ब्रह्माय धीमहि, तन्नो सद्गुरू प्रचोदयात् ।।