• तिथी :
    चैत्र शुध्द प्रतिपदा
    पार्श्वभूमी :
    गुढीपाड्व्या विषयी काही धार्मिक कथा ही प्रचलित आहेत. ब्रह्मपुराणानुसार महाप्रलयानंतर ब्रह्मदेवांनी या दिवशी जगाची निर्मिती केली. या दिवसापासून पृथ्वीवरच्या खर्या जीवनचक्राला सुरुवात झाली, अशी आख्यायिका आहे.
    तसेच रामाने वनवासा नंतर अयोध्येत प्रवेश केला तो हा दिवस. अयोध्यावासीयांनी विजयोत्सवाच्या दिवसाचे प्रतीक म्हणून गुढी उभारून रामराज्याचे स्वागत केले. व तेव्हा पासुन ही प्रथा पडल्याचे ही सांगितले जाते.
    इसवी सनाचा आरंभ होत असताना महाराष्ट्रातील पैठण नगरीत राजधानी असलेल्या सातवाहन राजाचे साम्राज्य विस्तारात होते. आजच्या मराठीचे बालरूप हळू हळू वाढत होते. त्यावेळी महाराष्ट्री प्राकृत भाषा, (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रुपांतरीत झाली) सातवाहनांची राजभाषा होती. त्याचे साम्राज्याचे वर्णन त्याच्या घोड्यांनी तीन समुद्रांचे पाणी प्यायले होते. असे केले जात होते. ज्ञान, कला, साहित्य या सर्वात राज्याची प्रगती होती, स्थैर्य, सुबत्ता लाभलेल्या सातवाहन राज्यांनी नवऋतूच्या या लोकरुढीला कालगणनेची जोड दिली आणि ईस ७८ मध्ये शालिवाहन शकाचे रूपाने मराठी कालगणना सुरु झाली. व चैत्र पाडवा (गुढी पाडवा) मराठी कालगणनेचा नववर्ष प्रारंभ दिन झाला.
    अशा विविध अख्यायिका गुढीपाडव्यासंदर्भात प्रचलित आहेत.
    साजरा करण्याची पारंपारिक पद्धत :
    या दिवसाची सुरुवात कडुलिंबाची पाने खाण्याने करण्याची प्रथा आहे. कडुनिंबाची कोवळी पाने काढून त्यात गूळ, जिरे, चवीपुरते मीठ व लिंबू घालून वाटून गोळी बनवितात. सकाळी उठल्याउठल्या तोंड घुवून ती गोळी खाण्याची पध्दत आहे. कडुलिंब हा आयुर्वेदाच्या शास्त्रानुसार अत्यंत आरोग्यकारक व कीटकनाशक आहे म्हणून ही प्रथा आहे.
    घराच्या पुढील अंगणातील जमीन गाईच्या शेणाने सारवून पाच पांडवांच्या प्रतिकृती तयार करून त्यांच्या भोवती रांगोळी काढली जाते. या ठिकाणी गुढी उभारतात. गुढीची षोडशोपचारे पूजा केली जाते. गुढी उभारण्यापूर्वी गुढीला (काठीला) तेल लावून ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतात. त्याला हळद-कुंकू वाहतात. गुढीकरीता पितळेचे किंवा चांदीचे भांडे, कडुलिंबाचा डहाळा, साखरेची गाठी, जरीचा खण, कापड अथवा पातळ, फुलांची माळ एवढे साहित्य घेतात. काठीच्या टोकाला जरीचा खण किंवा रंगीत कापड घट्ट बांधतात व त्यावर भांडे पालथे घालतात. त्यावर कडुलिंबाचा डहाळा व गाठी घालतात. घराच्या छपरावर किंवा पुढील दर्शनी भागावर ही काठी अशातऱ्हेने बांधतात की रस्त्यावरून ती सहज दिसावी. ही रंगीत कापडने शोभणारी गुढी म्हणजे रामाच्या स्वागतासाठी उभारलेल्या शुभध्वजाची प्रतिक असते. गुढी उभारल्यावर तिला हळद-कुंकू वाहण्यात येते. घराच्या प्रवेशदाराला आंब्याची डहाळी अथवा तोरण लावतात. तसेच वाहनांनादेखील पाना-फुलांची माळ लावण्याची प्रथा आहे.
    • ही उभारलेली गुढी सायंकाळी चार वाजल्यानंतर केव्हाही उतरवतात. गावात रामाचे मंदिर असल्यास साखरेची माळ रामाला अर्पण केली जाते. हळद-कुंकू, अक्षता वाहून मगच गुढी उतरवली जाते. या दिवसापासून ते रामनवमीपर्यंत राममंदिरात कीर्तनाला प्रारंभ होतो.
    वैशिष्ट्य :
    गुढीपाडवा हा दिवस या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. नवीन घरात रहायला जाणे, किंमती वस्तूंची किंवा स्थावराची खरेदी, सोन्याची खरेदी वगैरे सर्व गोष्टींच्यासाठी हा दिवस शुभ मानतात. या दिवशी नवीन संवत्सराचा प्रारंभ होतो व नवे पंचांगही सुरू होते. शालिवाहन शकाची (हिंदू कालगणनेची) सुरूवात याच दिवशी झाली.
    • खाद्यपदार्थ :
    पुरणपोळी, पुरणाची आमटी (कटाची आमटी), भजी-पापड-कुरडया वगैरे तळण, शेवयांची खीर