पोवाडा

पोवाडा हा वीर रसांतील लेखनाचा आणि गायनाचा महाराष्ट्रातील लोकप्रिय प्रकार आहे. पोवाड्याचा शब्दश: अर्थ उच्चरवातला संवाद ( संस्कृत प्र + वद > पवद > पवड > पवाडा > पोवाडा) असा होतो. वीरांच्या पराक्रमांचे , विद्वानांच्या बुद्धिमत्तेचे तसेच एखाद्याच्यासामर्थ्य , गुण , कौशल्ये इ. गुणांचे काव्यात्मक वर्णन प्रशस्ती किंवा स्तुतीस्तोत्र म्हणजे पोवाडा, असा पोवाडा शब्दाचा अर्थ महाराष्ट्र शब्दकोशात दिला आहे .पोवाड्यांची भाषा व रचना ओबडधोबड असते. त्यांत मुख्यत्वे वीररसाचा आविष्कार असतो. वीर आणि मुत्सदी पुरुषांच्या लढाया, त्यांचे पराक्रम, त्यांची कारस्थाने इत्यादींचे जोरकस शब्दचित्र पोवाड्यात असते. एक मराठी काव्यप्रकार.  प्राचीन उपलब्ध पोवाड्यांत पुढील तीन प्रकारची कवने आढळतात :

(१) दैवतांच्या अद्‌भुत लीला आणि तीर्थक्षेत्रांचे माहात्म्य,

(२) राजे, सरदार वा धनिक यांचे पराक्रम, वैभव, कर्तृत्व इत्यादींचा गौरव आणि

(३) लढाई, दंगा, दरोडा, दुष्काळ, पूर इ. उग्र वा कुतूहलजनक घटनांचे निवेदन.

या तीन प्रकारच्या कवनांचे गायक व श्रोते हे देखील मुळात वेगवेगळे होते. पहिल्याचे गायक गोंधळी आणि श्रोते भाविक जन, दुसऱ्याचे गायक भाट आणि श्रोते संबंधित व्यक्ती व त्यांचे आश्रित इ. आणि तिसऱ्याचे गायक शाहीर आणि श्रोते सर्वसामान्य जनता. वद् अशी व्युत्पत्ती सांगितली जाते. ‘विस्तार’, ‘सामर्थ्य’, ‘पराक्रम’, ‘स्तुती’ या अर्थी ‘पवाड’ हा शब्द प्राचीन वाङ्‌मयात योजलेला आढळतो.

पोवाडे गाणारा कलाकारांस शाहीर  म्हटले जाते.

पोवाड्याचा उल्लेख ज्ञानेश्वरी मध्ये “पवद” असा केलेला आढळतो. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांवर केलेले पोवाडे विशेष प्रसिद्ध आहेत.
मराठी भाषिकांचा हा एक स्फूर्ति देणारा गीत प्रकार आहे. भारतात याचा उदय साधारण १७ व्या शतकात झाला. पोवाड्यात ऐतिहासिक घटना समोर ठेऊन गीत रचना केली जाते आणि खास वेगळ्या अशा धाटणीने मनोरंजक पद्धतीने गायली जाते. पोवाड्याची गीते रचणार्‍या आणि गाणार्‍या लोक कलावंतांना शाहीर म्हणतात.

अगदी आद्य पोवाडे
इ.स. १६५९ मध्ये छत्रपती शिवाजी राजे यांनी अफझलखानाचा वध केला. त्याप प्रसंगावर अग्निदास यांनी एक पोवाडा रचून तो गायला होता. कवी तुलसीदास यांनी सिंहगड सर करणार्‍या तानाजीवर पोवाडा केला होता, तर यमाजी भास्कर यांचा बाजी पासलकरवर पोवाडा आहे.

दुसरा कालखंड पेशवाईतील पोवाड्यांचा. त्याची सुरुवात पानिपतच्या पोवाड्यांनी व शेवट खडकी, अष्टी येथील लढायांच्या पोवाड्यांनी होतो. त्या कालखंडात ब्राम्हण शाहीरही उदयाला आले. त्यांनी शाहिरी वाङ्मयात पुष्कळ संस्कृत शब्द वापरले आहेत. त्यांच्या पोवाड्याच्या चालीही अवघड आहेत.

पानिपतच्या लढाईवर अनेकांनी पोवाडे रचले आहेत. त्यांपैकी सगनभाऊंचा पोवाडा सर्वांत चांगला आहे. सगनभाऊ शेवटच्या बाजीरावाच्या वेळी हयात होता. तो पुण्यातच राहत असे. त्याच्या पोवाड्याचा काही भाग –

महाराष्ट्रामधील पेशव्यांच्या कारकिर्दीत राम जोशी (१७६२-१८१२) अनंत फंदी (१७४४-१८१९) होनाजी बाळा (१७५४-१८४४) प्रभाकर (१७६९-१८४३) वगैरेंनी अनेक पोवाड्यांची रचना केली.

हॅरी अरबुथनोट अक्वोर्थ आणि एस.टी. शालिग्राम यांनी साधारण ६० पोवाडे मिळविले आणि ‘इतिहास प्रसिद्ध पुरूषांचे व स्त्रियांचे पोवाडे’ हे पुस्तक लिहून सन १८९१मध्ये प्रसिद्ध केले.
यापैकी १० पोवाड्यांचे एच. ए. अक्वोर्थ यांनी १८९४ मध्ये इंग्लिश भाषेत भाषांतर केले आणि ते ‘बॅलाड्स ऑफ द मराठा’ (मराठी पोवाडे) नावाने प्रसिद्ध केले.
मी शिवाजी राजे भोसले बोलतोय (२००९)या मराठी सिनेमा मध्ये अफझलखानाचा वध हा पोवाडा गायला आहे.महानुभाव संप्रदायातले भानुकवी जामोदेकर (जन्म : नांदेड जिल्हा, इ.स. १९२३) यांनी स्वातंत्र्याचा पोवाडा, रझाकाराचा पोवाडा वगैरे पोवाडे लिहिले होते. त्यांनी काही काळ शाहिरीचे व कलगीतुर्‍याचे अनेक प्रयोग केले.

पोवाड्यांपैकी तानाजी मालुसरे आणि सिंहगड, बाजी पासलकर, प्रतापसिंह व शहाजीमहाराज, प्रतापसिंहाची शिकार, शहाजीच्या स्वारीचा थाट, सातारकर छत्रपती व त्यांचे सरदार, सामानगडच्या गडकऱ्यांचे बंड, पानपतवरची लढाई, नानासाहेब पेशव्यांचा मृत्यू, थोरल्या माधवराव पेशव्यांची पतिव्रता स्त्री रमाबाई सती गेली तो वृत्तांत, नारायणराव पेशव्यांचा मृत्यू, सवाई माधवरावांचा जन्म, पेशव्यांची बदामी किल्ल्यावर मोहीम, शेवटले बाजीराव पेशवे, खडकीची लढाई, नाना फडणीस, जनकोजी शिंदे, महादजी शिंदे, अहल्याबाई होळकरीण, मल्हारराव होळकर, फत्तेसिंग गायकवाड, नागपूरकर आप्पासाहेब भोसले, परशुरामभाऊ पटवर्धन असे सुमारे चव्वेचाळीस पोवाडे जास्त प्रसिद्ध आहेत आणि ते तुळशीदास, यमाजी, हरी, सगनभाऊ, राघूजी पाटील, पिराजी, मार्तंडबाजी, मरी पिपाजी, पेमा माळी, प्रभाकर, लहरी मुकुंदा, खंडू संतू, बाळा लक्ष्मण, अनंत फंदी, होनाजी बाळा, रामजोशी, सुलतान, विकनदास, हैबती, गंगू हैबती इत्यादी शाहिरांनी रचलेले आहेत. 1803 व 1804 या सालांत पुणे शहरात व आसपासच्या प्रदेशांत भयंकर दुष्काळ पडला होता. त्यामुळे अन्नधान्याची महागाई झाली होती. त्यावेळचे वर्णन राम जोशी याने त्यांच्या पोवाड्यात केले आहे. त्यातील काही भाग असा –

हे राहो भाजींत बागवान जोडका |
पैशाचा एकची मुळा एक दोडका |
पैशास मक्याचा कंद एक मोडका |
हा कांदा दो पैशांस एक बोडका |
जळणास रुपायाला एक लहान खोडका |
काळाने देश यापरि केला रोडका |

रंगभूषा – साधी.
वेशभूषा – पटका, चुस्त पायजमा, सदरा किंवा बाराबंदी, कमरेला झोला.
वाद्य – तुणतुणं, कडी, ढोलकी, डफ, खंजिरी.