इरावती कर्वे

इरावती कर्वे (जन्म: डिसेंबर १५, १९०५,म्यानमार – मृत्यु:ऑगस्ट ११, १९७०) या मराठी लेखिका होत. मानववंशशास्त्र, समाजशास्त्र आणि मानसशास्त्राच्या अभ्यासक असलेल्या इरावती कर्व्यांनी वैचारिक ग्रंथांबरोबर ललित लेखन देखील केले आहे. भारतीय त्याचप्रमाणे मराठी संस्कृती हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. या विषयांवर त्यांनी मराठी तसेच इंग्रजीतून लिखाण केले आहे. उच्चशिक्षित, निरीश्वरवादी, बुद्धिप्रामाण्यवादी असलेल्या इरावती कर्वे यांचे संस्कृत भाषेवर देखील प्रभुत्त्व होते. मूळच्या इरावती गणेश करमरकर यांचे शिक्षण पुण्यातील हुजूरपागा शाळेत झाले. १९२२ साली त्या मॅट्रिक पास झाल्या, आणि १९२६ साली फर्ग्युसन महाविद्यालयातून तत्त्वज्ञान विषय घेऊन बी.ए. (ऑनर्स) झाल्या. त्याच वर्षी त्यांचा विवाह महर्षी कर्वे यांचे चिरंजीव डॉ. दिनकर कर्वे यांच्याशी झाला. ज्येष्ठ समाज-शास्त्रज्ञ डॉ. घुर्ये यांच्या मार्गदर्शनाखाली ’परशुरामाबाबत दंतकथा’ व ’चित्पावन ब्राम्हण’ अशा दोन प्रबंधांचा अभ्यास करून त्यांनी १९२८ साली मुंबई विद्यापीठाची एम.ए.ची पदवी मिळवली. १९२८-३० या काळात बर्लिन विद्यापीठातून ’मानवी कवटीच्या भागांचे एकमेकांशी प्रमाण’ या विषयावर त्यांनी पी.एच.डी. केली. पुढे त्यांनी काही काळ एस. एन. डी. टी. विद्यापीठात कुलसचिव म्हणून काम पाहिले.
आधुनिक विचारांच्या असूनही आपल्या संस्कृतीबद्दल असलेली आपलेपणाची व आपुलकीची दृष्टी त्यांच्या लिखाणातून दिसून येते. ‘स्त्री-स्वातंत्र्या’ बाबतच्या त्यांच्या कल्पना अतिशय आधुनिक होत्या. त्या काळी स्त्री-स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या स्त्रियांना उद्देशून त्या म्हणत, ‘बायांनो, पुरुषांशी भांडताना फक्त समान हक्कांसाठी काय भांडता? नेहमी जास्त हक्कांसाठी भांडत नाते संबंधांबद्दल योगदान दिले.

माजाला ’गोधडी’ची उपमा देऊन त्यांनी त्यामागील व्यापक अर्थ सांगितला. ‘वेगवेगळ्या रंगांच्या आकारांच्या तुकड्यांनी मिळून गोधडी हे अखंड वस्त्र तयार होते, त्याप्रमाणेच समाजातील निरनिराळी माणसे एकत्र येऊन समाज निर्माण होतो, माणसे एकमेकांच्या जवळ येतात, जोडली जातात, एकमेकांच्यात मिसळतात, व पुन्हा तुटली जातात, तरीही त्यांची समाजातील वीण मात्र पक्की असते.’ असा समर्पक विचार त्यांनी मांडला.ललित व संशोधनात्मक-वैचारिक अशा दोन्ही प्रकारचे लेखन त्यांनी विपुलतेने केले. वैचारिक लेखनाबरोबरच स्त्रीची सहृदयता, तरल सौजन्यशीलता, चिंतन या गुणांसह ललितलेखनही त्यांनी तितक्याच ताकदीने केले आहे. ’परिपूर्ती’, ’भोवरा’ व ’गंगाजल’ ही काही उदाहरणे होत.’ललितगद्याच्या अग्रदूत’ असे त्यांना म्हटले जाई. अतिशय लवचीक, स्वाभाविक भाषाशैलीमुळे त्यांचे गद्य अधिकच खुले. इरावतीबाईंनी मराठी व इंग्रजीतूनही लेखन केले. महाभारतावरील ’युगान्त’ या त्यांच्या ग्रंथास १९६८ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. ’युगान्त’ मध्ये त्यांनी महाभारतातील व्यक्तिरेखा अद्वितीय दृष्टिकोनातून मांडल्या आहेत. या ग्रंथातून त्यांच्यातील स्त्री, संशोधिका व लेखिका एका वेगळ्याच उंचीवरून आपल्याला भेटते.

मराठी लोकांची संस्कृती, धर्म, हिंदूंची समाजरचना, महाराष्ट्र एक अभ्यास, Hindu Society An Interpretation, Maharashtra Its Land & People, Bhils of West Khandesh अशी मौल्यवान ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे. एक ज्ञानभाषा म्हणून त्यांनी इंग्रजी भाषेचे महत्त्व ओळखले होते. त्यांचा संस्कृत भाषेचाही मोठा अभ्यास होता. रामायण-महाभारताची संस्कृतमधील रचना, प्रसिद्ध कवींची संस्कृत काव्ये, असंख्य सुभाषिते – असे त्यांचे पाठांतर होते.
शोधनात्मक कार्य करणार्‍या डॉ. इरावती कर्वे या जगातील एकमेवाद्वितीय शास्त्रज्ञ होत्या.