महाशिवरात्री ची पुराणकथा –

ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यात सृष्टीशी निगडीत सर्व महत्वपुर्ण गोष्टींची निर्मीती झाली परंतु त्याचवेळी समुद्रमंथनातुन हलाहल विष देखील बाहेर आले.
या विषात ब्रम्हांडाला नष्ट करण्याची ताकद होती. आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवांमधेच होती त्यामुळे त्यांनी हे हलाहल विष प्राशन करून ब्रम्हांडाला वाचवले.पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपुर्ण देहाचा दाह होत होता. वैद्यांनी भगवान शिवांना संपुर्ण रात्र जागुन काढण्याचा उपाय सांगितला.
सर्व देवांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणुन रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली. सकाळी महादेवांनी सर्वांना आशिर्वाद दिला. या संपुर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली म्हणुन या दिवसाला महाशिवरात्री असे म्हंटले जाते.अंगाच्या होत असलेल्या दाहामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते.महाशिवरात्री या दिवशी भाविक संपुर्ण दिवस उपवास करतात. भगवान शिवांचे शिवलिलामृत, महारूद्र, भजन, गायन इत्यांदिचे आयोजन केले जाते. भगवान शिवाचे दर्शन घेउन त्यांचा कृपाप्रसाद मिळवण्याकरीता आराधना केली जाते.

शिवाच्या मंदिरांमधे महाशिवरात्रीला मोठया संख्येने भाविकांची गर्दी दिसुन येते.बारा ज्योर्तिलिंग ज्या ज्या ठिकाणी आहे तेथे तर लाखोंच्या संख्येने भाविक महाशिवरात्रीला दर्शन घेण्याकरता जमा होतात.भगवान शिवाचे ज्या ज्या ठिकाणी तिर्थक्षेत्र आहेत तेथे मोठयामोठया यात्रा भरतात.

शिवशंकराला 108 बेल वाहुन शिवनामावली देखील उच्चारली जाते. महाशिवरात्रीला काटेधोत्र्याचे फुल भगवान शंकराला वाहाण्याची देखील पध्दत आहे. विदर्भात आजच्या दिवशी घोंगलाचे फुल शिवाला वाहाण्याची परंपरा आहे.

भगवान शिवाला ‘भोळा शंकर’ देखील म्हंटलेले आहे. उपासना केल्यावर त्वरीत प्रसन्न होणारा आणि ईच्छित फळ देणारा हा महादेव सर्वांचे कल्याण करणारा आहे. शिवपुराणात एक कथा सांगितली जाते ती अशी . . .

शिवपुराणातील कथा –

एक पारधी जंगलात सावज शोधण्याकरता झाडावर बसला होता. संपुर्ण दिवस गेला परंतु त्याला शिकार गवसली नाही. सायंकाळी हरणांचा एक कळप तेथे पाणी पिण्याकरता आला पारधी बाण सोडणार तेवढयात त्यातील एक हरीण पुढे येउन पारध्याला म्हणाला,‘हे पारध्या तु बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे परंतु मी तुला एक विनंती करतो मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटुन येऊ दे, माझी कर्तव्ये मला पार पाडुन येउ दे’, हरणाने वचन दिल्याने पारध्याने त्यांची विनंती मान्य केली.दुरवरून मंदिरातील घंटांचे आवाज येत होते ओम नमः शिवाय कानावर येत होते. पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते.सहज चाळा म्हणुन एक एक पान तो खाली टाकत होता त्या झाडाखाली असलेल्या शिवपिंडीवर ती बेलाची पानं पडत होती. नकळत का होईना त्या पारध्याच्या हातुन शिवउपासना घडली.

हरीण परत आल्यानंतर त्याने पारध्याला म्हंटले ’की आता मला मार मी माझे कुटूंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावुन आलो आहे तेंव्हा लगेच हरणी पुढे आली आणि तीने म्हंटले ‘त्यांना नको मला मार मला माझे पत्नीधर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे’त्वरीत हरणाची लहान पिल्लं पुढे आली आणि म्हणाली ‘आईला नको आम्हाला मार आम्हाला आमचे पुत्रधर्माचे कर्तव्य पार पाडूदे’
ते पाहाता पारध्याच्या मनात विचार आला हे प्राणीमात्र असुन देखील आपापल्या कर्तव्याला चुकत नाहीत तर मी माझा मानवधर्म, दयाधर्म का सोडु? त्याने सर्वांना जीवदान दिले.
देवाधिदेव महादेव हे सर्व पाहुन हरणावर आणि पारध्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना कृपाआशिर्वाद दिला.

सर्वांचा उध्दार केला हरिणाला मृग नक्षत्र म्हणुन व पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणुन अवकाशात नेहमीकरता स्थान दिले. हा प्रसंग ज्या समयास घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता
एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारले, ”असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रत-पूजन आहे, ज्यामुळे मृत्यू-लोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल?”
उत्तरादाखल शंकराने पार्वतीला ‘शिवरात्री’च्या व्रताची कथा सांगितली.

‘एका गावात एक शिकारी राहत होता. मुक्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे. तो सावकाराचा कर्जदार होता. त्याने त्याचे कर्ज वेळेवर
चुकविले नव्हते. त्यामुळे संतापून सावकाराने शिकारीला शिवमठात कैदी बनविले. योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती.शिकारी ध्यानमग्न होऊन शिवा संबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला. चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली. सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले. शिकारी दुसर्‍या दिवशी सर्व कर्ज फेडेन असे वचन देऊन कैदेतून सुटला.आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला. पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान-भुकेने व्याकूळ झाला होता. शिकार करण्यासाठी तो तलावाकाठच्या
बेलपत्राच्या झाडावर मचाण बांधू लागला. बेल-वृक्षाच्या खाली बेलपत्रांनी झाकले गेलेले शिवलिंग होते. शिकार्‍याला मात्र हे माहीत नव्हते. मचाण बनविताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या. याप्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकार्‍याचे व्रतही झाले आणि त्याच्याकरवी शिवलिंगावर बेलपत्रही वाहिले गेले.
एका प्रहरानंतर एक गर्भिणी हरणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहचली. शिकार्‍याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता तितक्यात ती हरिणी बोलली, मी गर्भिणी
आहे, तू एकाच वेळी दोन जीवांची हत्या करशील. हे योग्य नाही. मी आपल्या पिलाला जन्म देऊन लवकरच तुझ्यासमोर येईल. तेव्हा तू मला मार.’ शिकार्‍याने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरिणी झाडांआड लुप्त झाली.

काही वेळाने दुसरी हरिणी तेथून निघाली. शिकार्‍याच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्याने तिच्यावर नेम साधला. हे बघून त्या हरिणीने त्याला सांगितले, की ‘हे पारधी! मी
एक कामातूर विरहिणी आहे. आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे. मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईल.’
शिकारीने तिलाही जाऊ दिले. दोनदा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला. तेवढ्यात एक हरिणी आपल्या पिलासोबत तेथून निघाली. शिकार्‍याला जणू सुवर्णसंधीच मिळाली. त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरिणी बोलली, हे पारधी! मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते, यावेळी तू मला मारू नकोस.’
शिकारी हसला आणि म्हणाला समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही. याआधी मी दोनदा शिकार गमावली आहे. माझी मुले तहान-भुकेने व्याकूळ झाले असतील.उत्तरादाखल हरिणी म्हणाली, जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते आहे तशीच मलाही वाटत आहे. त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे. माझ्यावर विश्वास ठेव. मी लगेच परत येईल.

हरिणीचा तो व्याकूळ स्वर ऐकून शिकार्‍याला तिची दया आली. त्याने तिलाही जाऊ दिले. शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता.काही वेळाने एक धष्ट-पुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता. आता या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार केला.पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दीनवाण्या स्वरात म्हणाला, ‘हे पारधी! जर तू माझ्या आधी तीन हरिणींना मारले असेल तर मला मारण्यातही वेळ करू नकोस, म्हणजे त्यांच्या वियोगात मला एकही क्षणाचे दु:ख सहन करावे लागणार नाही. मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असशील तर मला काही क्षणांसाठी जीवनदान देण्याची कृपा कर. मी त्यांना भेटून तुझ्यासमोर हजर होईल.

मृगाचे बोलणे ऐकून शिकार्‍याच्या डोळ्यासमोरून संपूर्ण रात्रीचे घटना-चक्र आले. त्याने सर्व कथा मृगाला ऐकविली. तेव्हा मृगाने सांगितले, ‘ माझ्या तीनही पत्नी येथून वचनबध्द होऊन गेल्या आहेत, मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत. त्यामुळे तू मला आता जाऊ दे, मी त्यांच्यासमवेत तुझ्यासमोर हजर होतो.

उपवास, रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढविल्यामुळे शिकारीच्या हिंसक हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते. धनुष्य त्याच्या हातातून निसटले. शिवाने त्याच्या ह्रदयात बदल घडवून आणला. त्याला आपल्या भूतकाळातील कर्मांचा पश्चात्ताप झाला.
थोड्याच वेळात मृग सपरिवार शिकार्‍यासमोर आला. या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकार्‍याच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. शिकार्‍याने त्यांना न मारता आपणही मुक्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरविले.

देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते. घटनेची परिणती झाल्याबरोबर देवी-देवतांनी फुलांचा वर्षाव केला. तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्षप्राप्ती मिळाली.