सुहास शिरवळकर ऊर्फ सु.शि. (नोव्हेंबर १५, १९४८ – जुलै ११, २००३) हे प्रसिद्ध मराठी कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक होते.

१९७४ साली त्यांनी रहस्यकथा लेखनास सुरुवात केली. तेव्हापासून १९७९ सालापर्यंत त्यांनी २५० छोट्या मोठ्या रहस्यकथा लिहिल्या. १९८० सालापासून ते ‘सामजिक कादंबरी’ साहित्यप्रकाराकडे वळले. शिरवळकरांनी वाचकप्रिय लेखनप्रकार जाणीवपूर्वक निवडला. परंतु ‘लोकांना आवडेल ते’ अशा मर्यादित अर्थाने त्याकडे न बघता, त्यांनी आपले साहित्य सवंग दर्जाचे होऊ न देता लेखन केले. रहस्यकथा, १७५ कादंबऱ्यांव्यतिरिक्त त्यांनी इतर कथांचेही लेखन केले. या कथा पुढे कथासंघांच्या रूपात प्रकशित करण्यात आल्या. सुहास शिरवळकरांनी काही बालकथादेखील लिहिल्या. त्यांच्या निधनानंतर त्यांनी लिहलेल्या कवितांचा काव्यसंग्रहसुद्धा प्रकाशित झाला आहे. त्यांच्या ‘देवकी’ या कथेवर आधारलेला मराठी चित्रपट बनला, तर ‘दुनियादारी’, ‘कोवळीक’ या कादंबऱ्यांवर दूरचित्रवाणी मालिकाही प्रसिद्ध झाल्या आहेत.